Monday, 28 September 2020

मनोगत : " माझी जीवनयात्रा - ए. पी. जे. अब्दुल कलाम "


         मावळत्या सूर्याकडे पाहत मी बराच वेळ त्या बागेतल्या बाकावर बसले होते. संध्याकाळचा केशरी लाल रंग आकाशात पसरत होता. हळूहळू सूर्य डोंगराआड लपत होता. सकाळ पासून तापणारा आगीचा गोळा अखेर अस्ताला गेला. चंद्र आज थोडा लवकरच आकाशात कोपऱ्याला शांतपणे उभा होता. आताशा हवेमध्ये गारवा पसरला होता. मंद वारा वाट काढत वाहत होता. अचानक मंद झुळूक माझ्या समोरच्या झाडाला स्पर्श करून गेली. पानांची सळसळ स्पष्टपणे कानावर पडत होती. दिवसभर आकाशात स्वच्छन्दीपणे विहार करणारे पक्षांचे थवे परतताना गडद आभाळात सुंदर नक्षी तयार करत होते. एकीकडे बालगोपाळांचा खेळ रंगला होता. चिमुरड्यांच्या चिवचिवाटाने वातावरण प्रसन्न झाले होते. गडद होणाऱ्या अंधारात लपाछपीची रंगत आणखीनच वाढली होती. कॉलेजच्या तरुणांपासून ते वृद्ध आजी आजोबा पर्यन्त सगळे आपापल्या विश्वात दंग होते. त्यात ही टी व्ही वरच्या मालिकेतल्या भागापासून ते जागतिक विषयावर चर्चा रंगली होती. कुणाचा तरी मध्येच फोन वाजला आणि या चर्चेला पूर्ण विराम लागला. सायंकाळ सरली आणि आकाशात तारे चमचमणाऱ्या गालिचाचे आच्छादन करु लागले. निमिषात सारे बदल झाले. माणसाचं आयुष्य ही असंच असतं ना अनप्रेडिक्टेबल, निमिषात बदलणारं.
नुकत्याच वाचलेल्या ए. पी.जे अब्दुल कलाम यांच्या “ माझी जीवनयात्रा “ या पुस्तकाचा विचार मनात सुरू होता. सुप्रिया वकील यांनी अनुवादित केलेल्या त्या पुस्तकाने माझ्या विचार सरणीत बरेच बदल केले. ज्या भूमीवर संतांची आध्यात्मिक शिकवण मातीत रुजली आहे. त्याच भूमीवर विज्ञानाचे पुजारी, थोर अभ्यासक आणि विचारवंत जन्माला आले, हे या मातीचे किंवा भूमीचे मोठेपण.
माणसाला जन्माला येऊन हे महात्म्य प्राप्त होत नाही. जन्मापासून ते आयुष्यभर त्याला ते मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आपल्या अंगी असलेल्या कला गुणांमुळे आणि संस्कारातून, मार्गदर्शनाने आणि अथक प्रयत्नामुळे ते महात्म्य आपसूक त्याला मिळत जाते.
या पुस्तकात कलामांना जेव्हा आयुष्याला डिफाईन करायला सांगितले, त्यातल्या त्या वाक्याने दिलेले उत्तर खरंच त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा दाखला देते. ते म्हणतात “ माझ्या आयुष्याबद्दल म्हणता येईल की भरभरून प्रेम लाभलेलं लहान मुल...संघर्ष आणि संघर्ष ...दुःखाचे कढत अश्रू ...मग आनंदाश्रू ...आणि अखेर सुंदर व सुफल आयुष्य ...पूर्ण चंद्र बिंब उमटताना पहावं तसं ! “ या वाक्यात त्यांच्या आयुष्याची रूपरेषा कळून जाते.
माणूस हा विचारी प्राणी आहे. स्वप्ने पाहतो. ती सत्यात येण्यासाठी त्यांचा पाठलाग करतो. कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यावर विचार करणे गरजेचे असते. त्याला सत्यात उतरवण्यासाठी दृढ निश्चय, धाडस, चिकाटी अंगी असावी लागते. जीवनात येणारी दुःखाची वादळे न डगमगता पार करावी लागतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी आणि अपेक्षित उंची गाठण्यासाठी बरेचदा इतर गोष्टींचा त्याग करावा लागतो. जिद्दीने पुढे जावे लागते. अपयश पचवून त्यातून यशाचा मार्ग शोधावा लागतो.
नियती कधी कधी आपल्याला वेगळ्या वाटेवर सोडते. पुढे येणाऱ्या यशासाठी अपयशाचे सुरुंग पेरते. आपले या समाजातले स्थान आणि अपेक्षित कार्य कधी कधी तीच करवून घेते. या संपूर्ण प्रवासात अनेक मार्गदर्शक भेटतात. आपल्याला दिशा दाखवण्याचे काम करतात. त्यात ही हुशारीने आपण तिथवर जायचे असते. आपल्या या भावी यशामध्ये आपल्या आई वडिलांचा आपल्यावर मोठा परिणाम होतो. तोच आपल्याला जगण्याची स्फूर्ती देतो. ही सगळीच मूल्ये त्या पुस्तकात हर एक पानावर वाचताना मनात रुजत गेली.
खरंच लहानशा खेड्यात राहणाऱ्या एका मुलाला कधी वाटलं असेल का...या देशाचे नेतृत्व करायची संधी आपल्याला मिळेल. त्यांना लोक “ मिसाईल मॅन “ म्हणून ओळखतील. पण त्यांनी अशी प्रचंड देश सेवेची स्वप्न नक्कीच पाहिली आणि ती सत्यात येण्यासाठी कठोर मेहनत ही घेतली. म्हणूनच त्यांच्या पुस्तकात ते म्हणतात “ स्वप्न अशी असावीत, जी आपल्याला कधी झोपुच देणार नाही.”
अशा या विलक्षण बुद्धिमान शास्त्रज्ञाची जीवनयात्रा वाचून नक्कीच माझ्या यशाच्या व्याख्या बदलल्या. जीवनात थोडा मोकळा वेळ काढून अशा थोर विचारवंतांच्या आठवणी वाचाव्यात. त्यावर चिंतन करावे. या बुलंद व्यक्तिमत्वाचे विचार भावी आयुष्यात मार्गदर्शक, स्फूर्तिदायी आणि प्रेरक नक्कीच ठरतील. यात शंका नाही. बागेतून निघताना त्या काळोखात ही मला अखंड तेवणारी ज्वलंत ज्योत दिसत होती. जी वाटसरूना योग्य मार्ग दाखवत होती. तेच काम या शास्त्रज्ञाने आयुष्यभर केलं आणि अखेर पर्यन्त करतच राहीले आणि प्रत्येकाच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केलं. कदाचित यालाच त्यांच्या जीवन यात्रेने यश म्हणले.

