डायरीतल्या आठवणी आणि अनुभव याचा एक किस्सा. प्रत्येक वेळी नव्याने उलगडत जाणारी माझी डायरी आणि त्यातले एक " आठवणीतले पान " - जुईली अतितकर
Tuesday, 27 January 2026
" काव्यजुई " पुस्तक प्रकाशन
Monday, 26 January 2026
आजीची सखी
सखी चतुर्थीच्या सुट्टीची दरवर्षी आतुरतेने वाट पाहायची. गणपती बाप्पा हे एक आकर्षण होतेच पण त्याहून मोठे आकर्षण म्हणजे गणपतीची सुट्टी सुरु झाली कि आजोळी कुडाळला धूम ठोकायची. आजी आजोबांच्या टूमदार कौलारू घराचे दरवाजे चतुर्थीला सखीची वाट पाहत असायचे. सखीचे बालपण शहारातल्या सुखवस्तू त्रिकोणी कुटुंबात गेल्याने अपार्टमेंटच्या बाहेरचे गावपण तिला आजोळी सापडायचे. आवडायचे ही.
कालाय तस्मै नमः
वेळ हि कोणासाठी अगदी लहान सुईसारखी तर अगदी लांब हनुमानाच्या शेपटी सारखी आहे. कोणासाठी त्यांचे कामाचे नियोजन म्हणजे वेळ तर कोणासाठी आयुष्याचे रिकामपण म्हणजे वेळ. कोणी मिनिटावर ती कमावतो तर कोणी तासावर. कोणी तिच्या मागे हि धावणारा, कोणी तिच्या पुढे हि धावणारा, कोणी भूतकाळात थांबलेला तर कोणी भविष्यात रमणारा. प्रत्येकासाठी वेळ हि वेगळे रूप घेऊन येते. वेगळे अनुभव घेऊन येते, तरीही वेळ कोणासाठी थांबत नाही. मग हि वेळ कधी बंद गुहा वाटते जी भरपूर रहस्यांनी भरलेली असते. कधी ती वादळीवाऱ्यासारखी वाटते, अमर्याद वेगात येणारी आणि सर्वदूर जाणारी. क्षणात विलुप्त होणारी. आपत्तीसारखी परीक्षा घेणारी आणि शांत झाल्यावर सारे मळभ दूर करणारी.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वेळेचे महत्व सांगताना म्हणतात, वेळ हि नदी सारखी आहे, नदीचा प्रवाह सतत बदलल्याने तुम्ही त्याच पाण्याला दुसऱ्यांदा स्पर्श करू शकत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही तेव्हा आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. हे सांगताना ते पाण्याचेच उदाहरण देतात ज्याप्रमाणे पूर आल्यावर मासे कीटकांना खातात त्याउलट दुष्काळ पडल्यावर कीटक मासे खातात. वेळ हि प्रत्येकासाठी संधी घेऊन येते. आपल्याला त्या संधीची वाट पाहता आली कि बदल दिसतो. अपयशाचे रूपांतर यशस्वी जीवनात होते. निराशेच्या जागी आशावादी विचार येतात. दुर्लक्षित गोष्टी प्रकाशात येतात. आणि हि जादू फक्त आपण दिलेल्या वेळेत असते. वेळ मला हि वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहासारखी वाटते. ज्याप्रमाणे नदी सतत प्रवाही असल्याने नदीला नवं निर्मितीचे वरदान आहे. तसेच वेळ सुद्धा पुढे पुढे सरत जाते, नवनिर्मितीचे वरदान घेऊन येते. नदीचा प्रवाह लहान असो किंवा मोठा तो मधेच थांबला तर त्याचे डबके होते तसेच वेळेचे आहे. कोणी वेळेसाठी थांबले तर हळूहळू निष्क्रियतेचे डबके झाल्याशिवाय राहत नाही. असा हा वेळेचा महिमा आपल्याला अनेक उदाहरणांवरून समजत जातो. आपले आजूबाजूचे जग, आपली दैनंदिन कामे, असंख्य पुस्तके या वेळेचे गणित आपल्या समोर मांडत असतात. आपण रोज ते आव्हान स्वीकारत असतो. त्यातून शिकत असतो.
कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी वेळ लागत नाही, वेळ लागतो तो त्याचे निष्कर्ष समोर येण्यासाठी. त्यातूनच आपण संयम शिकत जातो. त्याचे महत्व निसर्ग सुद्धा पावलो पावली आपल्याला सांगत असतो. वेळेचे महत्व सांगण्यासाठी ऋतुचक्राचे जाते फिरते. दिवसाची रात्र होते. रात्रीचा दिवस होतो. रोपट्याचे झाड होते. कळीचे फुल होते. जेव्हा मातीत बी पेरली जाते तेव्हापासून ते त्याचे झाड होण्यापर्यंत, त्याला फळे , फुले येण्यापर्यंतचा प्रवास हि वेळ सांगत असते.
