Thursday, 15 October 2020

चौथरा आणि देव

मी ज्या रस्त्यावरून रोज जायचे तिथला हा अनुभव. कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे सगळंच बंद असल्याने लांब जाणे शक्य नव्हते. अशा वेळी जवळच फेर फटका मारण्याची माझी नेहमीची जागा. घरापासून जवळ दहा ते पंधरा मिनिटांवर असलेले एक उद्यान.
तिथे एक मोठे विस्तीर्ण पसरलेले पिंपळाचे झाड आहे. ज्याच्या चार ही बाजूने एक दगडी चौथरा आहे. त्यावर काही श्रद्धाळू भक्तांनी एक देवीचं छोटसं मंदिर केलं. सुरवातीला एक फोटो पाहिला होता. हळूहळू हार – फुलांची गर्दी झाली. हळदी – कुंकवाने चौथरा सजला. आताशा रोज एक महिला तिथे आस्थेने पूजा करते. आणि दिवा अगरबत्ती करून तिथून जात असे. हे चित्र मी अगदी पाच – सहा वर्षापासून पाहते. रोज न्याहाळते. बरेचदा लाईट जाते. सगळीकडे अंधार पडतो पण तिथे त्या पिंपळाच्या झाडाखाली बरोबर मिणमिणता दिवा असतो. तिथेच शेजारी पूजेचे साहित्य मिळते. अगरबत्ती पासून सगळे साहित्य विकणारे काका तिथे रोज असतात. त्यांची निळ्या रंगाची रिक्षा ही तिकडे दिसणे सवयीचे झाले.
गेल्या चार ते पाच महिन्याच्या कोरोना आणि निसर्ग वादळानंतर बऱ्याच दिवसांनी मी तिथे गेले होते. पूर्वी व्यवस्थित असलेला तो चौथरा पार कोलमडून गेलेला दिसला. त्यावरची फुलं वादळात उडून गेली होती. मंदिर जागचे हलले होते. दिवा कुठे दिसलाच नाही. पिंपळाच्या सुकलेल्या पिवळ्या पानांनी खाली तेवढा गालिचा केला होता. कदाचित रोज दिवा लावणारी ती बाई खूप दिवस इथे फिरकलीच नसावी. गोष्ट इथे संपत नाही. तिथेच एका कोपऱ्यात खुले वाचनालय ही आहे. जे आज एकाचे वस्तीचे ठिकाण म्हणजे राहण्याचे ठिकाण झाले होते. त्या वाचनालयात जुनी काही वर्तमानपत्राची पानं होती. आज एक जण तिथे थांबला होता. त्या वर्तमानपत्राचे “ ताट “ करून त्यात एक वेळचे पोट भरत होता. तर बसण्याचा कडप्पा त्याचा “ सोफा कम बेड “ झाला होता. या चित्रात एका गोष्टीने मनात घर केलं ते म्हणजे एका बाजूला चार पाच मळलेली गाठोडी त्याने ठेवली होती तर त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला एक नारंगी हात रुमाल त्यावर भिंतीचा आधार घेऊन एक जाड जुड पुस्तक ठेवलं होतं. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर साई बाबांची प्रतिकृती. साईंच्या समोर एक अगरबत्ती आणि त्याच उद्यानातली काही फुलं. तो इसम तिथे नव्हता पण रिक्षातून दुकान सांभाळणाऱ्या काकांच्या कडून घेतलेली ती अगरबत्ती आणि कुंकवाची पुडी तिथे होती. थोडया वेळासाठी वाटले देवाने आपले रूप आणि जागाच बदलली असावी. श्रद्धा आणि त्याचे अस्तित्व मात्र तिथे तसेच अबाधित होते.