मातृदेवो भव:

" एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही." या संदीप खरे यांच्या ओळी म्हणता म्हणता कधी डोळा लागायचा कळायचे नाही. उद्याची स्वप्न पाहता पाहता झोप लागायची आणि हळूहळू त्याच स्वप्नासाठी दूरचीच वाट दिसायची. आजही आई ती वाट पाहून थोडी घाबरतेच;  पण हा लांबचा मार्ग चालण्याचं ध्येय आणि ऊर्जा ही तिचं देते. आई म्हणजे दिशा, आपल्या आयुष्याची रूपरेषा, निराशेतून वर येण्याची आशा, व्यक्त होणारी अबोल भाषा. लहानपणापासून आईविषयी बोलायची, लिहायची संधी प्रत्येकाला मिळते आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला नव्याने आई कळते. निस्वार्थी प्रेमाचा झरा, चूक करताना एकदा तरी तिचा विचार करा, अशी आई.

एका दिवसाच कौतुक नको असतं तिला, फक्त थोडा वेळ मागते ती आपल्याला. कदाचित तोच आज मी तिला दिला. प्रत्येकानेच एकदा तरी सांगावे तिला " एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही.

 

💞मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💞

 

Saturday, 26 September 2020

नाळ

          गोल गोल भिंगातून फिरणारी ही दुनिया आपले वर्तुळ पूर्ण करून पुन्हा त्याच जागी आपल्याला आणून ठेवते. मायेची भूक भागवणारी माय लेकराची एक हृदय स्पर्शी कथा असं आपण “ नाळ “ या चित्रपटाचं वर्णन करू शकतो. कधी कधी नात्याची दोर खरंच अशी गुंतागुंतीची बांधलेली असते की परिस्थितीने दूर गेलेले नाते आपल्याही नकळत आपल्या आयुष्यात पुन्हा येते. वादळे निर्माण करून जाते. या बदलत्या चक्रात मनाने जोडलेले आपल्याला धरून ठेवते. हे जोडून ठेवणे सहज शक्य होते त्याचे कारण आपल्याशी जोडली गेलेली नाळ
एका गावात गवताच्या झोळ्यानी झाकलेल्या घरात खेडवळ कुटुंबात वाढणाऱ्या चैत्याची गोष्ट. सुरवातीला अगदी सर्व साधारण कौटुंबिक घराची कथा असल्याचे जाणवते. नातेवाईकाच्या गराड्यात कधी आपले हित संबंध चांगले होतात तसेच ते एखाद्या नात्याला पोखरून ही काढू शकतात. त्याचे उत्कट दर्शन या चित्रपटात होते. गावरान भाषेचा लहेजा प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी सांभाळत कथेचा मूळ गाभा रसिकापर्यंत पोहोचवण्यात कलाकार नक्कीच यशस्वी झाले आहेत.
लहान मुल म्हणले की त्याचे निर्विकार बोलणे आणि त्याला जोडून येणारी शब्दामागची भावनांची लकेर प्रत्येक वेळी आपल्याला आकर्षित करते. मग ते फक्त त्याचे खेळणे असो किंवा घरभर फुलपाखरासारखे बागडणे. “आई मला खेळायला जायचे...जाऊ दे ना व...” या संवादातुन स्मार्ट फोन च्या वलयातून बाहेरचे जग खुणावते.
माय लेकराचे नाते अधिक रंगते ते गाईच्या हरवलेल्या वासरामुळे. दावणीला बांधलेले, नुकतेच चालायला शिकलेले वासरू अचानक रानात वाट हरवते; कालांतराने त्याच्या नसण्याने गाईचे खाणे, पिणे, दूध देणे थांबते. दुभत्या गाईची वासराशिवाय झालेली केविलवाणी अवस्था. अचानक त्या वासराच्या मृत्यू ची बातमी येते. पुढे तिचे मृत झालेले पिल्लू समोर तरी कसे आणायचे ही चिंता. प्रेक्षक ही अशा वेळी मिनिटभर स्थब्ध होतात. आजाराने ग्रासलेली आजी चैत्याच्या गावी जाण्याचा आग्रह करते. अचानक कधीही न पाहिलेल्या आपल्या जन्मदात्री आईला पाहण्यासाठीची संधी चैत्या ला मिळते. आनंद आणि उत्सुकता असे दोन्ही भाव आपल्या डोळ्यात एकवटून गावी जाण्याचा हट्ट करणारा चैत्या. जणू काही ती दुरवरची आई त्याला बोलवत आहे असे एक क्षण वाटू लागते. बालहट्ट त्या पुढे नियतीचे ही काही चालत नाही. आजीच्या अचानक जाण्याने जमलेल्या मांदियाळीत आपली आई शोधण्यासाठीची धडपड आणि सगळे प्रयत्न करून ही दुरावलेली नाळ जोडण्यास असमर्थ ठरलेली गावाहून आलेली दुसरी आई. ती आल्या पावली परत जाताना काळजावर पडलेले खोलवर वर्ण डोळे ओले करून जातात. चैत्या च्या अल्लड वयात आलेले प्रश्नाचे काहूर. स्वप्नवत भासणारे सारे दृश्य आणि चैत्याला बैचेन झालेले पाहून त्याला हाक देणारी ही माय “चैत्या उठ... चैत्या उठ...” म्हणत ती त्याला उठवते. दूरचा प्रवास स्वप्नातच पूर्ण करून चैत्या अंथरुणातच आईला बिलगतो.
सम्पूर्ण चित्रपटात देवाज्ञा झालेले वासरू गायीला काही दाखवले जात नाही. त्याच जागी पुतळा करून त्या गायीला पुन्हा उभे केले जाते. दुभत्या गाईचे हरवलेले वासरू पुन्हा मिळाले या आनंदातच ती पुन्हा पहिल्यासारखा हंबरडा फोडते आणि चैत्या त्याच्या आईच्या पदराला धरून पहिल्या सारखा घरभर बागडतो. हेच तर हवे असते नात्यातले सुख, ज्यासाठी ही चक्र फिरतात. वादळे येतात. आपले मुलं घरभर शोधून कावरीबावरी झालेली माय, त्याच्या भुकेसाठी मागे मागे धावणारी माय अन हरवलेले वासरू पुन्हा घरी आले म्हणून हुंदके देत रडणारी गाय ...ही नाळ त्यात लपलेल्या सगळ्याच भावनांची आहे. मायेची आणि प्रेमाची आहे आणि ती जोडण्यात हा चित्रपट नक्कीच यशस्वी झाला आहे.