वेळेविषयी आणखी उलगडून सांगणारे अनेक संत महात्मे मला आठवतात, उदाहरणच द्यायचे झाले तर लहानपणासून ऐकण्यात आलेले श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक या वेळेविषयी किती सुंदर अर्थबोध सांगतात ,
मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें॥
आपण आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला थोपवून ठेवू शकत नाही. कधी सुखाचे क्षण तर कधी अडचणींचे प्रसंग येतच असतात. अशा वेळी चिंताग्रस्त झालेल्या मनाला दिलासा देणारे सत्य म्हणजे जे विधिलिखित ते होणारच आहे, त्यामुळे त्याचा स्वीकार करून जगणे, मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड, खेद, आकस न बाळगता त्या वेळेला शरण जाणे त्यातून तरून जाणे हेच जीवनाचे सार आध्यात्मापासून ते वैज्ञानिक विचारधारेतून सांगितले आहे.
अँपल चे सह संस्थापक स्टीव्ह जॉब वेळेचे गणित सोडवताना एके ठिकाणी म्हणतात, तुम्हाला मिळालेली वेळ हि मर्यादित आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणासारखे जगण्यात वाया घालवू नका. इतरांच्या विचार सरणीचा परिणाम तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या ध्येयावर होऊ देऊ नका. तुमच्या क्षमता इतरांच्या मतावर ठरवू नका. आणि सगळ्यात महत्वाचे तुमच्या मनाचा आवाज ऐका, कारण त्याला बरोबर माहिती असते, तुम्हाला नक्की काय हवे. यावर जेव्हा आपण विचार करू लागतो त्यानंतर हा आत्मशोध आपल्याला तिथवर नेऊन पोहोचवतो जिथे हि वेळ आपल्या सोबत असते. आपली ओळख होऊन, आपली जवळची मैत्रीण होऊन, एका आनंदी जगात ती स्थिर होते.
जसा काळ जातो, तसे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे चित्र बदलत जाते. कुणाचे जुने सल भरून निघतात, कुणी नवी नाती जोडतात. कोणासाठी तोच तो प्रवास असतो, कुणासाठी आयुष्याची नव्याने सुरुवात असते. कोणी अडचणीतून पुढे येताना दिसतो, कोणी नवा शोध लावतो. या प्रवासात कोणाचा नव्याने शोध लागतो. चित्र बदलत जातात. माणसे बदलत जातात, कारण वेळ बदललेली असते. अल्बर्ट आईनस्टाईन वेळेचे कारण सांगताना म्हणतात, " सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला होऊ शकत नाही म्हणूनच वेळ हि महत्वाची. " या काळाच्या, बदलत्या वेळेच्या शक्तीला वंदन करून येणारा प्रत्येक क्षण भरभरून जगूया.
जागतिक पुरुष दिन : मोव्हेंबर
समाज सुशिक्षित व विकसित होण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातील माणसे एकत्र येतात तेव्हाच हे साध्य होते. विकसित देशात सातत्याने कार्यरत असणारे आणि उच्च स्थान गाठणारे यशस्वी पुरुष किंवा खेडेगावात मोलमजुरी करणारे मजूर कुठल्या ना कुठल्या मानसिक व शारीरिक व्याधीनी ग्रस्त आहेत. त्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक निराषेतून आत्महत्येची पायरी गाठली जाते. अशा वेळी त्यांना साहाय्य करण्यासाठी त्यांचे कुटुंब असते. त्यासोबत अनेक संस्था, समुपदेशक पुढे येतात. जागतिक पुरुष दिनानिमित्त पुरुषांच्या आरोग्यासाठी हा दिवस जगात साजरा होतो.
जगभरात हा संपूर्ण महिना वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा केला जातो. मोवेंबर फाउंडेशन यात सक्रिय योगदान देते. याची सुरुवात २००३ मध्ये मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे झाली. ३० जणांच्या साहाय्याने सुरु केलेली ही वाटचाल आता ६ दशलक्ष लोकांपर्यंत पर्यंत पोहोचली आहे. त्या संस्थेमार्फत पुरुष वर्गात मानसिक, शारीरिक स्वास्थ्याविषयी जनजागृती केली जाते. त्यात मुख्यत्वे पुरुषांना होणारे गंभीर आजार जसे टेस्टीक्युलर कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, वाढते आत्महत्येचे प्रमाण, नैराश्य व अन्य विकार यांचा समावेश आहे. यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याचे लवकर निदान करून त्यावर वेळीच उपचार करणे, गरजूना मदत करणे अशी कामे या संस्थेमार्फत होतात. ऑस्ट्रेलिया मध्ये पुरुष संपूर्ण महिनाभर मिशा वाढवतात. मिशी वाढवणे ही त्याची खूण मानली जाते. त्यांच्या भाषेत मो म्हणजे मिशी. पुढे या नोव्हेंबर महिन्याला मोवेंबर संबोधले गेले. हळूहळू याची दखल इतर देशात ही घेतली गेली. त्यात डेंमार्क, कॅनडा, जर्मनी, स्पेन, न्यूझीलंड, नॉर्वे, यू. के, यू. स, स्विडन, आयरलंड या सारख्या देशांचा समावेश आहे. जगभरातून या कार्यासाठी देणगी दिली जाते. या फाउंडेशन च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात, ज्यात लोक सहभागातून माणसे एकमेकांशी जोडले जातात. त्यांचे हे कार्य पुरुषांच्या प्रति समाजात सकारात्मक विचार रुजवत आहे.