Monday, 12 October 2020

सुख

   “ सुख म्हणजे नक्की काय? “ प्रत्येकाचा एक प्रश्न आणि त्याला मिळालेली प्रत्येकाची आपापली उत्तरं. या उत्तराच्या शोधात आपण आपला आला दिवस जगत असतो. येणाऱ्या अनुभवातून त्याची उत्तर आणि आपली मतं आपण ठरवत असतो. या प्रश्नाचं उत्तर शोधायला लावणारी ही एक छोटीशी गोष्ट.
     एक लहानस गाव. पिंपळगाव. तिथे राहणारे एक शेतकरी कुटुंब. एक लहानसा जमिनीचा तुकडा गाठीशी आणि त्यावर पीक पाणी करून राहणारे हे कुटुंब. रमाई आणि आशा या दोघी बहिणी. रमाई अठरा वर्षाची आणि आशा तिची मोठी बहीण. आशा शेतीच्या कामात बाबाला मदत करणारी तर रमाई नुकतीच कॉलेजात शिकायला जाऊ लागलेली. रमाईला घरी “ रमा “ म्हणत. दोघीना ही शिकायची आवड. रमाला वाचनाची आवड असल्याने तिला पुस्तक जशी मिळायची तशी ती भराभर वाचून काढायची. त्यात ही मराठी आणि इतिहास तिचे आवडीचे विषय होते. त्यामुळे शिकवायच्या आधीच तिचे ते वाचून झालेले असायचे.
     कोऱ्या करकरीत पुस्तकात कोणत्याही पेन किंवा पेन्सिलने रेघोट्या केलेल्या नसायच्या. सगळ्या गोष्टी आहेत तशा नीटनेटक्या ठेवण्याचा स्वभाव तिने आशाकडून घेतला होता.
शेतकरी कुटुंब असले तरी शिक्षणाला घरात वरचे स्थान होते. मुलींच्या शिक्षणात कोणतीही कसूर नव्हती. त्याची जाणीव रमा आणि तिची बहीण आशा दोघींना होती. त्यामुळेच पुढे नवे शिकण्याचे त्यांचे प्रयन्त कधीच थांबले नाहीत. नेहमी काही तरी नवीन शिकण्याची संधी मिळाली की त्याचा पुरेपूर वापर त्या करून घ्यायच्या. त्याच हुषारीवर आशाने शेतीची कामे शिकली आणि वडिलांना त्यांच्या शेतीकामात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रमा समोर एक उदाहरण उभे केले.
      रमाच्या आवडी निवडी आणि स्वभावावर आशाचा खूप मोठा प्रभाव होता. आपली बहीण जशी धडाडीने सगळी पुरुषांची कामे करते. तिच्यात ओतप्रोत भरलेला उत्साह आणि कामाविषयी दृढ निष्ठा रमाला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन द्यायची.
       रोज दिवे लागणीच्या वेळी रमा कॉलेजातून आली की घरची साफ सफाई करून एका विषयाचा धडा मोठ्याने वाचायची. आज तिने तिच्या कॉलेजच्या ग्रंथालयातून एक पुस्तक वाचायला आणले. त्या पुस्तकातली पहिली गोष्ट तिने वाचायला घेतली. “ सुख म्हणजे नक्की काय असतं ! “ हे त्या गोष्टीचे नाव. आशा शेतीच्या उत्पनाचे आणि विक्रीचे हिशेब करत समोर बसली होती. गोष्ट पूर्ण वाचुन झाली. पण त्या गोष्टीत लपलेले उत्तर तिला काही मिळाले नाही. तिने ती गोष्ट आशाला ही वाचून दाखवली. आशाने गोष्ट लक्ष पूर्वक ऐकली.
    गोष्ट अशी होती, एका गावात एक शेटजी राहत होता. ज्याचं मौल्यवान रत्नाचे दुकान होतं. त्याचा हा व्यवसाय मंदावला होता. मोठे आर्थिक नुकसान त्याच्या समोर होते. त्यातुन बाहेर पडण्यासाठी त्याने एक युक्ती केली. आपल्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तो घरी सुख शांती राहावी असे सांगून एक एक रत्न देत असे. सुरुवातीला मोफत मिळालेलं हे रत्न मिळवण्यासाठी लोक गर्दी करू लागले. त्यासाठी पैसे मोजू लागले. हळूहळू ही बातमी गावभर पसरली. तेव्हा श्रीमंतापासून ते कर्जात बुडालेल्या कामगारापर्यन्त सगळेच त्याच्याकडे असे रत्न घेण्यासाठी येऊ लागले. हळूहळू खूप मोठी रांग त्याच्या दुकानासमोर लागली. एक वेळ अशी आली की, त्याच्याजवळ असलेले सगळे मौल्यवान रत्न संपले.