Friday, 25 September 2020

पाणी...बिन भिंतीची शाळा


पाणी ....उंचावरून पांढऱ्याशुभ्र झऱ्यातून कोसळणारं. संथपणे नदीतून वाहणारं. खोल सागरातून लाटांवर उसळणारं. नळातून पडणार नाहीतर मातीतून झिरपणारं...पाणी.
ज्याला स्वतःचा ना रंग, ना गंध, ना आकार ना रूप. एक मात्र गुण आहे मिसळण्याचा आणि एकरूप होण्याचा, म्हणूनच निर्जीव भूमीवर जीवन फुललं आणि बहरत गेलं याच पाण्याच्या थेंबातुन. पाणी लोकांना जगायला शिकवतं. कधी गुडघाभर पाण्यातून वाट काढून तर कधी एका थेंबासाठी कोसावर पायपीट करून. कधी संकट बनून तर कधी संजीवनी बनून.
पाणी... जिथे वाहत जाईल तिथे नव्याने जीवन निर्माण करेल. पूर्वीपासून पाण्यासाठी प्राणीमात्रांनी धडपड केली. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. पाण्यासाठी कधी वणवण केली. त्याची साठवण केली. माणसं, पशुपक्षी पाणवठयाशेजारी एकवटली. नदी शेजारी गाव निर्माण झाली. समाज जीवन फुलत गेले. वाढत गेले. पशुपक्षांनी, मानवानी पाण्याच्या दिशेप्रमाणे कधी आपली दिशा बदलली तर कधी आपल्या सोयीनुसार पाण्याची दिशा बदलली.
आपली स्वतःची ओळख बाजूला ठेऊन इतरामध्ये विलीन व्हावं. जिथे वाट मिळेल तेथे वाहत जावं आणि शेवटी अथांग समुद्राला मिळावं हे पाण्याचं तत्व माणसाला साचेबद्ध जीवनात रुतून बसण्यापेक्षा नव्या रुपात इतरांच्या कामी येऊन जगण्याच सार्थक करायला शिकवतं. जिथे पडेल त्याचा आकार घेऊन नव्या बदलांना आत्मसात करायला शिकवतं. नवनिर्मितीच हेच वरदान देऊन इंद्र देवाने या आणू रेणूला पृथ्वीवर धाडलं असाव. यातल्या बऱ्याच गोष्टी माणसाला रोजच्या जगण्याचा भाग वाटू शकतात.
पाण्याची किती रुप आपण पाहिली असतील. कधी शांत आणि स्तब्ध. कधी उसळणार. कधी पानाफुलावरच्या दवात किंवा आळवावरच्या थेंबात साठलेलं. कधी महापूर तर कधी दुष्काळ. पावसामुळे होणारं नुकसान काही नवं नाही पण त्यासोबत महाप्रलयाची ती काळ रात्र आजही लोकांना सुन्न करते. दिवसरात्र कोसळणारा आणि हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत जाणारा पाऊस. जणू कुठल्याशा अतीव दुःखात सततच्या वाहणाऱ्या अश्रुमध्येच अनेकांनी जलसमाधी घेतली. गरजेपेक्षा जास्त आला आणि सारं काही उध्वस्त करून गेला. सध्याच उदाहरण घ्यायचं झाल तर जपान मध्ये आलेली त्सुनामी आणि त्यातून पुन्हा एकदा चिकाटीने सगळं सावरण्याचा प्रयत्न करणारे तिथले रहिवासी. या महाप्रलयामुळे या न त्या प्रकारे प्रत्येकाने काही तरी देण्याचा प्रयत्न केला आणि हे आलेलं जल संकट पळवून लावलं. कुठे तरी माणसांच्या मनातला मायेचा ओलावा मनं उबदार करून गेला.
या पाण्याचे ना ना तऱ्हा, कधी उद्रेक तर कधी दुर्भिक्ष. याच्या बरोबर उलट परिस्थिती गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात भीषण दुष्काळामुळे झाली. जमिनीला पडलेल्या भेगा आणि पसरत चाललेलं वाळवंट अंगावर काटा आणून गेलं. विहिरीच्या तळाशी गेलेलं पाणी आणि त्यासाठी लागलेल्या लांबलचक रांगा, मैल दोन मैल पायपीट करून कुटुंबाची तहान शमवणारी आई, पाण्यावाचून अर्धमेली झालेली जनावरे, करपलेली पीक पाहून हताश झालेला शेतकरी, निष्पर्ण झाडाचे सुकलेले बुंधे. सगळच सुन्न करणार. अजाणतेपणी आपल्या कडून ही झालेल्या या जखमा आज जमिनीत खोलवर कोरल्या गेल्या आणि वेदना सर्वांच्या वाट्याला आल्या असे वाटून जाते. दुष्काळाचे चटके सोसलेली करपून गेलेली मन सगळीकडे माणुसकीचा ओलावा शोधत होती.
जेव्हा पाण्यावाचून हिरव्यागार झाडाची पाने गळून त्याची होळी होते. पाणी आणि चाऱ्यावाचून जनावरांना बाजार किवा कत्तलखाना निवडावा लागतो. एक दिवसाआड भाकरी भाजण्याची वेळ घरच्या आईवर येते. दहा वीस रुपयासाठी शेतकऱ्याला सावकाराचे पाय धरावे लागतात. त्याच्या लेकरांची लहान लहान स्वप्न सुद्धा डोंगराएवढी मोठी आणि अशक्य वाटतात आणि या दुष्ट चक्रातून वाट काढत तो जगत असतो. जगण शिकत असतो.
इतकं सगळ शिकवून जाणार हे पाणी आज क्षणा क्षणाला जगणे शिकवत आहे, त्यातून धडा घेऊन हे अमृत वाचवण्यासाठी कुठेतरी कोणीतरी पुढे येतंय. घाम गाळतय, समाजाला योग्य दिशा दाखवतंय, लोक संघटित होऊन नवा इतिहास घडवतात, लोकं स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करत आहेत, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था अशा प्रसंगी त्यांच्या पातळीवर योगदान देत असतातच त्यात आपण आपले लहानसे दान मग ते श्रमदान असो किंवा आणखी काही. या चळवळीला दुहेरी बळ दिल्याशिवाय राहत नाही आणि जिथे अशी सेवाभावी वृत्ती एकवटते तिथे निसर्ग ही आपला चमत्कार दाखवायला लागतो. याच एकजुटीतून कोरडी पडलेली ती भूमी पाण्यानी नाहून निघते. मातीच्या एक एक कणाकणात नवा उत्साह संचारतो. पुनर्निर्मितीचा सुगंध चहूकडे दरवळू लागतो. निष्प्राण झालेल झाड नव्याने सज्ज होते. जुने तण आपोआप गळून पडतात. भेगाळलेल्या जमिनीतून लहानसं अंकुर डोकं वर काढतं. सुकलेल्या फांद्यावर हिरवीगार कोवळी पान दिसू लागतात. चैतन्याने सारी भूमी बहरून निघते आणि असे अनेक सृष्टीचे चमत्कार पाहणारे आपण साक्षीदार सगळं पाहून हवालदिल होतो. ज्याप्रमाणे पाण्याच्या एक थेंबाने एकवटून संपूर्ण सागर ढवळून निघतो आणि कठीण दगडातून आपली वाट काढतो त्याच प्रमाणे अनेकांचे सकारात्मक विचार एकत्र येऊन त्याचा महासागर होतो आणि संपूर्ण परिस्थिती ढवळून काढतो. संकटातून वाट काढत अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो. या सगळ्या उदाहरणावरून एकच संदेश मिळतो तो म्हणजे एक चांगला आदर्श समाज निर्माण करण्यासाठी लागते ती फक्त दृढ इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी आणि मग हे असे चमत्कार घडतात. डोळ्यातील अश्रुची जागा जेव्हा मेहनतीच्या घामात परावर्तीत होते तेव्हा नद्या, विहिरी आणि माणसांची मन सुद्धा काठोकाठ भरतात. पाण्याने माणसांची माणुसकीची तहान शमवली. थोडासा का होईना वाटा आपण ही द्यावा असं जेव्हा प्रत्येकाला वाटत त्यासाठी लोक निरपेक्ष भावनेने पुढे येतात आणि एकत्र येतात. तेव्हाच या निसर्गाच्या शाळेत आपण कुठेतरी उत्तीर्ण होतो. हा बदल घडवण्याची ऊर्जा आपल्यात च दडलेली असते. याची प्रचिती येते.
पाण्याचा एक थेंब, माणुसकीची तहान, सकारात्मक विचार आणि एकसंघ समाज सारच सोपं आणि सहज करतो. जे शिक्षण कोणत्याही पुस्तकात, ग्रंथात, शाळेच्या चार भिंतीत मिळणार नाही अशी शिकवण तो निसर्ग रोजच्या जीवनात देतो. अशी ही बिन भिंतीची शाळा...

