Friday, 20 February 2026

निवडुंग


खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवरून हात फिरवताना मनात विचार आला. झाडांत आणि आपल्यात कसे साम्य आहे?  त्यावर जो विचार मनात आला तो मी लिहून काढला. तर त्याची सुरुवात एका गोष्टीने झाली.

एकदा एका शाळेत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जात होता.  शाळेच्या मैदानात विद्यार्थी सोबत आणलेली इवली इवली रोपं मातीत रोवत होते. हा दिवस होता " जागतिक वृक्षारोपण दिन." त्यात सगळ्यांनी आपापल्या घरून एक एक झाड आणले होते.  गुलाब, मोगरा, झेंडू, चिकू, आंबा, वडाचे झाड अशी वेगवेगळी झाडं होती.

दिनूने निवडुंगाचे झाड आणलं होतं. ते इतर झाडांपेक्षा वेगळं होतं. ते झाड लावताना सुद्धा मुलांना त्याचे काटे लागले. शेवटी बाईंनी ते काळजीपूर्वक लावले. दिनूचे झाड इतर झाडांपासून वेगळे थोडया अंतरावर लावण्यात आले. त्यावर तो निराश होऊन एकटाच शिडीवर जाऊन बसला. यावर त्याच्या बाई त्याला म्हणल्या. "  निवडुंगाचे झाड सुद्धा इतर झाडांसारखं झाड आहे... दिनू , त्याला सुद्धा पान, मूळ आणि खोड आहे बघ... प्रत्येक झाड त्याचं वेगळेपण घेऊन येतं. कोणी अगदीच लहान, कोणी अगदी मोठं.  फुलं आणि काटे हे झाडाचे वेगवेगळे भाग आहेत. ते गुलाब पहा. त्याला सुद्धा काटे आहेत. स्वतःला जपण्यासाठी त्याने हे काट्याचे आवरण स्वतःकडे घेतले. तसंच हे तुझं वेगळं झाड... आपण ते सुद्धा लावलं आहे आणि त्याचं पण वेगळं महत्व आहे. तु त्याची काळजी घेशील तसं ते वाढणार. आता मुलांनो तुम्ही जशी काळजी घेणार आणि त्याला जपणार ते झाड तसं वाढणार, म्हणजे तुमचं काम अजून पूर्ण झालं नाही. " सर्व मुलांनी एका स्वरात "हो... " म्हणले. मुलं झाडं लावून आपल्या वर्गात परत गेली.
 
खरंच जशी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत. त्यांच्यात दडलेलं त्यांचं वेगळेपण आहे. तसेच आपले वेगवेगळे स्वभाव असतात. आपलं एक वेगळेपण असतं. कधी सुंदर, कधी औषधी, कधी स्थिर, कधी प्रवाही, कधी तीक्ष्ण, कधी कोमल तर कधी सावलीसारखे शीतल आणि शांत. झाडातले वेगळेपण शोधता शोधता आपल्यातल्या वेगळ्या गोष्टी आपसूक कळू लागल्या. त्यांच्यातलं आणि आपल्यातलं साम्य कळत गेलं. ऋतूप्रमाणे बदलणारी ती झाडं आणि परिस्थितीनुसार बदलणारे आपण... हा निसर्गाचा नियम प्रत्येकाला लागू पडतो. झाडाची एक विशिष्ट जागा असते जिथे त्याला सुपीक माती आणि वातावरण मिळते, तिथे ते सहज वाढते. आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात, आवडीच्या जागी तेवढेच सहज रूळतो आणि प्रगती करतो.

निवडुंगाला काटे का असतात? त्याच्या संरक्षणासाठी, दुष्काळी वातावरणात तग धरून ठेवणारे हे झाड.  अडचणीच्या काळात स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकवणारे हे झाड म्हणजे निवडुंग. 

आपण आपल्या भोवताली संघर्ष करणारी माणसे पाहतो. त्यांना यशस्वी होताना पाहतो. ती वेळ आणि त्यांचे संघर्ष म्हणजे कुठे तरी हे काट्याचे आवरण म्हणूयात. जे त्यांचे संरक्षण करत असते. त्याचे ते वेगळेपण कशासाठी आणि कशामुळे हे समजलं कि आपण त्या काट्यात ही सौंदर्य शोधतो. तेव्हा वेगळे वाढलेले झाडं ही आकर्षक वाटू लागते. 