     शेठजीचा बोलबाला आणि चर्चा ऐकून त्या गावातील श्रीमंत सावकार त्याच्याकडे आला आणि सुख समृद्धी मिळवून देणारे ते रत्न मागितले पण तेव्हा मात्र त्या शेठजीकडे एक ही रत्न शिल्लक नव्हते. काय करावे त्याला काहीच सुचत नव्हते, तेव्हा सावकाराला आपल्या दुकानात बसवून तो दुकानाच्या बाहेर आला. बाहेर गडी माणसांचे बोलणे सुरू होते. ते सावकाराच्या कानावर पडते “ साहेबांकडे काहीच कमी नाही तरी त्या दामू नोकरांच्या सांगण्यावरून इथे जादूचे रत्न घ्यायला आले आहेत. काय अजब प्रकार आहे हा !” अगदी दबक्या आवाजात चाललेले बोलणे सावकाराच्या कानावर पडले. काही वेळाने शेटजी आत आला आणि सावकारासमोर एक आकर्षक रंगवलेली दगडी मूर्ती ठेवली. सावकाराने त्या मूर्तीला हातात घेऊन शेठजीला विचारले “ याने माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येईल का शेठजी? “ शेटजी म्हणला “ होय दादा, तुम्ही ही मूर्ती घ्या आणि तुमच्या घरी जो खूप काम करतो ना अशा व्यक्तीच्या समोर ठेवा. पहा तुम्ही कधीच दुःखी होणार नाही. माझा शब्द आहे हा, असे नाही झाले तर ही मूर्ती परत घेऊन या “ सावकार ती मूर्ती घेऊन गेला. खूप दिवस शेटजीने वाट पाहिली पण सावकार मूर्ती परत घेऊन आला नाही. शेठजीची त्याच्या व्यवसायात आणखी भरभरात झाली.
      अशी ही गोष्ट इथे संपली. पण रमा मात्र त्यात लपलेलं सुख शोधता शोधता संभ्रमात पडली. सावकार पुन्हा का येत नाही ? दुकानाबाहेर एवढी मोठी रांग कशी लागते. बाकीचे ठीक आहे पण मूर्ती ठेवल्याने सावकाऱ्याच्या घरात कसे सुख आले. रमा स्वतः शीच बोलताना आशाने ऐकले आणि ती उठून तिच्या जवळ आली. पुस्तक बाजूला ठेऊन तिने रमाला एक प्रश्न विचारला. “ असे समज हे पुस्तक म्हणजेच ती मौल्यवान मूर्ती आहे. जर तू हे पुस्तक एका निरक्षर माणसाला दिले आणि सांगितले ते वाच म्हणजे सुख तुझ्या दारात येईल. तर सुख येईल का ? “ रमा म्हणली “ त्याला वाचताच येत नाही, मग त्याला न वाचताच कसे सुख मिळणार ? “ आशा म्हणाली “ बरोबर, त्याला जरी वाचता आलं नाही तरी आपल्याकडे ते पुस्तक आहे, कधी तरी आपल्याला ते वाचता येईल, त्यामुळे तो ते पुस्तक मूर्ती सारखेच जपून ठेवेल. म्हणजे जेव्हा सावकाराने त्याच्या नोकरांच्या सांगण्यावरून ती मूर्ती घेतली तेव्हा तो सावकार सुखी नाही हे सिद्ध झाले तसंच आता मूर्ती घेतल्यावर ती सतत काम करणाऱ्या व्यक्ती समोर ठेवल्यावर त्याला नोकराची ही दया यायला लागली. जो पूर्ण दिवस काम करून ही दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहात त्याला सलाम करतो. तो आनंदी चेहऱ्याने समोर येतो तर आपण आनंदी का नाही? हे त्याच्या मनाला पटले नाही आणि त्याने स्वतः आनंदी राहायचं ठरवले.
     कदाचित सुख हे मूर्ती किंवा दगडावर अवलंबून नव्हतेच ते तिथल्या लोकांमध्येच लपलेले होते. त्या गावात किती लोक नैराश्यात आहेत आणि सगळे असून ही आपण अजूनही सुखी नाही हे या गावात सर्वाना कळले. त्यांनी तो बदल स्वतः मध्ये केला. त्याची आठवण म्हणून ते मिळालेलं रत्न आणि मूर्ती त्यांनी परत केली नाही तर ती सांभाळून ठेवली.
खरे तर सुख कशात आहे हे ज्याचे त्याचे उत्तर असते. सुखी तो शेटजी ही नव्हता कारण आपण दिलेला रत्न आणि मूर्ती घेऊन गावकरी, सावकार कधीही परत येईल आणि आपले पितळ उघडे पडेल याची भीती त्याला होतीच पण इथे गावकरी किंवा सावकार परत आले नाही आणि शेटजी पण त्याची वाट पाहत राहिला.
       “ रमा सुख हे खरंच त्या मौल्यवान रत्नासारखे असते. जे फक्त आपल्याकडे आहे असे आपण समजतो. सांभाळतो, जपतो आणि आशेवर राहतो.”
     गोष्ट संपली. रमाला सुख म्हणजे काय कळले. ही सुखाची गोष्ट सांगायला रमा माईकडे गेली. तिची माई चुलीवर भाकऱ्या करत होती. गोष्ट सांगून झाली की तिची चार इयत्ता शिकलेली माई तिला म्हणाली. “ चुलीवरच्या जळत्या निखाऱ्यावर भाजली जाणारी भाकरी बघतेस नव्ह तेच खरं सुख ... !”