Thursday, 24 September 2020

गावची भेट

        
    शेवटच्या वर्षाची परीक्षा होऊन बराच काळ लोटला होता. सकाळी रपेट मारायला जवळच्या पार्कात गेले होते. तिथे बसल्या बसल्या माझ्या जवळ दोन मुली आल्या आणि सोबत खेळण्यासाठी हट्ट करू लागल्या. मी हि त्यांना नाराज न करता हातात चेंडू घेऊन निघाले. बघता बघता खेळ रंगत आला आणि एक जोरदार चेंडू भिरकावला तो थेट पार्काच्या बाहेर गेला. नंतर खूप प्रयत्न करूनही तो चेंडू काही मिळाला नाही. त्यानंतर नाईलाजाने सगळे आपापल्या वाटेला गेले. जाताना त्या मुलींचा हिरमुसलेला चेहरा पाहून थोडे वाईट ही वाटले. पण त्यानंतर लहानपणचा असाच अनुभव तेव्हा चालता चालता आठवला.    
   दिवाळीच्या सुट्टीत गावी असताना त्याच जोशात चेंडू भिरकावला होता, तो थेट रस्त्यावरून येणाऱ्या बसच्या उघड्या खिडकीतून आत गेला आणि त्यानंतर झालेली धावपळ अजून ही लख्ख आठवते. चालता चालता मी माझं गावचं घर आणि तो प्रसंग आठवत त्यात रमुन गेले. घरी पोहोचले. जुन्या आठवणीचा अल्बम उघडून पुन्हा जगायची इच्छा काही स्वस्थ बसू देईनात. दोनच दिवसात गावाला भेट दिली. आजोळी, आजी-आजोबांकडे.      
         