निरोगी समाजाचा पाया म्हणजे स्त्री आणि पुरुष. धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे ही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी उचललेले हे एक पाऊल येणाऱ्या आव्हानासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
संदर्भ : Movember Foundation
Movember - changing the face of men's health - movember
जादुचे पेन
एकदा खूप पाऊस पडत असताना इमा दुपारी तिच्या आजीच्या खोलीत आली. तिने तिच्या आजीच्या कपाटातील एक गुप्त कप्पा उघडला. तो कप्पा आवरताना तिला त्याच्यात एक सोनेरी रंगाचे पेन पडलेले दिसले. उत्सुकतेने तिने ते पेन हातात घेतले आणि निरखून पाहिले. त्या पेनाच्या एका बाजूला कोरले होते ते तिने वाचले " या पेनाचा योग्य वापर करून लिहा आणि ते शब्द खरे होतील " हे वाचल्यावर आश्चर्यचकित होऊन तिने ते पेन आपल्या खोलीत आणून एक कथा लिहायला घेतली. त्या कथेत एका लहान मुलीला तिच्या अंगणात एक मौल्यवान खजिना मिळतो. असा त्या कथेचा शेवट होता. कथा लिहून झाल्यावर चमत्कारिक गोष्टी घडायला सुरुवात झाली. बाहेरच्या अंगणातील जमीन हलायला लागली आणि थोड्याच वेळात एक सोनेरी पेटी तिथे प्रकट झाली. ती पेटी पाहून चकित झालेली इमा बाहेर अंगणात धावत आली. तिने ती पेटी हातात घेतली आणि उघडली. त्यात तिला चमकणारे आकर्षक असे खडे मिळाले. ती तिच्या खोलीत धावत आली. ती मनातल्या मनात म्हणाली, "खरंच हे पेन लिहिलेल्या सर्व गोष्टी खरे करेल?"
पुढच्या काही दिवसात इमाने वेगवेगळ्या गोष्टी लिहून पाहिल्या. तिने एका कुत्र्याशी मैत्री करण्याबद्दल लिहिले आणि त्याच दिवशी एक गोंडस कुत्र्याचे पिल्लू तिच्या दाराशी आले. नंतर तिने प्रकाशमान दिवसांविषयी लिहिले आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी सुरु असलेला पाऊस थांबला आणि स्वच्छ निरभ्र आकाश दिसू लागले.
एकदा इमाने तिच्या या जादुई पेनाबद्दल आपल्या जिवलग मित्राला मॅक्सला सांगायचे ठरवले. एका संध्याकाळी तो घरी आला. तेव्हा तिने त्याला ते पेन दाखवले. त्या पेनाची जादू सांगितली. मग दोघांनी मिळून कलात्मक, सुंदर, संवेदनशील गोष्टी लिहायला सुरुवात केली, जसे की त्यांच्या शाळेत फुलझाडे लावणे, एकटे पडलेल्या माणसांना मित्र भेटणे अशा अनेक गोष्टी त्यांनी लिहिल्या.
अचानक एके दिवशी इमा आणि मॅक्स यांच्यामध्ये भांडण झाले. पुढचा मागचा विचार न करता इमाने त्या पेनाने लिहिले " जोपर्यंत मॅक्स माझी माफी मागत नाही, तोपर्यंत त्याचा आवाज बंद होईल " त्या क्षणी मॅक्सचे बोलणे थांबले. तो अचानक शांत झाला. तो शांत झाल्याने इमा पुरती घाबरली होती. त्याचा आवाज कायमचा जावा असे तिला अजिबात वाटत नव्हते. लगेच तिने त्याची माफी मागितली आणि वहीवर लिहिले " मॅक्स चा आवाज पुन्हा यावा " मॅक्स पुन्हा बोलू लागला. तोही सुरुवातीला घाबरला होता. नंतर दोघेही हसायला लागले. तेव्हाच त्यांनी या पेनाने दुसऱ्याच्या हिताचे आणि चांगलेच लिहायचे ठरवले. नंतर बरीच वर्ष गेली. इमाने ते पेन सुरक्षित आणि गुप्त ठेवले जेव्हा एखाद्याला चांगल्या कामासाठी त्याची मदत होईल तेव्हाच तिने ते वापरले. इमाकडे असलेले पेन जरी जादूई आणि अद्भुत असले तरी खरी जादू ही संवेदनशील शब्दात आणि इतरांना मदत करण्यात आहे हे इमाला कळले होते.