Wednesday, 7 October 2020

चॉकलेटची भेट

११ जानेवारी २०१७,

त्याच नेहमीच्या रस्त्यावर बोचणाऱ्या थंडीत कॉलेजचं अंतर पार करणं. दाट धुक्याच्या दुलईतून रस्ता काढत तिथवर पोहोचणं म्हणजे मनावर दगडच. एका क्षणासाठी पुन्हा उलट्या पावली जाऊन जाडसर रजईच्या उबदारपणात गुडूप होऊन जावे आणि सूर्य डोक्यावर येई पर्यंत ती रजई वितभर ही अंगावरून सरकू नये असे अनेकदा वाटले पण तसा योग आला, तो फक्त सुट्टीच्या दिवशी.

नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये एका मागोमाग एक लेक्चर झाले. वातावरणात पसरलेल्या थंडीमुळे सगळेच गारठून बसले होते. अर्ध निद्रेत सुरू असलेले लेक्चर किमान ऐकण्याचा सगळे प्रयत्न करत होते. काही दिवसांपूर्वी कॉलेज आणि डिपार्टमेंट कडून अनाथाश्रम आणि शाळांसाठी मदत म्हणून आम्ही काही डोनेशन काढले होते. ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आज दिवस होता. काहीची तिथे जाण्यासाठी निवड केली, त्यात मी ही होते. शैक्षणिक साहित्य आणि शाळेच्या आवारात वृक्षारोपण अशी दोन आवडती कामे तिथे जाऊन करायची होती, त्यामुळे उत्साह दांडगा होता. फक्त वाटप करून आणि झाडे लावून येण्याची माहिती आधी दिली होती. अचानक जाण्याआधी आम्हाला एकत्र बोलवून काही झाडे, वह्या, पेन्सिली आमच्याकडे सोपवल्या. हे सगळे करताना आपण त्यांना स्वच्छतेविषयी आणि झाडांविषयी थोडी माहिती द्यायची आहे, अशी खबर मिळाली. ती शाळा मराठी माध्यमाची होती; त्यामुळे हिंदी किंवा मराठीत हे सगळे सांगायचे होते. आजवर पूर्वतयारी करून दिलेले भाषण किंवा माहिती आठवणीत होते. अचानक तयारी न करता बोलणे अवघडच; पण त्यात ही मराठी मातृभाषा असल्याने जमेलच अशी आशा होती.

पंधरा ते वीस मिनिटात ती शाळा आलीच. पनवेलच्या झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणात मला एक अशी ही शाळा पहायला मिळाली. कौलारू छपरात झाकलेली शाळा, जाण्यासाठी लांब अरुंद वाट, लहान लहान वर्ग, शाळेसमोर छोटसं मैदान, त्याच्या कडेला वड - पिंपळाची झाडं, दगडात बांधलेलं कुंपण, जीर्ण झालेल्या वर्गाच्या भिंती. काही क्षणासाठी मला मी ग्रामीण भागात असलेल्या शाळेमध्ये आल्यासारखं वाटलं.