खुप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गेल्यावर गाव थोडं बदललेलं असतं. सगळं जुनं स्मरणात असतं आणि बदलेले चित्र पहायची उत्सुकता असते. आठवणी असतात आणि त्यात रंग भरणारी माणसं असतात. बऱ्याचदा आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढणं शक्य नसतं, गावाची ओढ लागली तर ही गाठ भेट होते. अशी बरीच अव्यक्त कारण असतात जी आपल्याला बोलावत असतात. नवे अनुभव घेण्यासाठी... तशीच मी ही निघाले.
“ सातारा “ या नावाप्रमाणे ताऱ्याचे गाव. तिथे जाऊन निरभ्र आकाशात एक नजर फिरवली कि चमचमणाऱ्या आकाशात ठळक सात तारे “ सप्तर्षी “ दिसतात, त्यावरून हे नाव दिले असावे. सप्तर्षी म्हणजे एकत्र सात ताऱ्यांचा पुंजका ज्यात जोतिषशास्त्रातले धागे दोरे मिळतात. तसेच सातारा सात डोंगरांनी वेढलेलं शहर आहे. हा ही नावामागचा आणखी एक संदर्भ असू शकतो. अशाच एखाद्या पठारावर रात्रीचं आकाश दर्शन घेण्याच साहस इथे नक्कीच एकदा तरी करायला हवे. हे सारं नावाबद्दल झालं. साताऱ्याला जाण्याचा रस्ताही तसाच आहे. घाटमाथ्यावरून वळणा वळणाच्या रस्त्याने बराच वेळ लागतो पण विकासाच्या वेगामुळे हा हि वेळ आता कमी झाला आहे. रस्त्यात बरेच बोगदे आणि डोंगरकडा आपलं स्वागत करायला सज्ज असतात. जाता जाता पेटपुजा करायला ढाबे, फूडमॉल खुणावत असतात. तीन-चार तासाचा प्रवास संगीत ऐकत निसर्गाचा आस्वाद घेत कधी संपतो आणि साताऱ्यात कधी दाखल होतो कळतही नाही. सातारा शहरात दाखल होताच दूरवर उंचावरून अजिंक्यतारा किल्ल्याचे दर्शन होते. अजिंक्यतारा सुरुवातीचा दुर्ग. तो दिसला कि समजायचं साताऱ्यात प्रवेश झाला. तिथं पोहोचल्या वरही कसरत असते बरं. भूपृष्टाला समांतर रस्ता इथे पाहायलाच मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी डोंगर चढाईचे अनुभव येतात. कधी वरून खाली तर कधी खालून वर. रोलर कोस्टर रस्ते पार करत दिसते ते माझे आजोळचे घर. अंगण, झाडं, माती, स्वच्छ हवा आणि आपली माणसं आपली वाट पाहत असतात. बोचरी थंडी आणि राक्षसी कोसळणारा पाऊस आजही अंगावर शहारे आणतो. अशा डोंगराच्या कुशीत वसलेलं सातारा त्यातलं लहानसं आमच घर म्हणजे गोल्डन रिंग विथ डायमंड असंच वर्णन करता येईल.
सातारा आणखीन प्रसिद्ध आहे ते तिथल्या कंदी पेढ्यासाठी. बसस्थानकाबाहेर लांबच लांब दुकानाच्या रांगा. पेढ्याची चव चाखल्याशिवाय सातारा सोडण इथल्या लोकांच्या नियमात नाही. भेटायला आलाय, बघायला आलाय किंवा फिरायला आलाय कंदी पेढा सगळ्याचीच मनं गोड करतो. जवळपास पाहण्यासारखी बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत; जिथं निसर्ग आपली जादू दाखवतो. सातारच्या रस्त्यावर फिरताना दर वळणावर मंदिराचा कळस नाही दिसला तर नवल, त्यामुळे सगळी मंदिर आणि बागबगीचे आजी आजोबांनी आणि लहान मुलांनी फुललेले दिसतात. गावी गेल्यावर बरोबर पाठमोरा नजरेस पडतो तो आमच्या घराजवळचा भैरवनाथाचा डोंगर. डोंगरा वर शंकराच देऊळ आणि लांबलचक पठार. इथे जाण्यासाठी कधीच प्लानिंगची गरज लागली नाही. पहाटेच्या कडक थंडीत उठायचे आणि डोंगर चढायचे धाडस घेऊन निघायचे. खिशात भरलेली चॉकलेट, तीन चार पाण्याच्या बाटल्या, घरून बनवलेली भेळ आणि एक उत्तम गाईड इतकही पुरेसं असतं. लहानपणी आम्ही भावंडे भैरवनाथ डोंगर चढायला जाण्याचा विचार आला कि निघायचो आणि कधी एकदा ते टोक गाठतोय याची जणू शर्यतच लागायची. सगळे भान विसरून नवे रस्ते शोधत नवी माणस आणि नवे अनुभव घेत हिंडायचो.
एकदा सहज गेल्या असताना तिथे भेटलेली एक अठरा-एकोणीस वर्षाची मुलगी पोलीस भरतीसाठी रोज दोन दोन किलोचे गोळे घेऊन चढाई करताना पाहिली. तिच्या हातातला एक गोळा आमच्या दोन हातात घेऊनच आमची आहे नाही ती शक्ती संपली आणि तिच्यातील ध्यर्य आणि धाडस पाहून तिचा अभिमानही वाटला. असेच अवलिया आपल्या आयुष्यात बदलासाठी खारीचा वाटा टाकतात आणि प्रेरणा देतात.
साताऱ्याजवळच आहे परळीचा किल्ला. ज्याला सज्जनगड म्हणूनही ओळखतात. थोडी नागमोडी वळणे आणि पायऱ्याची रांग. जेव्हा जेव्हा ट्रीप निघते तेव्हा हमखास ठरलेलं हे ठिकाण. श्री रामदास स्वामी आणि श्रीधर स्वामींचे समाधी स्थान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दगडी बांधकाम तिथे आज ही पहायला मिळते. गडाची रचना अतिशय आखीव रेखीव अगदी लहान खेड्याप्रमाणे असून या ठिकाणची खासियत म्हणजे तुमच्या फोर जी ची स्पीड इथे झिरो होते आणि या जागेशी तुम्ही एकरूप होतात. तिथले वातावरण तुम्हाला स्वतःची स्वतः शी हरवलेली कनेक्टीवीटी परत मिळवून देते. गड चढताना वाटेत झाडावरची माकडं तुमच्या स्वागताला सज्ज असतात; त्यामुळे मोकळ्या हातानी जाणच योग्य. डोंगरावर एका बाजूला अंगाई देवी तर दुसऱ्या बाजूला मारुती मंदिर आणि त्याला लागुनच असलेला मोठा जलाशय. उंचावरून वाहणारे वारे स्वतः वर घेत तासान तास उरमोडी धरणाचा प्रवाह पाहत घालवलेला वेळ आज ही स्मरणात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने चांगली पावले उचललेली आहेत. जुने दगडी बांधकाम इतिहासाची साक्ष देत सदोदित पणे उभे आहे. तिथल्या वातावरणातील निस्सीम श्रद्धेचा सुगंध आजही कमी झालेला नाही. सकाळ संध्याकाळ होणारी दासबोधाची पठणे वेगळीच सकारात्मकता देतात. दरवेळी नव्याने आणि उत्साहाने जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन इथूनच मला मिळतो.
वाढदिवसाची एक आगळी वेगळी भेट म्हणून आठ हजार फुटावरून रात्रीचे चांदणे पाहत बाराची वाट पाहत केलेली आईस्क्रीम पार्टी मला अजून ही आठवते. कडाक्याच्या थंडीत तिथलीच एक मनी माऊ आमच्या या छोट्याश्या पार्टीत सामील झाली होती आणि एका नवीन पर्वाला मी सुरवात केली होती.
तिथून जवळ कास पठार, ठोसेघर आणि सह्याद्रीच्या रांगा शानमध्ये उभे पाहायला मिळतात. कास पठार इथे येणाऱ्या अद्भुत फुलांसाठी प्रसिद्ध आहे. सप्टेंबरच्या आसपास इथे स्वर्गच अवतरतो आणि हा निसर्ग सोहळा पाहण्यासाठी देशपरदेशातून पर्यटक येतात. त्याचं जतन करण्यासाठी इको सेन्सिटीव झोन मध्ये याचा समावेश झाला आहे . साताऱ्याची तहान भागवणारी कृष्णानदी इथं वाहते. महाबळेश्वर, पाचगणी हि नेहमीची थंड हवेची ठिकाणं तर नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. तिथले वेगवेगळे स्पॉट आणि उपहारगृहे सुट्टीच्या काळात लोकांनी भरलेली असतात. शासनाच्या विविध योजनामुळे पर्यटन क्षेत्रात बरेच चांगले बदल झाले आहेत तरीही लोकांनी अजून तत्पर राहून निसर्गाचा आस्वाद घेतला तर नक्कीच त्यात भर पडेल.
कृष्णेच्या संगमावर वाई गाव वसलेले आहे, जिथे हेमाडपंथी गणपती मंदिर आहे, ज्याला तिथं ढोल्या गणपती म्हणून ही संबोधतात; साताऱ्याला लागुनच लहान मोठी अशी बरीच गावं आहेत जी शेतमळ्यानी सजलेली आहेत. टीमटीमत्या दिव्यांची हि गावं सातार्याच्या एखाद्या उंच टोकावरून चंद्र प्रकाशात पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. लहानपणी दूरवर दिसणाऱ्या दिव्यांना मोजून घरं किती ? गावं किती? नदी कुठे? आणि रस्ते कुठे याचे अंदाज बांधत बांधत शिकत गेलो. पुढे आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगात त्याची मदत झाली. आता तिथे इलेक्ट्रोनिक माध्यमे आली पण अचूक अंदाज बांधण्याची समयसूचकता तिथूनच मिळाली.
साताऱ्यात आणखी एक सदाबहार ठिकाण म्हणजे ठोसेघर. ठोसेघर हे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेले गाव. आजूबाजूच्या पर्यावरणावर आणि सृष्टीवर साक्षात ब्रम्हदेवाचा हात असावा इतके विलोभनीय आणि अविश्वसनीय. इथला धबधबा पाहण्यासाठी दूरदूरचे पर्यटक येथे येतात. कोणी मित्र मैत्रिणीसोबत मजा करायला, कोणी कुटुंबासोबत तर कोणी चिकिस्तक वृत्तीने साऱ्याचा अभ्यास करायला. उंचच उंच डोंगर रांगा, निमुळता होत जाणारा कालगंगा नदीचा प्रवाह सर्वांची तहान भागवत संथपणे पुढे जाताना दृष्टीस पडतो. पावसाळ्यात पंधरा वीस धबधबे उंचावरून कोसळताना फुललेला श्रावण पाहताना डोळे दिपून जातात. पक्षाचा किलबिलाट आणि मधूनच येणारा रातकिड्याचा आवाज सारेच ताल धरतात. धरणीवरची हि हिरवी शाल किती अनमोल आहे, याची जाणीव होते. जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गाच तत्व आपण विसरत तर नाही ना! असे तिथला प्लास्टिक आणि इतर कचरा बघून वाटते. निसर्गाबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर मला माझ्या गावानेच दिला. चाळकेवाडीची पवनचक्की विज्ञान आणि तंत्रज्ञान देखील पंचमहाभूताशिवाय अपूर्ण आहे याचा दाखला देते.
निसर्गाप्रमाणे कला कौशल्यात सांगायचं झालं तर साताऱ्यात जवळच औध म्हणून देवीचे जागृत देवस्थान आहे, जिथे शाहू महाराजांनी कलेला वाव मिळावा म्हणून बांधलेल्या संग्रहालय आहे. त्या ठिकाणी विविध रंगाचे, आकाराचे पुतळे, चित्रं, कोरीवकाम केलेले पौराणिक साहित्य आणि त्यांचे अवशेष जतन करून ठेवले आहेत. तेथील रवी वर्माचे सुरेख चित्र, त्या रंगामधील तजेला कोणत्याही कलाकाराला मोहित करेल. कलाकारांच्या हातातील जादू पाहण्यात कसा वेळ जातो कळतही नाही. सगळं सातारा फिरून शेवट होतो तो राजवाड्यात. इतिहासाची साक्ष देणारा राजवाडा आज जरी बंद असला तरी त्यावरील कोरीव काम बाहेरूनच आकर्षित करते. सगळं सातारा फिरून सहा माणसांच्या सिक्स सीटर मधून अठरा जणासोबत घर गाठतो तेव्हा हा प्रवास पूर्ण होतो.
गाव माझं चांगल, तिथं छोटसं घर आपलं
माणसांनी सांधलं आणि नात्यांनी जोडलं
कच्चे बच्चे जमले जेव्हा एका छताखाली
माझ्या या गावामध्ये जगाचं दर्शन घडलं
गावाकडच्या गोष्टी सांगायच्या बऱ्याच असतात पण सांगण्यापेक्षा अनुभवायच्या जास्त असतात. अंगणात घेतलेल्या जेवणाचा आस्वाद, लपाछपी खेळताना झालेल्या जखमा, झाडावरून तोडून खालेली आंबा, पेरू, चिक्कू. उंचावरची नारळ काढण्यासाठी केलेली मेहनत. चूल पेटवून पाणी तापवणे आणि त्यावर चटका लागेल मिळालेला प्रसाद. तशी गावी जायची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात. कोणी गरज म्हणून तर कोणी आवड म्हणून जातोच. तिथे गेल्यावर प्रत्येकाच्या आवर्जून करायच्या हि बऱ्याच गोष्टी ठरलेल्या असतात. भेळ, कुल्पी आणि गोळा, उसाचा रस याची मजा काही औरच. गाव जरी म्हंटल तरी विकासाच्या झोतात आता बरच बदललं. पार्क आणि कॉमप्लेक्स आले. थ्री जी, फोर जी स्पीड आता इथवर पोहोचली आहे. त्यात वाईट काहीच नाही फक्त त्याच स्पीडने गाव बदलू नये.
आपलं गाव देशाच्या नकाशावर एखादा ठिपका जरी असला तरी चार लोकांत तुमच गाव कोणतं? विचारल्यावर ज्या उत्साहात उत्तर बाहेर पडत तीच गावाची ओढ आणि तीच कारणं पुन्हा गावाकडे जाण्यासाठी...