Friday, 23 January 2026
खारी बिस्कीट
Thursday, 22 January 2026
क्षमा
वंदनाचा वाढदिवस होता. विजय आणि मैत्रेयी सेलिब्रेशनच्या तयारीत होते. वंदना आणि विजय यांची मुलगी मैत्रेयी असे हे त्रिकोणी कुटुंब पुण्यात राहत होते. विजय खुप चांगला आर्टिस्ट – चित्रकार होता. वेगवेगळे पोर्ट्रेट काढून त्याचे प्रदर्शन तो आर्ट गॅलरीत भरवत असे. लोक आवडीने त्यानी काढलेली चित्र विकत घेत असत. वंदना म्हणजेच मैत्रेयीची आई, गायिका होती. शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम ती करत असे. विशेष म्हणजे यंदा वाढदिवसाच्या दिवशी तिचा गाण्याचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमात तिचा जाहीर सत्कार ही होणार होता. विजयला वंदनाच्या गाण्याचे आणि आवाजाचे कौतुक होते. वंदनाच्या आवाजाच्या प्रेमातच तो सुरुवातीला पडला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिचा सत्कार होणार म्हणून तो ही खुश होता. त्यामूळे त्या दिवसाची तिची जोरदार तयारी सुरू होती. तिला आपण रात्री बाराला सरप्राईज देऊ असा विजयचा बेत होता. त्यासाठी विजय वंदनाची नजर चुकवून ती तयारी करत होता. वंदना तिच्या कार्यक्रमाची तालीम करत होती. मैत्रेयी तशी अजून फार लहान होती. अजाणती होती. त्यामुळे बाबा सांगेल ते छोटं छोटं काम करून ती सेलिब्रेशन मध्ये हातभार लावत होती. बघता बघता रात्रीचे साडे अकरा वाजले. बाहेरच्या लॉन मध्ये सगळी मांडणी करून झाली. मैत्रेयी झोपाळ्यावर खेळत बसली होती. शेजारी त्यांचा कुत्रा रुसी आपले पाय दुमडून झोपला होता. अवघ्या काही क्षणात वंदना तिथे येणार होती. टेबलावर सुरेख असा केक आणून ठेवला होता. केकच्या बाजूने आकर्षक मेणबत्याची रोषणाई केली होती. त्यामुळे केक अधिक उठून दिसत होता. बाजूला रंगीत फुलं ठेवली. झोपाळा ही सजवला. आता फक्त एकच गोष्ट राहिली. आपण स्वतः तयार केलेली भेट आणायला तो घरात गेला. मैत्रेयी झोपाळ्यावर बसून केककडे पाहत होती. तिला कधी एकदा वंदनाला सांगते असे झाले होते.
वेल
प्रियाने विचारलं " का गं... तू बरी आहेस ना... काही प्रॉब्लेम आहे का.. एवढा कसला विचार करतेस? " प्रियाने सुलभाचा हात धरला आणि तिला पुन्हा भानावर आणले. तिच्या मनात अनेक प्रश्न होते. सुलभाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. सुलभा सांगत होती " प्रिया, माझे लग्न ठरले. कालच तारीख ठरवली. " लग्न ठरल्याची बातमी ऐकून प्रियाने तिचे अभिनंदन केले. तिला म्हणाली, " ही तर आंनदाची बातमी आहे... तू तर खुश व्हायला हवे... सुलभा... "
सुलभा म्हणाली, "हो गं... मी खुश ही आहे आणि थोडी चिंता ही वाटते. पुन्हा नवी सुरुवात करायची आहे, माझ्या आयुष्यात बदल ही होईल. त्या नव्या बदलाची ही हुरहूर मनाला लागली आहे. "
तिचे बोलणे मध्येच थांबले. त्या दोघी जिथे उभ्या होत्या. तिथे शेजारीच सुपारीचे उंच झाड होते. त्या झाडाला वेटोळे घालून वर गेलेली गडद जांभळ्या रंगाची गोकर्णाची वेल होती. दोघी त्या वेलीकडे पाहू लागल्या. प्रिया म्हणाली, " ही नाजूक वेल सुपारीच्या खांबासारख्या झाडाशी किती एकरूप झाली बघ, लग्न म्हणजे असंच समीकरण असतं, आपलं वेगळेपण सोबत घेऊन एकरूप होणं... बरोबर ना " प्रिया पुढे म्हणाली " कदाचित या वेलीला माहिती असावं. आपल्याला वर वाढत जायचे तर त्या झाडाचा आधार घ्यावा लागेल, आपल्या मुळापासून अगदी लांब वाढलेली ही वेल आपला भाग नसलेले हे सुपारीचे झाड आपला आधार आहे हे किती पटकन स्विकारते. त्या वेलीचे वर वर जाणे तिच्यासाठी किती महत्वाचे होते. अपूर्ण असणं त्या वेलीने किती सहज स्विकारले. गंमत म्हणजे सुपारीच्या झाडासोबत वर जाण्याने त्या वेलीने ढगांना पाहिले. उडणाऱ्या पक्षांचा थवा पाहिला. वेलीचे झाडाशी असलेले नाते, ही सोबत बदल घेऊन आली होती... सुलभा "
सुपारीच्या झाडाशेजारी उभी सुलभा वर वेलीच्या टोकाकडे बघत होती. तिला पाहून प्रिया म्हणाली " तिच्यात तुझ्यात किती साम्य आहे बघ. तिने जस स्वतः ला स्वीकारले आणि पुढचे पाऊल टाकले तसं तू ही स्वतः ला स्वीकातले तर गोष्टी सहज पुढे जातील. बदलाना आनंदाने स्वीकारशील. " वर वाढत गेलेल्या त्या वेली समोर तेव्हा सुलभा आणि तिचे प्रश्न छोटे झाले होते. तोवर बेल वाजली, प्रिया आणि सुलभाची निघायची वेळ झाली. सुलभा आपल्या डिपार्टमेंटकडे निघाली. ती जाता जाता म्हणाली " उद्या एकत्र चहा घेऊ... " हे सांगताना सुलभाच्या चेहऱ्यावरचे भाव अमूलाग्र बदललेले होते. ती खूष दिसत होती. प्रिया म्हणाली " चालेल... उद्या इथेच भेटू " दोघी तिथून निघाल्या.
