Monday, 27 November 2023

तराफा

तराफा... आपल्याला वाहणाऱ्या प्रवाहातून सुरक्षित ठिकाणी नेणारा... आपल्याकडे आशेचा तराफा कायम सोबत असतो. आपली स्वप्न, ध्यास, दृढ इच्छा ज्याच्या जोरावर हा ताराफा आपल्या किनाऱ्याला लागत असतो. जेव्हा शून्यापासून सुरुवात करायची असते, तेव्हा त्या शून्याचे शंभर करण्यासाठी आपल्याकडे आशेचा दुवा असतो. नव्या दिवसाची, नव्या वर्षाची, नव्या नात्याची सुरुवात या एका शब्दावर बऱ्याचदा होत असते.

नव्या प्रवासासाठी आपण महिना आधी काढलेले तिकीट. दुसऱ्या दिवशी वेळेवर उठण्यासाठी आदल्या दिवशी लावलेला गजर. ही त्याचीच उदाहरणे.

श्री समर्थांच्या एका श्लोकात जसे सांगितले,

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।

अकस्मात तोही पुढे जात आहे ॥

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।

म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥

आपल्या जवळचे दूर जाताना आपल्या मनात दुःख असते. त्याच वेळी आपला ही दूरचा प्रवास सुरु असतो. नसल्याची उणीव आणि असण्याचा ध्यास यातच आपण पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेत असतो. आशेवर जगणारी स्वप्न अशीच असतात ना ...

दुर्धर आजारावर योग्य वेळी मिळालेले औषध. अपघातातून मिळालेले जीवदान. प्रतीक्षेनंतर जन्माला आल्याचे सुख. भोवतालच्या काट्यांचा विसर पडून फुलून आलेले गुलाबाचे फुल. आशेवर पुन्हा पुन्हा जन्माला येणारी ही सृष्टी.

एक प्रसंग आठवला, रेल्वे स्टेशन बाहेर तिकीट घराजवळ एक आजी दिसायची. सत्तर बाहत्तर वयाची, सावळीशी, डोळ्यावर चष्मा आणि गडद रंगाची साडी...अगदी आपल्या आजी सारखी. पोहे, उपिट, शिरा विकायला आणायची. भरपूर लोक तिथून नाश्ता करून जायचे. एकदा घरी पोहोचायला उशिर होणार होता. स्टेशनवर असताना कडाक्याची भूक लागली होती, तिथे जाऊन काही खायला घ्यावे असा विचार माझ्या मनात आला. मी त्या आजीजवळ गेले. सर्व डबे रिकामे झाले होते. ती ते भरून ठेवत होती फक्त एक डबा शिल्लक होता, ज्यात शिरा होता. तिने त्यातूनच एक प्लेट शिरा मला दिला. भूक अनावर झाली म्हणून तिथेच तो मी उभ्या उभ्या संपवला. तिने ही आपले बस्तान बांधायला घेतले. सगळे रिकामे डबे आणि त्यात एक भरलेला डबा. शिऱ्याचा भरलेला डबा बघून मी तिला विचारले “ हा डबा पूर्ण भरलेला, एवढे आता वाया जाणार... आजी ? “ त्यावर ती आजी म्हणाली “ मी रोजच हा डबा भरून आनते ग बाय... रोजच हा राहतो, पोरं नको नेऊ म्हनतात, पर मला रोज फाटे एक सपान पडतं. या डब्यातलं खायाला एक दिस माझा पांडुरंग येईल. या येळी वारी चुकली नव्ह माझी. तो येईल कधी बी...त्यानं मला तस सांगितलंय, तवा कमी पडू नये, म्हनून आनते. अन हे राहत नई, हा राहिलेला डबा मी माझ्या पोरांना घरी गेल्यावर देते... ती संपवतात “ मी तिच्याकडे पाहत राहिले. त्या भरलेल्या डब्यातून माझी भूक भागली. ती आजी डबा पिशवीत ठेवून तिथून निघाली. एक डबा डोक्यावर आणि एक मोठी पिशवी हातात घेऊन पुढे निघून गेली. जगाची भूक भागवणाऱ्या आजीची ओढ मात्र विठ्ठल दर्शनात होती. कधी तरी तो डबा संपवायला विठ्ठल तिच्यासमोर असेल. या आशेवर खाऊ घालणारी आजी तिथे पाहिली होती.

उत्तराखंडच्या भुयारी मार्गात नुकताच झालेला अपघात हे सुद्धा तसेच उदाहरण. त्यात अडकलेले बऱ्याच दिवसांपासून बाहेर येण्याच्या प्रतीक्षेत असलेले कामगार. अचानक बंद झालेला रस्ता. डोंगरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्याला शोधणारी आशेवर जगणारी त्यांची मने. एखाद्या अंधारमय झालेल्या गुहेत प्रकाशाचा दिवा शोधत होते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यातून बाहेर आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आशेवर मिळवलेले जीवदान...अशी ही आशेवर जगणारी उदाहरणे.

आपल्या समोरचा बंद दरवाजा उघडून आपल्या मुक्कामापर्यन्त पोहोचण्याचा हा प्रवास. धडपड करत आपण तिथे पोहोचतो. जेव्हा आपण तिथे पोहोचतो, तेव्हा मनात प्रश्न ही पडतो “ हे अंतर कसे कापले ?” मागे वळून पाहिल्यावर दिसतो आशेचा तराफा.