Wednesday, 23 September 2020

करिब करिब सिंगल


             आयुष्यात आपल्या त्याच त्या सवयी, नेहमीचं नियोजन आणि कधीतरी अचानक कोसळलेलं एकटेपणाच ओझं वाहताना नवी सुरवात कधी तरी करावीशी वाटते. तिला ही वाटली. नुकतेच लग्न झालेली ती कथेची नायिका पण अकस्मात पतीच्या निधनामुळे आलेला एकटा प्रवास ती करत असते. नव्या जोडीदाराच्या शोधात डेटिंग साईटवरून सुरू झालेली ही गोष्ट. तिचा प्रवास देहरादून, दिल्ली करत तिच्या एकलेपणाला मागे टाकत “ योगी की कहानीया “ पूर्ण करत करत शेवटाला येतो. चित्रपटाच्या शेवटी गाण्याच्या काही ओळी आहेत “ वो जो था ख्वाब सा, क्या कहे जाने दे...वो जो है कम से कम, ये रहे के जाने दे “
आपल्या आयुष्यात येणारी वेगवेगळी माणस आणि त्यांना प्रत्येकाला जिंकण्यासाठी आपली सुरु असलेली चढाओढ. आपल्या हातात असताना नसताना गमावलेली माणस आणि त्यात हरवलेलं आपलं काहीतरी. हे सगळंच या चित्रपटात पाहायला मिळेल. खर सांगायचं तर आपण आपल्याच चार माणसात आपली जागा शोधत असतो. ती निर्माण करत असतो. त्यात ही आपल्याला हवी असलेली किंवा न कळत आपल्याशी बांधली गेलेली माणस जपत जपत आयुष्य काढत असतो. आपल्या आयुष्याची तीच घडी मोडणारी एखादी दुसरी व्यक्ती आपल्या सहवासात येते, तेव्हा खर तर ती घडी मोडणे जरुरीचे असते. त्यामुळे होणारे बदल आपल्याला गरजेचे असतात. एखाद्याला कोणी विचारपूस करणारे जवळ नाही हे दुःख असते पण यापेक्षा मोठं दुःख आपली निंदा करणारी माणस आजूबाजूला असणे हे जास्त मनात सलत असतात. अशी अवस्था झालेली या कथेची नायिका आणि नायक आयुष्यातुन निसटून गेलेल्या त्याच व्यक्तीच्या शोधात एकमेकांना भेटतात आणि दोन विरुद्ध विचार सरणीच्या या दोघांना बांधणारा हा पूल एका डेंटिग साईट वरून सुरू होऊन आसामच्या पहाडात संपतो.

