Sunday, 6 February 2022

सुरमयी संध्याकाळ


         
     कवितेच्या ओळींना सुरांची साथ. संगीताच्या क्षेत्रात अखंड तेवणारी वात. नव्या नवलाईसाठी प्रेरणादायी सुरवात. बाप्पा समोर आपसूक जोडले गेलेले हात. लिहिणार्याने लिहीत जावे. संपून जाव्या ओळी. एक सुर कायमचा आठवणीत राहावा. असे सूर आणि सुरेलपण. मैफिलीतला एक स्वर. एक ध्रुवतारा. निःशब्द झालाय आसमंत सारा. असं आणि बरंच काही तिने निर्माण केलं. जिंकलं...जपलं... त्या लता... लता दीदी...

      एक गोष्ट सूरु झाली. एक ओळ... एक गाणं तिच्यासाठी लिहिलं. सोनेरी ग्रामोफोनने तिची गाणी ऐकली. रेडिओवर कितीदा दिवसाची सुरुवात तिच्या गाण्याने झाली. यु ट्यूबच्या पडद्याने ही तिला अजरामर केले. अशी जगातल्या सात आश्चर्यानंतरचे आठवे आश्चर्य. सात सुरांना बांधून ठेवणारा आठवा सुर... दोन तीन पिढ्या गेल्या तरी टेबलावरच्या त्या रेडिओवर आज ही रिवाईन्ड बटणावर येऊन थांबणारी सुरमयी संध्याकाळ.
    मला आठवते, सूर्यास्त डोईवर होताना तिचं गाणं “ सख्या तुला भेटतील माझे...तुझ्या घरी सूर ओळखीचे ... उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे...” आज ही जिवंत आहे. आज जरी त्या अबोल पारिजातकाचा सडा नाही, तरी त्याचा सुगंधी दरवळ कायम आहे. सततचा फुलांचा वर्षाव झेलता झेलता तिथल्या मातीत, तिथल्या जमिनीत तो मुरलाय. भिनलाय आता तोच मागे उरलाय...

     रात्रीच्या काळोखात, संकटात, अडचणीच्या वेळी “ लुक्का छुपी बहुत हुई सामने आजा ना... “ म्हणणारी आईची माया...” जरा याद रखो कुर्बानि “ म्हणणारी भारत माता. कधी प्रेमात पाडणारी प्रेयसी... वेगवेगळ्या लोभस रूपात, आवाजात ती उमगते.

     “ तुफान को आना है...आकर चले जाना है... बादल है कुछ पल का... छा कर ढल जाना है...परछाईया रह जाती ...रह जाती निशानी है...जिंदगी ओर कुछ भी नही ‘तेरी मेरी कहानी है...” आज ही दीदींच्या आवाजातले ते शब्द कित्येकांच्या आयुष्यात अजरामर आहेत आणि कायम राहतील...खरंच जिंदगी ओर कुछ भी नहीं ...”
हेच खरे.

    

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...