ती मुलींची शाळा होती. तिथे पहिली ते पाचवीच्या मुली मैदानात खेळताना दिसल्या. आम्ही जसे शाळेच्या गेट मध्ये प्रवेश केला. तसे प्रत्येकीच्या डोळ्यात आमच्या विषयी कुतूहल स्पष्ट दिसत होतं. सगळे सामान एका वर्गात ठेवून आम्ही ही मैदानावर आलो. आम्ही येईपर्यंत सगळ्या मुली एका रांगेत एका हाताचे अंतर ठेवून अगदी शिस्तीत आमच्या समोर उभ्या होत्या. आमच्यातल्या एकाने त्यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. त्यावर ही त्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिली. जवळपास दाताच्या स्वच्छतेपासून वेगवेगळी साबणाची नाव, त्यांच्या जाहिराती पर्यंत चर्चा झाली. नंतर मी त्यांना काही शब्दात झाडांचे महत्व, वृक्षारोपण म्हणजे काय ? त्याचे औषधी उपयोग वगैरे जशी आठवेल तशी माहिती दिली. कोणत्याही रीतसर प्लॅनिंग शिवाय दिलेलं हे माझं पहिलंच भाषण. आणि ते त्यांनी अगदी शांत पणे ऐकलं त्यामुळे एक वेगळाच उत्साह.

त्यांनतर आपण ज्या गोष्टीसाठी येथे आलो ती म्हणजे " झाडे लावण्याचा कार्यक्रम " पार पडला. सुरवातीला शिस्तबद्ध एका एका मुलीने येऊन मदत केली. नंतर मात्र कोणाच्या हातात कुऱ्हाड, कोणाकडे काठी, कोणाकडे झाड, कोणाकडे पाणी असे सगळ्यांचेच योगदान या वृक्षारोपणाला मिळाले. अशा प्रकारे साग्रसंगीत वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. दोन वेण्यांच्या त्या चिमण्यांचा उत्साह पाहून मला ही स्फूर्ती मिळाली. त्याच्या या अंगणात आमचं एक छोटसं रोपटं त्या रोज पाहतील, पाणी घालून त्याला जगवतील, जेव्हा त्याला बहर येईल, फुले येतील, फळे येतील, त्याची मिळणारी फळेच या उपक्रमाचे यश असेल नाही का ...!

त्यांच्या सोबत मनसोक्त खेळून झाल्यावर आम्ही आणलेला खाऊ आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खारीचा वाटा म्हणून आणलेले शैक्षणिक साहित्य त्यांना वाटलं. ते देताना ही " thank you " म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव त्यांच्या कोऱ्या निर्मळ मनाची पावती देत होते. लिहिण्यासाठी आणलेल्या पेन्सिलचे वाटप झाले, पेन्सिल वाटताना आवडत्या नावडत्या रंगावरून त्यांच्यात चाललेली चर्चा मी ऐकली. त्याची ती चूळबुळ पाहून माझ्या शाळेच्या आठवणी समोर आल्या. अचानक मोठे झाल्यासारखे वाटले. काहीच वेळात बरंच काही बद्दलल्यासारखं वाटलं. आजवर ज्या जबाबदारीचे दडपण वाटले होते. ती स्वतः हुन अंगावर घ्यावीशी वाटली. पुन्हा एकदा त्याच माझ्या शाळेच्या रस्त्यावरून फेरफटका मारावासा वाटला. सगळ्या कार्यक्रम झाल्यावर " आठवणींचा खजिना " म्हणून फोटो काढले. तो दिवस कॅमेरात कैद करून त्या मुली पुन्हा वर्गाकडे निघाल्या. जाताना त्यातल्या काहींनी बाय ताई... बाय मॅडम...म्हणत आमचा निरोप घेतला. त्यातल्याच एकीने " मला पण मोठं होऊन दुसऱ्या शाळेत जाऊन तुमच्यासारखे भाषण द्यायची, खाऊ द्यायचा ...मी तुमच्या शाळेत येऊ का ? " विचारलं. तिच्या या वाक्यावरून अचानक एवढ्या लहान वयात तिची सामाजिक जाणीव वाढल्यासारखं वाटलं. आपल्या लहानशा कृतीची दाखल इवले मन घेत असते. याची जाणीव तिच्या प्रश्नातून झाली. आम्ही ही त्यांना आनंदाने निरोप दिला. त्या गेल्यावर उरलेलं सामान आणायला आम्ही वर्गात गेलो तेव्हा त्यांच्या भरलेल्या वर्गातून येणारा गोंगाट, त्यावर शिक्षकांची त्यांच्या पुढे मागे होणारी पळापळ, रांगेत लावलेले लाकडी बेंच , काळ्या कुळकुळीत फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेला दिनविशेष आणि सुविचार, सगळ्यावर नजर गेली. एक ना अनेक प्रत्येक गोष्टीत रमायचे होते. पण निघायची वेळ झाली. मी थेट घरीच गेले. जाताना बॅगमध्ये पैसे काढायला हात घातला तेव्हा एक चॉकलेट मिळालं. ते तेच चॉकलेट होतं, जे मुलांना द्यायला आम्ही आणलं होतं आणि जाता जाता त्या मुलीने माझ्या हातात दिलं होतं. तिला आमच्या शाळेत येऊन भाषण आणि खाऊ द्यायचा होता ... हो तीच.