Tuesday, 22 September 2020

चॉपस्टिक

          चॉपस्टिक हे नाव ऐकल्यावर चित्रपट चिनी, विदेशी किंवा अनिमेटेड वाटेल. पण तसे नाही. हिंदी चित्रपटात तेवढयाच विनोदी पध्दतीने वास्तविक सत्य मांडले आहे. “ निरमा “ कथेची नायिका. थोडी भोळी, भित्री तरीही सगळे सांभाळण्याच्या प्रयत्नात असणारी, स्वतःला कॉर्पोरेट विश्वात “ कॅरी “ करण्यासाठी धडपडणारी मुलगी. याच भोळ्या स्वभावामुळे पहिल्याच दिवशी खरेदी केलेली गाडी चोरीला जाते आणि त्यानंतर ती गाडी शोधण्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट. तिला भेटलेला कथेचा नायक “ आर्टिस्ट “ कथेच्या शेवटी तिच्या गाडी सोबत तिचा हरवलेला आत्मविश्वास ही तिला परत मिळवून देतो.
संकट आले की सर्व रस्ते बंद होतात. त्यातून बाहेर पडण्याचा एक ही मार्ग मिळत नाही. अशा वेळी निरमा उंच इमारतीच्या टोकावर उभी असते. तेव्हा उडी मारायचीच आहे. तर ती आत ही मारू शकतो किंवा एकदा हरवलेली गाडी शोधून “ हे आर्टिस्टचे उत्तर आपल्या ही बऱ्याच प्रश्नांना उत्तर होऊ शकते. आर्टिस्ट खर तर एक चोर दाखवला आहे. सेकंदात बंद कुलूपाचे टाळे खोलणारा आर्टिस्ट, पण ही कला इतक्या लकबीने कशी जमते याचे उत्तर देताना तो म्हणतो “ हर ताले का एक दिल होता है, मै उस दिल की आवाज सूनता हू “ खर तर हा ताला कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या जिभेवर ही असतो. ज्याची किल्ली मनात असते. ज्याला तो आवाज ऐकू येईल तो “ आर्टिस्ट “ नाही का !
आपली चोरीला गेलेली गाडी म्हणजे आपले अंतिम ध्येय... ती गाडी हुडकून काढण्यासाठी गुंडाच्या घरी जाऊन बाहुबलीचे अपहरण करण्या पर्यन्त कथा जाते. इथे आर्टिस्टचे एक सुरवातीचे वाक्य “ हर किसींको कभी ना कभी चोरी करनी पडती है “ .जिने आजवर कधीच आडवी वाट निवडली नसेल ती सहज एका गुंडाच्या घरी दाखल होते. तिथल्या बाहुबली नावाच्या बकऱ्याला चोरते. तिथे ही गाडीच्या मागे लिहिलेलं वाक्य “ दम है तो क्रॉस कर , वरना बरदाश कर “ हा तिच्यात झालेला बदल संपूर्ण चित्रपटात दिसतो.
ती चोरी केलेला बाहुबली परत करण्यासाठी त्या गुंडाकडे परत येते तेव्हा खर तर परत आपल्या गावी जाण्याचा मार्ग तिच्याकडे असतो पण ती बाहुबलीला परत देऊन जाते. का तर तिची सगळ्यात जवळची वस्तू त्या गुंडांनी चोरलेली असते ती म्हणजे गाडी पण बाहुबली काही वस्तू नाही तो मुलाच्या मायेने वाढवलेला बकरा असतो. त्याच्यासाठी एक चॉकलेट देऊन ती तिथून निघते. आर्टिस्ट मागेच उभा असतो. गुंड शरमेने तिची गाडी परत देऊन टाकतो. चित्रपटाच्या सुरवातीला गाडी चोरी होते तेव्हा एक वाक्य टॅक्सीच्या मागच्या काचेवर लिहिलेलं असते “ one mistake, game over “ पण एका चुकीमुळे एक कथा सुरू झाली आणि निरमाला त्या अनुभवाने कायमचे बदलले.

Sunday, 20 September 2020

एक इच्छा

   
 बस स्टॉपवर दोन मित्रांचे संभाषण सुरू होते. अशोक आस्तिक आणि सुधीर नास्तिक विचारधारेचा. तेव्हा शेजारून दोन बायका डोक्यावर पदर, त्यावर टोपली आणि त्यात अंबाबाईची मूर्ती असं घेऊन दक्षिणा मागायला समोर आल्या. त्यांच्या तोंडून वाक्य आले “आईची इच्छा, बाबा...पुरी कर...बाबा. “ अशोकने पाच दहा रुपये टोपलीत टाकले. त्या बायका टोपलीत किती पैसे पडले न बघता आनंदून पुढे निघून गेल्या. त्यावर सुधीर थोड्याश्या नाराजीच्या स्वरात म्हणाला “ इच्छा यांची असते आणि नाव तेवढं त्या देवीचं, तुही सहज देऊन टाकलेस पैसे? अगदीच भोळा आहेस.” अशोकला थोडे वाईट वाटले. त्यावर अशोकने त्याची लहानपणची आठवण सुधीरला सांगितली,
“ लहानपणी एकदा माझी आजी तिच्या आजारपणात मला म्हणालेली, ज्ञानेश्वरी तेवढी वाचायची होती पण ती इच्छा राहिलीच रे... माझ्या कमजोर दृष्टीने आता हे शब्द ही वाचता यायचे नाहीत. माझी शेवटची इच्छा आहे अशोक... ही ज्ञानेश्वरी माझ्यासाठी वाचशील का?” तिचे ते शेवटची इच्छा म्हणून घातलेले गाऱ्हाणे ऐकून मला ही तेव्हा भीती वाटलेली.
शेवटी न राहवून मी म्हणालो “ तुझ्यासाठी वाचतो गं, मला कळणार नाही पण माझ्या आवाजात तु ऐक. “ वयाच्या बाराव्या वर्षी रोज एक एक पान करत तिला मी संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचून दाखवली “
त्यावर सुधीर म्हणाला “ अरे पण तुला कळत तरी होत का काय वाचतोय ते ? “
अशोक म्हणाला “ नाही... सुरवातीला ते वाचायला ही जड गेलं, पण फक्त आजीची शेवटची इच्छा म्हणून मी ते करत राहिलो, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या जिवलगासाठी करायची असते तेव्हा कोणताही विचार न करता आपण ते करतोच आणि तेच मी केलं “
“ मी जसे वाचायचो तशी आजी तिच्या शब्दात मला ते समजावून सांगायची. हळूहळू आजीने तिची शेवटची इच्छा म्हणून असं बरच काही माझ्या तोंडून वाचून घेतलं, नंतर कॉलेजच्या परीक्षेत मला जेव्हा पहिल्यांदाच अपयश आले. तेव्हा तिनेच मला तारले. निराषेच्या अंधारात मी चाचपडत असताना तिने माझ्याकडून भगवतगीता वाचून घेतली. कुतूहलाने मी त्यातल्या श्लोकांचे अर्थ शोधून काढले. स्वतः कडे पाहण्याची माझी दृष्टी मी त्यामुळे बदलू शकलो. मनात साक्षात्कार झाला. त्याचे निमित्त आजीची इच्छा होती. पण पुण्य माझ्या ही पदरात पडले. पुढे अपयशाची भीती कमी झाली आणि ज्यासाठी कष्ट घेतले त्याचं फळ मिळालं.”
“ आपल्या लहान सहान इच्छा आणि स्वप्न पूर्ण व्हावीत आणि ती आपण आपल्या डोळ्यांनी पूर्ण होताना पहावी हीच तर आपली मानसिक भूक असते. मग ते पूर्ण करण्यासाठी घेतलेले कष्ट अशा वेळी आपली जबाबदारी होऊन जाते. त्याला आपण आपले कर्मफळ म्हणतो. आपण हाती घेतलेले काम जर सदकारणी लागणार असेल तर त्याची कारणे शोधत बसू नयेत.... सुधीर, आता आजी पंच्याणवची आहे. आता ही घरी ती माझी वाट पाहते. काही तरी माझ्या कडून वाचून घेते मग निजते. “
आजीबद्दल अशोक कडून हे ऐकून सुधीरला नवल वाटले. त्यांचं संभाषण संपले आणि सुधीरने अशोकला गाभाऱ्यातल्या गणपतीला करतात तसा हात जोडून नमस्कार केला. “ देव इथेच दिसला रे... तुझ्यात “ असे म्हणत दोघे ही हसले. तेवढ्यात बस आली. ते दोघे ही बस मध्ये चढले आणि पाहता पाहता बस नजरे आड झाली.
प्रत्येक गोष्टीकडे आपण आपापल्या दृष्टिकोनातून पाहतो. अशोकने ही तेव्हा तिची शेवटची इच्छा म्हणून सुरवात केली होती, खरं सांगायच तर आपल्या इच्छा, स्वप्न आणि भीती या विस्तीर्ण आभाळाखालीच आपल्याकडून या गोष्टी घडतात. आपण रचनाकर्त्याने घडवलेले प्यादे असतो.