Tuesday, 20 January 2026
टेकडी
युवा साहित्य संमेलन

लोकशास्त्र सावित्री
हम है
ठसे
फुटबॉल
मनाची शक्ती
मोठे होताना कौटुंबिक वर्तुळ ओलांडल्यावर अनेक प्रसंगी आपणच आपले सोबती होतो. आपल्याच मनाची समजूत घालणारे समुपदेशक होतो.
अरुंद पूल
एकट्याचा प्रवास जेव्हा सोबतीने होतो तेव्हा नक्की कुठे बदल होतो ? या प्रवासात आपण कुठे येऊन पोहोचतो ? आणि आपली परीक्षा कुठे होते ? हे सांगणारी एक सुंदर कथा माझ्या ऐकण्यात आली.
कमल मावशी
गोदावरी
जे. के. राऊलींग
कबर्न पार्क
संपलेले पेन
आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक नव्याचे कौतुक, त्याचे नवे पण आपण साजरे करतो. मग ती एखादी वस्तू असो, जागा असो किंवा एखादी व्यक्ती. नव्याचे कुतूहल असताना त्याच मनात पूर्वीचे काही तरी मागे ठेवून आपण पुढे आलेलो असतो. काही गोड तर काही कटू आठवणी सोबत असतात. त्या गोष्टीचा दीर्घ सहवास, सोबत असते.
जसे कि जेव्हा अक्षर ओळख नव्हती तेव्हा पाटी आणि पेन्सिलचे कुतूहल होते. जसे पुस्तक, पेन हातात आले तेव्हा त्याचे आकर्षण वाटू लागले. नव्या कोऱ्या वहीच्या पानावर त्या पेनाने लिहिलेली अक्षरे पाहताना त्या हस्ताक्षराची भुरळ पडली.
टेबलावरच्या अशाच एका पेनाचे ही गोष्ट.
मी नवीन कथा लिहायला घेणार होते. वही पेन खालच्या रकान्यातून काढले. समोर टेबलावर ठेवले. लिहायला सुरुवात करणार तोच शीर्षक लिहिल्यावर पेनाची शाई संपली. सहजपणे ते जुनं संपलेलं पेन बाजूला ठेवलं आणि काहीच दिवसापूर्वी भेट म्हणून मिळालेलं नवं पेन हातात घेतलं. ठरवल्याप्रमाणे कथा लिहून पूर्ण झाली. पेन पुन्हा त्या जागी ठेवताना मला ते संपलेलं पेन दिसलं.
ते पेन मला काही तरी सांगत होतं. काही काळ माझा त्या संपलेल्या पेनाशी मूक संवाद झाला.
“ नवं कोर पेन आपल्याला भेट म्हणून मिळाल्यावर त्याचं आपल्याला किती कौतुक असतं! आपण त्याला किती जपतो! असे नवे पेन हातात पडल्या पडल्या त्याने स्वतःचे नाव लिहिण्याची उत्सुकता, नवीन कथा, कविता लिहिण्याची उत्सुकता, त्याने केलेला गृहपाठ, भरलेली डायरी सगळंच आवडू लागतं. ते कधी संपूच नये अशी हि सुप्त इच्छा मनात असते आणि अचानक कोरी पाने त्या पेनाने भरता भरता कधीतरी ते पेन संपलं की त्याच विश्व् संपत. असे कसे होऊ शकते? “
ते संपलेलं पेन तेव्हा मला सांगत होतं “ मी काही संपलो नाहीच मुळी... माझ्यासोबत आता भरभरून साठा आहे... तुझ्या अनुभवाचा, तुझ्या सोबतीचा, माझ्याकडे तुझ्या आठवणीतल्या गोष्टी आहेत. तुझ्या मनातली मी वाचलेली काही पाने आहेत. ती आता बदलणार नाहीत. आपली सोबत आज हि सुंदर पानावर सजलेली आहे. आज मी हातात नसलो तरी मी मागे ठेवलेली असंख्य आठवणीतली पानं आहेत. अशा वेळी नवे पेन हातात घेताना त्या मागच्या पानांची आठवण ठेवून तू नवी सुरुवात कर . “
ते पेन मला नवीन सुरुवात करायला सांगत होतं. अगदी आपल्या जवळच्या माणसासारखं...
