“ ऐकलं का मामा, ही लांबच्या लांब रांग कसली म्हणायची ? मी आताच गावच्या येष्टीने ह्या समोरच्या आगारात उतरलोय ? तिथून सापशीडीच्या डावा परमाने खुनांनी बोर्ड रंगवल्यात, ती बघत बघत हित पोचलो. हित कोणी पुढारी येणारे का ? की कोणी शारुक, सलमान...." सदाभाऊ रांगेत उभ्या असलेल्या समोरच्या व्यक्तीला उत्सुकतेने विचारू लागले.
त्यावर समोरच्या व्यक्तीने पहिला प्रश्न विचारला " तुम्ही मुंबईचे दिसत नाही, चतुर्थीच्या दिवसात मुंबईला येणे झाले नसावे तुमचे ?"
" न्हाय न्हाय मागल्या सनाला आलतो ? तवा चटदिशी आलो, अन पटदिशी वापीस गेलतो, आता हित शेजारच्या गल्लीत मित्राकड जायचं हाय. बाप्पाच्या दर्शनाला कवा पासन यायचं व्हत. मंग घेतली चार कापडं अन बसलो येष्टीत.."
समोरची ती व्यक्ती कौतुकाने सगळं काही ऐकत होती. एक स्मितहास्य मात्र चेहऱ्यावर कायम होतं.
सदाच बोलणं थांबलं, आणि ती व्यक्ती त्याला सांगू लागली " ही समोर पाहताय ना ती राजाची लाईन आहे, राजा म्हणजे आपला बाप्पा आणि इथला राजा, तुमचे मित्र नक्की राहतात कुठे ? रस्ता चुकलात का ? पत्ता असेल तर द्या मी तुम्हाला वाट दाखवतो.
त्यावर सदाच उत्तर आलं " पत्ता त्यो तर न्हाय? येक नंबर दिलता, त्यो बी आता हुडकावा लागेल या गाठूड्यात. फकस्त येष्टीतन उतरल्यावर डाव्या बाजूला सफेद बोर्ड दिसलं त्याच्या माग माग यायचं, त्यो बाप्पा घराकडं आनेल, हितकच बोलला बन्या. अन तसाच आलोया मी हित."
समोरच्या व्यक्तीने गोंधळलेल्या सदाला धीर दिला आणि बोलला " ठीक आहे, काळजी करू नका, हा राजा पोहोचवेल तुम्हाला मित्रा जवळ. या तुम्ही पण...आलाय तर दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहा."
सदा भाऊसाठी सगळंच नवं नवं होतं त्यामुळे त्यांनी प्रश्नांची सरबत्ती चालू केली.
" हित येवढी गर्दी असते का ओ बाप्पाला बघायला? आमच्या इथं तर नेत्यांच्या भाषणाला न्हायतर पाण्याचा टँकर येतो तवा होती. आन तिथं कोपऱ्यात सगळी काय मागतायत ? आमच्यात जत्रेला गावातल्या बायका फुल नारळ घेऊन बसत्यात ती बी वलीत..."
समोरची व्यक्ती उत्तरली " अहो हा बाप्पा इथला राजा मग राजेशाही थाट हवाच ना ? आत मध्ये जाऊया तिथं तुम्हाला राजाचा राजमहाल ही दिसेल. खूप सुबक आणि सुंदर कोरलाय. आणि ती पुढे गर्दी दिसतेय ना ती फुलं नारळासाठी नव्हे, तिथे राजाच्या दरबारात लवकर जाण्यासाठी कुपन्स मिळतात. त्यामुळे दर्शन वेळेत होते. इथे कोणाला थांबायला वेळ नसतो ना मग हे कुपन घ्यायचे कि थेट दर्शन.
सदा पुढे बोलू लागला " गावी आमच्यात एक गाव एक गणपती असं असतंय, त्याला तेवढी चार डोकी येत्यात अन राजा बिजा नसतो तिथं. गावात चार सालापासून दुष्काळ हाय. समद सुकलेय तवा राजा बी न्हाय रहायचा तिथं जास्त वेळ. गावच्या पाटीलकडे तेवढा असतो गणपती. त्यो बी वर्गनी मागून बसवत्यात चौकात. इथं भारीच हाय, एकदा बघतो राजाला. अन त्यालाच पत्ता इचारतो. "
"हो हो, अजून बरंच आहे. रात्री इथे रोषणाई असते. वेगवेगळे स्टोल्स लागतात. लोक रात्र रात्र या बाप्पाच्या रस्त्यावर आरामात फिरू शकतात. इथूनच जवळ स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे. तो नवसाला पावतो. मूर्ती लहान आहे, पण कीर्ती महान. लोक चार चार तास रांगेत उभे राहून त्याचे नवस फेडतात. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला इथे ही नवसाची स्पेशल लाईन दिसेल. बाप्पाला ही वाटत त्याच्याकडे भक्तांनी यावं म्हणून तो ही सगळ्यांना तसे कारण देतो. आता तर परदेशी पाहुणे पण येतात राजाला पाहायला, तो बघा तिथे उंच आणि गोरा माणूस दिसतोय ना तो कुपन्सच्या लाईन मध्ये...त्यालाही बोलावलं बाप्पाने "
त्यावर सदाभाऊ बोलले " व्हय व्हय त्यो का हाफ प्यांट वाला, राजाला बघायला असा कसा आला ह्यो पर, खुळी जनता दिसती हितली, अरे ह्यो दरवाजा इतका म्होटा... अन किती फुल टाकली हायेत रस्त्यात...लय म्होटा अन राजेशाही दरबार हाय बाबा तुमच्या राजाचा..."