Thursday, 19 February 2026

लोक कल्याणकारी समाजसुधारक : छत्रपती राजर्षी शाहू महाराज

        छत्रपती – राजर्षी शाहू महाराज , कोल्हापूर संस्थानाचे लोक कल्याणकारी समाजसुधारक. त्यांच्या कर्मभूमीत म्हणजे कोल्हापुरात मी काही दिवस वास्तव्याला होते. त्यांच्या विषयी आणखी जाणून घेण्यासाठी नामी संधी होती. जेव्हा मी तिथला भोवताल पाहिला, तेव्हा तिथली लोकांची मातीशी जोडली गेलेली नाळ प्रकर्षाने जाणवली आणि तिथल्या मातीत भिनलेला झुंझारपणा प्रत्येक ठिकाणी दिसला. आज यावर लिहीताना ती ऊर्जा मला आणि माझ्या लेखणीला ही मिळाली. एक संपूर्ण दिवसाचे नियोजन होते. त्यात एका दैदीप्यमान व्यक्तिमत्वाचा अभ्यास सुरु होता.
राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी सांगायचे तर त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अस्पृश्यता निवारण, बहुजन शिक्षण, समान न्याय हक्क, सामाजिक समानता, आंतरजातीय विवाह, शेती आणि विकासकामे अशी असंख्य समाजपयोगी कामे केली. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना “ राजर्षी “ पदवी बहाल केली. त्यांचा जन्मदिवस २६ जून हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्याविषयी अधिक माहिती मला या पुढच्या प्रवासात मिळाली.
कोल्हापूरचे एक प्रसिद्ध ठिकाण... ऐतिहासिक दस्तऐवज जिथे संग्रही ठेवले आहेत असे एक भव्य संग्रहालय असलेले न्यू पॅलेस पाहण्याचा योग याच दरम्यान आला. तिथे पोहोचल्यावर भव्य प्रवेशद्वारातून आत जाताना मी कधी त्या काळात गेले कळले नाही. तिथे पाहिलेल्या प्रत्येक वास्तूवरचे नक्षीदार कोरीव काम असामान्य होते. सौंदर्य आणि सुबकता याचा सुरेख संगम इथे पाहायला मिळाला. त्यांनी वापरलेल्या लहानात लहान वस्तूपासून ते त्याच्या भव्य सागवानी बैठकीपर्यंत सगळे ऐतिहासिक वारसा जपत होते. एका हुबेहूब खोलीची रचना तिथे केली होती. जागच्या जागी सर्व मांडलेले होते. नक्षीदार आणि उंच असा आरसा तिथे ठेवलेला होता. त्या भव्य आरशामध्ये राजेशाही पेहरावात आपले तेजस्वी व्यक्तिमत्व न्याहाळणारा छत्रपती आजही तिथे असल्याचा भास होत होतो. नंतरच्या दालनात युद्धासाठी लागणाऱ्या सर्व शस्त्राची मांडणी केलेली होती. त्या काळच्या लहान मोठ्या बंदुका, वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी, ढाली, खंजीर, दांडपट्टा, वाघनखे, तोफा, दारुगोळा, लाठीकाठी आणि असे बरेच काही त्यांच्या लढवय्या व्यक्तिमत्वाचे दाखले देत होते. राज्याची सुरक्षितता आणि श्रीमंती या दालनात कळली. त्या काळी प्राण्यांची शिकार करणे सुद्धा योद्धाचे लक्षण मानले जात. त्यामुळे शेजारी असलेल्या दालनात टॅक्सीडर्मी पद्धतीने जतन केलेले प्राण्यांचे अवशेष मांडलेले होते. त्यात रानगेंडे, रान गवा, डुक्कर, जंगली मांजर, वाघ, हरणे असे प्राणी पहायला मिळाले. शाहू महाराजांनी खेळांना आणि कलाकारांना मानाचे स्थान दिले. त्या वेळी खेळले जाणारे खेळ जसे सारीपाट, कवड्या, लाठीकाठी, बुद्धिबळ, भालाफेक, दांडपट्टा, गोफण तिथे पाहायला मिळाले. पुढच्या दालनात छत्रपती शाहूंनी काढून घेतलेले तैल चित्र, पोट्रेट होते. तेव्हाचे चित्रातले रंग आज ही ठळक आणि उठावदार होते. त्यावेळची कलाकारांची त्यातील सूक्ष्म दृष्टी असामान्य होती आणि आश्चर्य चकित करत होती. पुढच्या भव्य महालात सागवानी फर्निचर आणि काचेच्या झुंबराखाली आखीव-रेखीव मांडलेले सभा मंडप होते. समोर नक्षीदार सिंहासन होते. ते शाहू महाराजांच्या तिथल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते.
पूर्ण संग्रहालय पाहून झाले. या प्रवासात छत्रपती शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व समजत गेले. त्यांची राजनैतिक आणि समाजाभीमुख कारकीर्द कळली आणि क्रांतीची ज्योत आणि सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन आम्ही माघारी आलो.

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...