त्या पेनासारखेच तर हे जग आहे. एखादी व्यक्ती आपल्याला विसरली असे कधी वाटू शकते. तेव्हा आपले तेव्हाचे सोबत असणे आणि आताचे नसणे त्या पेनासारखे समजावे. कोणीतरी तसे पेन होऊन आपल्याला समृद्ध केलेले असते. तर कधी आपल्याकडून एखाद्याच्या आयुष्यात आठवणीतले सुंदर पान लिहिले गेलेले असते. त्याचे समाधान सोबत ठेवून पुढच्या प्रवासाला आपण निघावे. गोष्ट लिहिताना मध्येच पेन जरी संपलं. दुसरं घ्यावं लागलं तरी मागची काही पाने त्या पेनाने लिहिल्याचे समाधान कायम सोबत ठेवून पुढे लिहीत राहावे.
पुस्तक मनोगत : युद्धानंतर
युद्धभूमी, रणांगण , विजय , पराजय , लढाया, शस्त्रे, मनुष्य हानी, आपण लहानपणापासून गोष्टीत ऐकतोय. सिनेमामध्ये पाहतोय. आज ही अशी युद्ध कधी सौम्य तर कधी रुद्र रूपात सुरू आहेत.
जेव्हा ही युद्ध आजूबाजूला सुरू असतात. जेव्हा युद्ध डोळ्यांनी पाहिले जाते. कानांनी ऐकले जाते. तेव्हा प्रश्न पडतो...युद्ध का सुरू होतात? युद्ध कशी संपतात ? युद्धा नंतर काय होते? या प्रश्नांची उत्तरं आणि युद्धानंतर चे दारुण चित्र, तिथली हकीकत मला “ युद्धानंतर “ या कवी. आदित्य दवणे लिखित काव्य संग्रहात वाचायला मिळाले.
जिथे युद्धाचे वावटळ येते, तिथला परिसर कलाकाराला बोलका वाटू लागतो. भयाण शांततेत सुद्धा बोलणारी मने तो ऐकू शकतो. एखाद्या शारीरिक आजाराची जशी लक्षणे असतात तसे मला वाटते आपल्या मनातल्या अस्थिरतेचे, विकाराचे लक्षण म्हणजे ही युद्ध, बंड, मनुष्य हानी.
युद्धात बधिर झालेले कान कोणाची तरी तन्मयतेने मारलेली हाक ऐकण्यासाठी आसुसलेले असतात. युद्धात पाणावलेले डोळे मायेचा ओलावा शोधत असतात. सैरभर झालेले मन युद्ध जिंकण्याआधीच हरलेले असते.
कोरीव शिल्पे जशी इतिहास जपतात. तसेच युद्धातल्या आठवणी म्हणजे शरीरावरचे व्रण कायम माणसाच्या सोबत असतात. ती जागा, तो परिसर आणि ती माणसे सावली सारखे मनावर गारुड घालतात.
मनातल्या सुप्त भावना, नव निर्मितीचा ध्यास जिवंत असणाऱ्या प्रदेशात कलाकार जन्माला येतो आणि कलाकार नसणाऱ्या ठिकाणी युद्ध जन्माला येते. युद्धभूमीवर ते थांबवण्याची ताकद कलाकारात असू शकते. तो तिथले चित्र बदलण्यासाठी कलेचे शस्त्र हाती धरतो. तो त्याच्या कलेतून तिथले विश्व, तिथल्या जागा, तिथली माणसे सांगत असतो. मृत जमिनीत कला अमृत पेरू शकते. तिथले युद्ध तो शिल्पात साकार करतो. युद्धात बेरंगी झालेल्या चित्राला तो नव्याने रंगवू शकतो. बधिर झालेल्या कानांना सुरांचे दान देऊ शकतो. या युद्ध भूमीला नव जीवन देऊन रंगमंच करणारा जादूगार त्या मातीतला कलाकार असू शकतो. या पुस्तकातील एका कवितेत कवी आदित्य दवणे लिहितात,
“कलेच्या साध्या असण्याने ही
लढले जाणारे युद्ध युद्ध उरले नसते
हे जग खरेच किती सुंदर झाले असते!”
असे हे युद्धानंतरचे जग पुन्हा नव्याने उभारण्याचे आशादायी चित्र मनाच्या कोपऱ्यात जपत हे पुस्तक वाचून पूर्ण झाले.
बाहुली
बर्लिन मधल्या एका तरुणाची ही गोष्ट. हरवलेल्या प्रेमावरची गोष्ट. मूळ इंग्रजी भाषेत असलेली गोष्ट मराठीत लिहायला घेतली.
सफरचंद
शाळेत आपण अजाणतेपणी बऱ्याच गोष्टी अनुकरणातून, प्रयोगातून शिकतो. निरीक्षणातून शिकतो. या कथेत ही तसेच काहीसे होते. मूळ इंग्रजीत वाचण्यात आलेली ही कथा मला माझ्या संग्रही ठेवण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. म्हणून लिहायला लागले.