Monday, 5 October 2020

शाळा, शिक्षण आणि आवड

     

शेजारच्या दिनूचा के. जी च्या वर्गात प्रवेश झाला. शाळेत त्याचा पहिला दिवस होता. त्याने मलाही त्याच्या शाळेत येण्याचा हट्ट केला. मी दिनूला शाळेत सोडायला त्याच्या सोबत गेले. दिनूला वर्गात सोडून काही वेळ तिथेच रेंगाळत होते. राष्ट्रगीत आणि नंतर प्रार्थना कानावर पडली. मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. तेव्हा दिवसाची सुरवात सगळ्यांची एकत्र शाळेच्या हॉल मध्ये व्हायची. प्रार्थना, गायत्रीमंत्र आणि पसायदानाने ती व्हायची. दहा-बारा वर्षापूर्वीच्या आणि आताच्या परीस्थितीत झालेला बदल तिथे प्रकर्षाने जाणवत होता. मी तिथेच त्याच्या वर्गाजवळ उभी होते. म्हणता म्हणता त्याच्या नव्या मॅडम वर्गात आल्या. उंच, गौर वर्णीय, टापटीप टीचर ऐटीत वर्गात आल्या आणि वर्गात शांतता पसरली . शांतता जी माझ्या बालपणी क्वचितच वर्गात पाहिली होती. ती आज पहिल्याच दिवशी इथे दिसली. मुलांची ओळख हि झाली. ती ही इंग्रजीत आणि आश्चर्य म्हणजे मुलं देखील भलत्याच आत्मविश्वासामध्ये बोलत होती. जणू काही आधीच आई- बाबांनी सारी उजळणी करून पाठवले असावे. माझ्या बालपणी शाळेचा पहिला दिवस म्हणजे घरच्यापासून दूर जाताना विरहाचे अश्रू आणि ते थांबवण्यासाठी शिक्षकांचे अविरत प्रयत्न. मी हे बदललेलं चित्र पाहून चाटच पडले.

काळ्या कुळकुळीत पाटीच्या जागी वह्या-पुस्तके आली. फळ्याच्या जागी प्रोजेक्टरचे पडदे आले. भिंगाचा चष्मा घालणाऱ्या आणि सतत धपाटे देणाऱ्या मास्तराच्या जागी मॅडम आल्या. आता मुलांच्या हाती तासाला स्मार्ट फोन आले तरी त्यात काही नवल नाही. शिक्षण पद्धतीत हा वाऱ्याच्या वेगाने होणारा बदल लक्षणीय आहे.

तीन – साडे तीन वर्षाची चिमुकली सुद्धा अल्फाबेट आणि पोएम इतक्या वेगाने म्हणतात कि पुढची पिढी आईन्स्टाईन ची असेल असं वाटत. लहान वयातच एवढे सारे कळते. समजते यात आनंदच आहे. परंतु या बौद्धिक आणि शैक्षणिक स्पर्धेत जगण्याची मजा आणि भाबडी निरागसता कुठेतरी हरवणार नाही ना...असे ही प्रश्न पडतात. मुलांच्या न कळत्या वयात त्यांच्या भविष्याची रूपरेषा पक्की करण्यासाठी कधी अजाणतेपणी त्यांचे निरागस बालपण तर हरवत नाही ना... छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद त्यांना अनुभवता येईल का? मोठ्या स्वप्नाच्या मागे धावण्याचे धडे त्यांच्या मुखोदगत असतील का? आनंद आणि समाधानाच्या व्याख्या त्यांच्या कशा असतील? फक्त बौद्धिक क्षमतावर उजवे डावे ठरवून पुढे त्याच निकषांवर करियरची दिशा ठरवली जाणार का? त्यांच्यातल्या कला कौशल्याबद्दल त्यांना स्वतः ला ओळख असेल का अशी शक्यतांची यादी मनोमन होत जाते.