"हो, हळूहळू बाप्प्पालाही ग्लोबल केलंय त्यामुळे थोडा लवाजमा वाढलाय. या सगळ्याच इंशोरन्स पण काढतात माहिती आहे का तुम्हाला. "
“ काय म्हणला ...काय काढतात " हसत हसतच समोरून उत्तर आले
" इंशोरन्स म्हणजे या सगळ्या सजावटीचा सगळा जमा खर्च ... राजाचे किंवा त्याच्या दरबारात चुकून नुकसान झालं तर पुन्हा करता येत त्यात...आज मंगळवार आहे त्यामुळे गर्दी जरा जास्तच आहे. सगळे भक्त चांगला दिवस पाहून येतात. आम्ही मंडपाच्या शेजारीच राहतो आणि खिडकीतून सार काही पाहत ऐकत असतो. कधी कोण vip आला की आम्हाला खिडकीतून बाप्पा सोबत त्याचे पण मुखदर्शन होते. नाहीतर आपण कुठे पाहणार समोरासमोर. रात्री महाप्रसादाला लांब लांबून आलेले भक्तगण थांबतात आणि दुसऱ्या दिवशी निघतात. बरेच जण देणगी आणि दान ही करतात. आपल्याला जमेल तस आणि जमेल ते. कोण रोख रक्कम, कोण प्रसाद, कोण सोन्याच्या वस्तु किंवा वह्या पुस्तक, जस जमेल तस. राजाच्या जीवावर बऱ्याच जणांची पोट अवलंबून आहेत त्यामुळे त्याच्याच कृपेने इथे भरभराट झाली आणि राजा ग्लोबल झाला. “
“ असं व्हय!” सदा कौतुकाने सारे ऐकत होता.
“ कोल्हापुरात झालेल्या महापुरात राजाच्या भक्तांनी ही मदत केली, तेवढाच खारीचा वाटा ? राजा आपल्याला मोठं करणार आणि त्याला आपण मोठं करायचं. बघा पाहता पाहता आपण राजाच्या चरणाशी आलो, आपल्याला कळलेच नाही."
भव्य राजाच्या मूर्तीकडे सदा एक सेकंद पाहतच राहिला. तेवढ्यात शेजारून आवाज आला " चला पुढे, चला पटापट, आगे बढो, आगे बढो...." आणि सदा आणि ती व्यक्ती बाहेर आले. बाहेर येताच त्या अपरिचित माणसाने शेजारीच असलेल्या त्याच्या घरी नेलं, चहा नाष्टा दिला अन सदा तिथून निघाला. जाता जाता त्याने विचारले,
" तुमचं नाव काय म्हणला....पाव्हन? ती व्यक्ती बोलली " गजानन विघ्नहर्ते. "
सदा खूप खुश होता. राजाचा थाट पाहून डोळे दिपले होते त्याचे. म्हणून मनापासून आभार मानून तिथून निघाला. वरून खिडकीतून विघ्नहर्ते पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य अजून ही तसच होतं. तेवढ्यात एक माणूस सदाला भेटला.
" मित्रा तू कुठे होतास घर मिळालं ना, निघालास कुठे हे बघ माझी मुलगी खेळतेय समोर..." त्यावर सदा समोरूनच पुढे येता येता बोलला
" कुठं.....परत चाललेलो गावी, राजाला पाहून. तुझं घर काय घावत नव्हतं. शेवटी ते शेजारी राहणारे गजानन मामा नी मला इथे घरी आनलं अन चाय देऊन पाउनचार केला, अन तितक्यात तू हित भेटला."
" कोण गजानन ? हित नाय रे कोण गजानन, तुला फशीवला कोणीतरी चल घरला...बायकोला मस्त तुपातला शिरा करायला सांगतो...चल चल." सदाने मागे वळून पाहिले. आता ही मागेच खिडकी होती पण खिडकीत तेव्हा कोणीच नव्हते.
8 comments:
खुप छान, सर्वसामान्य पणे एक ग्रामीण अनुभव 👌👌👌
ग्रामीण भाषेत मांडण्याचा उत्तम प्रयत्न ...
धन्यवाद ताई
गणपती बाप्पा मोरया 🌺
खूप छान ताई... 🌹
खूप छान लिहिलं आहेस जुई👍
धन्यवाद ओमकार 🙂
मन:पुर्वक धन्यवाद 🙂
छान जुईली
मनपूर्वक धन्यवाद 🙂
Post a Comment