पाचवीचा वर्ग मुलांनी भरला होता. मुलांचा कलकलाट, भांडणे, आरडाओरडा, गोंधळ सुरू होता. व्यक्तिमत्व विकासाचा पुढचा तास होता. तासाला कोणी शिक्षक वर्गावर नव्हते. काही वेळाने त्या वर्गात नव्याने रुजू झालेल्या मीना बाई आल्या. त्या आल्या तशा दोन क्षण वर्गाबाहेरच थांबल्या. गोंधळ काही शांत होत नव्हता. त्यांना मुलांना नवीन काही शिकवायचे होते. पण अजून मुलांची तितकीशी ओळख झाली नव्हती. पहिल्यांदाच त्या वर्गात त्यांचा तास होता. मुलांना ही त्यांची ओळख नव्हती. त्यांनी हातात दोन सफरचंद आणले होते. त्या टेबलजवळ आल्या. त्यातला एक सफरचंद त्यांनी जोरजोरात टेबलवर आपटायला सुरुवात केली. असे एक दोनदा केले. समोर बसलेल्या मुलांनी ते पाहिले. त्यांना ते विचित्र वर्तन वाटले. बघता बघता सगळे शांत झाले. मुलांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. सगळे शांत झाल्यावर त्यांनी ते दोन्ही सफरचंद टेबलावर ठेवले. मुलांना त्यातला फरक ओळखायला सांगितला. कुठला चांगला आणि कुठला खराब ते ओळखायचे होते. नवीनच वर्गात आलेल्या बाई असं का विचारत आहेत? याचा मुलांना अंदाज येईना. वर्ग आता पूर्ण शांत झाला होता. सगळ्यांच्या नजरा त्या टेबलावर ठेवलेल्या दोन्ही सफरचंदावर होत्या. साहजिकच मुलांना विचारल्यावर सुरुवातीला अगदी सारखे दिसणारे सफरचंद आता वेगळे दिसत होते. त्यातला एक आपटलेला सफरचंद बाईंनी हातात घेतला. सर्वांनी तो खराब झालेला असे अनुमान काढले. याउलट दुसरा गुलाबी दिसणारा, आतून पांढरा शुभ्र गोड असा अंदाज बांधला. वर्गातील सर्वच मुलांनी तसेच उत्तर दिले. त्या नंतर मीना बाईंनी ते दोन्ही सफरचंद कापले. मुलांना दाखवले. पहिला सफरचंद हळूहळू बाजूने काळा पडलेला, खराब होऊ लागला होता. आकार उकार बदलला होता. एका मुलीने उठून त्यांना विचारले “ आपण त्याला जे बोललो ते त्याने ऐकले का ? म्हणून तो आतून खराब झाला का...? “
बाईंनी मग तिला त्याचे उत्तर दिले. सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते “ आपण त्याला आपटले, त्याला चुकीच्या पद्धतीने हाताळले, त्याला सांभाळले नाही, त्याच्या दिसण्यावरून, चवीवरून सगळ्यांनी नाकारले. एक नाही तर तीस जणांनी त्याला नाकारले म्हणून ते आपोआपच आतून खराब होत गेले. या उलट जे दुसरे सफरचंद त्याबद्दल आपण किती छान म्हणले. त्याच्या चवीला, दिसण्याला, असण्याला आपण स्वीकारले. त्याला व्यवस्थित हाताळले म्हणून ते जसे बाहेरून गुलाबी सुंदर दिसते तसेच ते आतून ही गोड राहिले.
मी येताना दोन्ही चांगलीच फळे आणलेली होती, पण कुणाच्या तरी स्वीकारण्याने, हाताळण्याने एक फळ गोड आणि ताजे राहिले तर दुसरे व्यवस्थित सांभाळले नाही, नाकारले म्हणून आतून खराब झाले. मैत्री करताना आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, चुकीच्या वर्तनाने ती व्यक्ती दुखावली जाते आणि असे मैत्री चे नाते फार काळ टिकत नाही... त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा... Be kind to universe …Be kind to yourself.
या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वर्गात थोड्याच वेळात वर्गशिक्षिका आल्या. त्यांनी सर्व मुलांना त्यांच्या नवीन बाईंची ओळख करून दिली. सर्व मुलांनी आपली नाव मीना बाईंना सांगितली. सफरचंदाचा हा खेळ आणि त्यामागची गोष्ट सर्वानाच आवडली.
गोष्ट संपली. त्यातून किती सहज मानवी भावना मांडल्या गेल्या आहेत. असंवेदनशील मने ही कधी तरी संवेदनशील मनाला ठेच लागते तेव्हा निर्माण होतात.
आपल्यातली इतरांच्या प्रति असलेली संवेदनशीलता, करूणा किती मोठा बदल करते पहा ! एखाद्या गोष्टीला नाशिवंत करू शकते किंवा कुणाला नवजीवन देऊ शकते.
आपले मन आणि जीभ यात अदृश्य असं जोडलेलं नातं आहे. त्यात प्रचंड ताकद आहे. कधी ते मोरपिस होऊन दगडासारख्या मनाला ही प्रेमाने मृदू स्पर्श करू शकते तर कधी संवेदनशील मनाला दगडासारखे कठीण करू शकते. तेव्हा इतरांना आणि स्वतःला मायेची उब देत राहा.