आणखी एकाला आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचवण्यासाठी तयारीत असलेला ताराफा. आपला प्रवास पूर्ण होतो. आपल्या इच्छित जागी आशेच्या तराफ्यावरून जाण्याचा एक अविरत प्रवास म्हणजे हे जगणे. कुणासाठी स्वप्न, कुणासाठी स्वप्नांचा प्रवास.


Monday, 20 November 2023

योगायोग


“ योगायोग “ लहानपणापासून आज वर नकळत मिळालेले बरेचसे अनुभव आपण या शब्दाशी जोडत असतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या असंख्य लोकांसाठी, बऱ्या वाईट घटनांसाठी आपण कधी कधी निव्वळ एक निमित्त असतो. कावळा बसायला आणि फांदी तुटायला ही उक्ती तर आपल्याला ही कधी तरी लागू पडली असेल. म्हणजे पहा ना... दरवर्षी बहरणारा आंब्याचा मोहोर एखाद्या वर्षी पावसामुळे गळून गेला की श्रावणातल्या रिमझिम सरींचा पाऊस तेव्हा आपल्यासाठी अवकाळी होतो.

एकदा व्यक्तिगत कामासाठी मी पोस्टात गेले होते. तिथे बाहेरच्या बाकावर बसले होते. मागे फुलांची लहान बाग केली होती. अर्धा तासांनी अनोळखी आजी आजोबा तिथे आले. आजोबांनी आजीना बाहेर बसायला सांगितले. त्या आजी माझ्या शेजारी येऊन बसल्या. माझा नंबर यायला बराच वेळ होता. बसून कंटाळा आला म्हणून मी त्या छोटेखानी बागेत फुलझाडांचे फोटो काढू लागले. मला फोटो काढताना पाहून त्या आजीबाईंनी त्यांच्या कडे असलेल्या निशिगंधाची फुले मला दाखवली. दोन चार दिली ही. नाव, गाव विचारले, वर वर चर्चा झाली. तेवढ्यात आजोबा बाहेर आले. दोघे स्कुटर वर बसून निघून ही गेले. निशिगंधाच्या त्या फुलांना आजीबाईंच्या ओंजळीत बघून मला तिथे दोन ओळी सुचल्या त्या लिहिण्याच्या घाईत ती फुले तिथेच राहिली. मी त्या ओळी मात्र घेऊन घरी आले.

“ निशिगंधाचे फुल अंतरी दरवळते आहे
प्रीतीची साखर मनामध्ये विरघळते आहे “

आणखी एक तिथलाच अनुभव, एक इसम आपल्या दोन लहान मुलांना घेऊन तिथे आला होता. मी काही तरी लिहिते पाहून माझ्याकडे आला. त्यांच्याकडे असणारा फॉर्म भरण्यासाठी त्यांना अडचण येत होती. मला तो फॉर्म दाखवला. त्यांची माहिती विचारून मी भरून दिला. नंतर येणाऱ्या दोन तीन जणांनी त्याच फॉर्म बद्दल मला विचारले. साहजिकच मी बसल्या बसल्या तिथे हे ही केले. तासाभऱ्याच्या प्रतिक्षेनंतर माझा नंबर आला. मी आत गेले. काम फत्ते झाले. फॉर्म फी भरताना माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. शोधत मी बाहेर आले. बाकावर पाहिले. माझ्या कडून फॉर्म भरून घेणारा तो इसम आपल्या दोन मुलांसोबत आपला नंबर येण्याची वाट पाहत बसला होता. मी सुटे विचारते ते त्यांनी दुरूनच हेरले आणि मला सुट्टे पैसे दिले आणि मी घरी परतले.


या घटनांमध्ये कधी मी कोणासाठी निमित्त झाले तर कधी माझ्यासाठी कोणी निमित्त झाले पण गोष्ट पुढे सरकली. त्या दिवशी ती बाग, निशिगंधाची फुले, आजीबाई, ती व्यक्ती, ती मुले आणि मी एकमेकांसाठी योगायोग म्हणून समोर आलो.

समर्थांनी यावर फार छान लिहिलेले आहे

“ मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥“

ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट ही आहे. जिथे सूर्योदय आहे, तिथे सूर्यास्त ही आहेच. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू ही आहे. असे असताना आपले हे निमित्त मात्र अस्तित्व आपण “ मी “ च्या छत्र छायेत वाढवत नेतो. जे माझ्या कडे आहे ते चिरंजीव मानतो. प्रत्यक्षात मात्र धन, संपत्ती आणि शरीर ही सोबत राहत नाही. झाडावरचे पान ही गळून पडते, पाणी ही स्थिर नसते, वाहून जाते. आठवणी ही कालांतराने विरून जातात. आज जे आहे ते उद्या नाहीसे होते. वरील अनुभवात माझे अस्तित्व हे तेव्हा फक्त माझे नसून ते त्या ठिकाणी भेटलेल्या प्रत्येकाशी कळत नकळत जोडलेले होते. जे पुढच्या काही तासांनंतर माझ्या आजूबाजूला नव्हते ही. योगायोगाने मिळालेले अमूल्य क्षण जपताना जे मागे उरते ना ते चिरंतन... चिरंजीव...


निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...