आजच्या प्रात्यक्षिक आणि स्कील डेवलपमेंट च्या युगात ज्या झपाट्याने तंत्रज्ञान वाढत आहे; त्याच वेगात आपली स्वप्न हि आणखीन मोठी मोठी होत आहेत. विकासाची कास धरून आपली प्रगती करण हे जरी आपले ध्येय असले तरी या अमूल्य जीवनाचे यांत्रिकीकरण किती व्हावे? हे ही आपल्या मनाला विचारण्याची वेळ आली आहे.

तेवढ्यात एक बाई माझ्या जवळ आल्या आणि मला वर्गांवर शिकवायला जायला सांगितले. मी त्यांना खुलासा केला. दिनूला सोडायला मी इथे आले ते सांगितले. त्यांना मी तिथली शिक्षिका वाटले. हे सांगितल्यावर त्या ही हसल्या आणि मी ही तिथून पाय काढला. शाळा भरल्याची बेल वाजली आणि मुलांनी भरलेल्या त्या वर्गात डोकावून दिनू चा निरोप घेऊन मी तिथून निघाले.


Saturday, 3 October 2020

पुस्तक मनोगत : गोष्टी माणसांच्या

 “ गोष्टी माणसांच्या “ हे नुकतंच वाचनात आलेलं पुस्तक. मूळ लेखिका सुधा मूर्ती. लीना सोहोनी यांनी अनुवादित केलेले इंग्रजीमध्ये असलेलं मूळ पुस्तक “ how I tought my grandmother to read stories “

विचारांना भाषिक भिंत मुळी नसतेच. हे त्यातील एक एक पान वाचताना जाणवते. त्यातले मर्म हे तसेच स्थायी असते.

सुधा मूर्ती यांनी आपल्या आयुष्यातील निवडक प्रसंग गोष्टी रूपात या पुस्तकात मांडले आहेत. सुधा मूर्ती यांच्या विषयी लिहिण्याचा मोह आवरला नाही आणि पेन- वही समोर घेऊन लिहायला सुरुवात केली.

पुस्तकाच्या सुरुवातीला अर्पण पत्रात वाचायला मिळते “ माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना ...ज्यांच्या मुळे या वयातही माझं मन तरुण राहिलं आहे. “ हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव ह्या पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत आपल्याला जाणवतो. सुरवातीची पाने वाचताना मी माझ्या गावी पोहोचले. लहान असताना सुट्टीत दूरदर्शनवर पाहिलेली कथा सरिता आठवली. त्या पुस्तकात केलेले वर्णन त्यामुळे हुबेहूब डोळ्यासमोर आले. त्यात आपलं ही बालपण शोधण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला. सगळी पात्र आपोआप समोर उभी राहिली.

      निरक्षरतेवर भाष्य करणारा पहिला भाग म्हणजे सुधा मूर्ती यांची संघर्षाची आणि साक्षरतेची पहिली लढाई होती. त्यांची पहिली वहिली विद्यार्थीनी त्यांची आजी होती. याची सुरुवात साप्ताहिकातील गोष्टीतून झाली. आजीला काशी यात्रेला जाण्याची प्रचंड इच्छा पण त्या काशीचे दर्शन आजी साप्ताहिकात छापून आलेल्या एका काशिक्षेत्रे या कथेतुन घेत होती. ती कथा सुधा जी त्यांना वाचून दाखवत. एक दोन दिवस सुधा घरी नसल्याने काशीक्षेत्रे पुढे वाचले गेले नाही. त्या साप्ताहिकातील काशिक्षेत्रे या गोष्टीतल्या दुमडलेल्या पानावर हात फिरवताना आजीला आपण निरक्षर असल्याची खंत वाटली. आपल्याला अक्षर ओळख नाही म्हणून तिच्या डोळ्यातून पाणी आले आणि त्याच जिद्दीने तिने परातीतल्या धान्यावर, पिठावर गिरवून अक्षर ओळख शिकून घेतली. हळूहळू त्यात सातत्य येत गेले आणि आजीने काशिक्षेत्रेचा शेवटचा भाग वाचून दाखवला. त्या क्षणी आजीच्या डोळ्यात पाणी होते.

     आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती मग ते ज्ञान पिपासू कलाम असतील नाहीतर पहिल्या महिला इंजिनियर कर्मचाऱ्यांवर विश्वास टाकणारे जे आर डी टाटा. या प्रवासात भेटणारे सर्व दिग्गज व्यक्ती आणि आपले विद्यार्थी. प्रत्येकाने सुधाजींना लिहीण्यासाठी, नवे टिपण्यासाठी प्रवृत्त केले आहे.


यात फक्त त्यांचे अनुभव त्या सांगत नाही तर त्यातून काय घ्यायचे ते त्याच्यातली शिक्षिका शिकवते. एक उद्योजिका त्यातून यशाचा मंत्र देते. टेल्को कंपनीतली पहिली महिला कर्मचारी हे श्रेय आहे पण जे आर डी टाटा यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास इथे त्यांना जास्त महत्वाचा वाटतो. नारायण मूर्ती फक्त आपले जोडीदार नाही तर त्यांच्यात खूप चांगला मित्र त्यांना भेटतो. त्यात ही आपले स्वप्न “ इन्फोसिस “ साकार होत असताना आलेल्या अडचणी त्यांना आणखी खंबीर करतात.

     रशियातील विशिष्ट पद्धतीने केलेला लग्नसोहळा आणखी एक विशेष आठवण, लग्नानंतर सहसा मंदिर, देवस्थान गाठले जाते. तर इथे मात्र सगळ्या जवानांना आदरांजली या निमित्ताने देण्याची पद्धत होती. देशासाठी बलिदान देऊन अमरत्व मिळालेल्या जवानांच्या प्रति संवेदनशीलता दाखवणारी ही प्रथा इथे त्यांना दुर्मिळ वाटते. इतर देशातील टापटीपपणा, स्वच्छता, यश आणि अपयश, पैसे त्यापेक्षा त्यांना आपले ऋणानुबंध, आपल्या देशातील लोकांचा दानशूर, कनवाळू स्वभाव जास्त भावतो. प्रत्येक “ का “ ला कारण शोधण्याची वृत्ती बरोबर की चूक ? हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावताना त्यांनी दिलेली उदाहरणे वाचता वाचता आपण आपल्या ही अनुभवाशी सहज रिलेट करू लागतो.

     एका ठिकाणी रक्ताच्या नात्यामध्ये कलहाचे सुर आणि दुसरीकडे तान्ह्या बाळाची भूक भागवण्यासाठी दूध पाजून आपसूक जोडले गेलेले एक नाते. वेगळ्या दोन कुटुंबातील एकत्र झालेले दोन “ दूध भाऊ “ यातला फरक आपल्याला नात्यांची ओढ शिकवून जातो. परोपकारी वृत्ती आणि अति धनसंचय त्यामुळे विस्कटलेले आयुष्य. चुकांमधून शिकण्याची वृत्ती, संकटातही हसण्याची कला, जबर इच्छा शक्ती आणि सहृदय भाव. कामावरची निष्ठा आणि त्यातून मिळणारा आनंद अशा बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या कथेच्या रुपात मांडून व्यक्तिमत्व विकास, जीवनमूल्य शिकवत बलशाली मनाचा पाया सुधा मूर्ती यांनी रचला आहे.

      आयुष्यात येणारे समाधान, तृप्ती, लाल भाताच्या कणगीच्या निमित्ताने शिकलेले दानाचे महत्व आपल्यात आपसूक झिरपत जाते. एक उत्तम मार्गदर्शक, समाजसेविका, एक शिक्षिका आणि एका मोठाल्या संस्थेला, माहिती आणि तंत्रज्ञानातील विश्वाला आपला बहुमोल वेळ देऊन कामात स्वतः ला वाहून घेणारी ही उद्योजिका. सोबत कुटुंबाचा भाग सांभाळत सामाजिक भान ठेवणारी प्रेरणादायी महिला. मुलाच्या सुयोग्य संगोपनात ही आनंद मानणारी आई. सुधा मूर्ती. आजीला बाराखडी शिकवण्यासाठी उचललेली लेखणी आणि पुढे विश्वाला अनुभवाची शिदोरी देणारी लेखिका असा त्यांचा प्रवास पुढे येणाऱ्या स्वप्नाळू, मेहनती, महत्वाकांक्षी मुलांपर्यंत, युवकापर्यंत पोहोचावा यासाठी हा छोटासा प्रयत्न.


      

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...