रानभुली
“ रानभुली “ गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचे नुकतेच वाचनात आलेले हे रानातले पुस्तक. पुस्तकाबद्दल लिहिताना माझ्या डोळ्यासमोर रायगडाची तटस्थ तटबंदी येते. तिथले मातीत रोवलेले बुरुज, बाजारपेठेतली पडलेली भिंत, तिथला सूर्यास्त, गडाला शोभणाऱ्या अजस्त्र कडा आणि भोवताली पसरलेली पोकळ दरी.
हे पुस्तक लिहिणारा गडाचा वारकरी. जो गडाच्या शौर्य कथा टिपण्यासाठी ही वारी करतोय. या वारीत त्याला सोबत होते ती एका रान कन्येची. मनीची. मनीसाठी हा वारकरी म्हणजे आप्पा. या गडाचा गड पुरुष. त्यांच्या छत्र छायेत तिला या गडाला पालथे घालण्याचे अभय मिळते. मनीची सोबत हळूहळू आप्पांना ही
हवी हवीशी वाटू लागते. अशी ही धनगरांची विलक्षण धाडसी पोर. तिची कथा या पुस्तकात वाचायला मिळते.
सोनवळीची पिवळी धम्म फुले, तेरड्याचे ताटवे, दूरवर पसरलेलं हिरवं कच्चं गवत, सोनवळीच्या फुलांची कलाबुत त्यावर तेरड्याची आरास. पांढऱ्या शुभ्र ढगांनी गच्च भरलेले आकाश आणि खाली फुलांच्या रंगांची उधळण. असे सुरेख वर्णन यात वाचायला मिळते.
गडावर मनीचे अपार प्रेम, भक्ती आणि श्रद्धा. गडासारखा प्रिय हिला दुसरा कोणी नाही. दरदरत्या पावसात, दाटलेल्या थंडीत, भिजत , कुडकुडत गड हिंडत राहणारी, सूर्यास्ताच्या वेळी बाजारपेठेच्या पडक्या भिंतीवर बसून सूर्यास्त न्याहाळणारी मनी म्हणते “ नारायेन बघ कसा ग्वाड दिसतो ! “
मनी उनाड, अल्लड, रानातल्या काट्या कुट्याना, कडा कोपऱ्याना सहज स्पर्श करून येणारी गड कन्या मला वाटते. साधी सोपी असली तरी धाडसी, करारी ही भासते. “ खानदानी किल्लेदाराची लेक “ असे ही आप्पानी मनीला म्हणले आहे. इतकं आत्मीयतेने निभावलेले हे नाते लग्न बंधनात अडकल्यानंतर अचानक दुरावते.
पाचाड हुन मुंबईस आल्यावर झोपडीत सुरू झालेला तिचा संसार तिला निरस, रंगहीन वाटू लागतो. त्यात जन्माच्या वेळीच अकस्मात गेलेले पहिले मुलं. तिचे पाचाडास परतणे. आपल्या न जगलेल्या बाळाच्या समाधी ठिकाणी जाऊन अंतर्मनातून कोलमडून जाणे. मनीचे नवऱ्याशी, घरच्यांशी धरलेले अखंड मौनव्रत आणि गडावरच्या आठवणी सारेच आप्पांसाठी दुसरे टोक.
शेवटी मुंबईतला तुटपुंजा संसार नवऱ्या सोबत पुन्हा गडाच्या पायाशी आणून ठेवणारी मनी आप्पांना या कथेच्या शेवटी भेटते. गमावलेले सारे परत मिळवण्यासाठी धडपडणारी मनी त्यांना पुन्हा भेटते. गडावर असलेल्या निस्सीम प्रेमाचे आणि फार पूर्वीच जमलेल्या दृढ नात्याचे हे बळ असते.
गडाकडे परतताना आप्पांना ती गजरे घ्यायला सांगते. कुणासाठी ? तिची गडावर वाट पाहणारी शिर्काई, मानाई, सातमाय, आसरा त्या शतकापासून तिथे गडावर ठाण मांडून बसलेल्या देव्या असतात. त्यांची गाठभेट घेते. किल्लेदाराची लेक, गडाची लेक खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा गडावर परतते. इथेच कथेचा शेवट होतो.
निवडुंग
खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...
-
सखी चतुर्थीच्या सुट्टीची दरवर्षी आतुरतेने वाट पाहायची. गणपती बाप्पा हे एक आकर्षण होतेच पण त्याहून मोठे आकर्षण म्हणजे गणपतीची सुट...
-
दीपावलीच्या प्रकाशमान पर्वाला सुरुवात झाली तसे " काव्यजुई " हे पुस्तक या दीप पर्वात प्रकाशित होण्याचे वेध लागले. काव्यजुई हा माझ...
-
चिनूची आज फुलबॉलची मॅच होती. गेले आठवडाभर जोरदार तयारी सुरू होती. दिवस रात्र एक करून भरपूर मेहनत घेतल्यावर आज तो दिवस उजाडला होत...