Saturday, 19 September 2020

लंच बॉक्स



       जेवणाची ताटं घेतली. सगळे एकत्र जेवायला बसले. पहिला घास घेतला आणि “ वाह...आजची भाजी काय मस्त झाली ! “ उत्फुर्त प्रतिक्रिया आपसूकच तोंडून आली. त्याच दिवशी दुपारी जेवणं आटोपून “ लंच बॉक्स “ हा चित्रपट घरी सर्वांनी पाहिला.
व्यक्तीच्या अंतरंगात शिरण्याची वाट त्याच्या जेवणातून जाते. माणसाच्या आयुष्यात नकळत आलेले “ सुख “ आयुष्याची दिशा बदलते. चित्रपटाची सुरवात जेवणाच्या डब्यानेच होते. डब्यातल्या चविष्ट जेवणावरून एखाद्या गृहिणीच्या आयुष्यात कसे बदल होऊ शकतात हे बदल यात पाहायला मिळाले.
मुंबईत आणि मुंबईतील सामान्य नोकरदार वर्गात वेळेत डबा पोहोचवायचे जिकिरीचे काम करतो तो डबेवाला. याच डबेवाल्याच्या एका चुकीच्या डब्याने कथा कशी रंगत जाते हे पाहण्यासाठी नक्की हा चित्रपट पहावा.
चित्रपटात “ गलत ट्रेन कभी कभी सही जगह पहूचा देती है “ हे वाक्य कथा शेवटाला येताना खूप काही सांगून जाते. एका चुकीच्या पत्त्यावर पोहोचलेला चविष्ट जेवणाचा डबा एका धीर गंभीर माणसाला रसिक आणि आनंदी करू शकतो. हे त्या गृहिणीचे यश. डबा घेणारा मिळालेल्या डब्यातले पदार्थ चाखून तिखट, मीठ योग्य प्रमाणात असल्याचा अभिप्राय देत असतो किंवा पदार्थ चविष्ट झाल्याची दाद देत असतो तशीच कथा पुढे जाते. हा अभिप्राय देण्यासाठी डब्यातले पत्र असते. ते पत्र तितक्याच उत्सुकतेने तिच्याकडून वाचले ही जाते. शेजार धर्म आणि प्रेमाची देवाण घेवाण वरच्या मजल्यावरून खाली टोपलीतून होऊ शकते हे त्यात वेगळेपण होते. संसारिक जीवनात नातेसंबंधावरचा विश्वास उडत असताना आपली हरवलेली मोकळीक शोधण्याचा प्रवास. त्याची जाणीव करून देणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या हातचे जेवणारी ती अनोळखी व्यक्ती “साजन फर्नांडिस “ आहे हे त्या गृहिणीला कळते. वयाचे अंतर कमी करत आपले मन मोकळे करणारा लंच बॉक्स ती त्यांना पाठवत असते. कामात झोकून दिलेले फर्नांडिस रिटायरमेंट नंतर गावी जाण्याच्या विचारात असताना ते तिथेच थांबतात. त्यांना पुन्हा आपल्या जुन्याच पडक्या घरात यावे असे का वाटले असेल ? त्यांच्या जागी नवख्या व्यक्तीच्या येण्याने त्यांच्या स्वभावात कसा फरक पडत जातो? हे इथे पाहण्यासारखे आहे. पुन्हा एकदा आयुष्याच्या प्रेमात पडावेसे वाटेल असा हा लंच बॉक्स. चित्रपटाच्या शेवटी त्या गृहिणीचे घरकुल जरी मोडत असले तरी तिच्या आणि तिच्या लेकीच्या जीवनाला नवीन सुरवात, नवी दिशा मिळते. आपण किती दिवस त्याच चाकोरीत आपले जगणे सुरू ठेवणार. कधी तरी नवी सुरवात कधी तरी करावीच लागते. “ सुना है भूतान मे रुपये की किमत कम है, लेकिन वहा सब हॅपी रहते है..” म्हणत आपले सुख शोधत ती घराबाहेर पडते. आपले भौतिक सुख ( दागिने ) विकून भूतानला जाण्याचा विचार करते. हा व्यक्ती त्याच सुखाच्या शोधात नाशिकला आपल्या गावी जाण्याचा बेत सोडून पुन्हा आपल्या त्याच घरी परत येतो. ट्रेनमध्ये ऑफिसच्या फाईल वर भाजी कापणारा त्याचा मित्र, बरोबर जेवणाच्या वेळी केळी सफरचंद घेऊन त्याच लंच बॉक्स वर ताव मारणे असेल. अनाथ म्हणून आलेला शेख ज्याला कोणी आपली माणस नाही, नातेवाईक नाही. त्याच्या लग्नात एका बाजूनं मुलाकडून म्हणजे फर्नांडिस एकटे आणि दुसऱ्या बाजूला एक मोठी फॅमिली. कॅमेराची चौकट आपोआप बदलत जाते आणि नात्यातली माणस आणि प्रेमाने जमवलेली माणस लगेच फरक कळतो.
सुखाच्या शोधात पळून आलेले ते दोघे एकत्र येतात. ते ही फर्नांडिसमुळे, जो स्वतः खर तर निरस व्यक्तीमत्व आहे. मग त्याच्यात ही रसिकता आली कुठून ? हे यात शोधण्याची गोष्ट आहे. म्हणून कदाचित या पूर्ण चित्रपटातली ती एक ओळ आपल्याला सगळं काही सांगून जाते. आपल्याही आयुष्यात असे खूपदा घडत असेल. आपण ही कधीतरी चुकीच्या ट्रेनने प्रवास केला असेल, कधी करियरच्या बाबतीत, कधी मैत्रीच्या बाबतीत, कधी नात्यांच्या बाबतीत... कुठल्या तरी चुकून धरलेल्या गाडीने आपण ही योग्य ठिकाणी पोहोचले असू. तेव्हा मनात हेच आलं असेल “ कभी कभी गलत ट्रेन सही जगह पहूचा देती है...!”

Friday, 18 September 2020

भेटली तू पुन्हा

     “भेटली तू पुन्हा” चित्रपट प्रदर्शित झाला होता. सहकुटुंब पाहण्याचा योग आला. सुरुवातीला हिंदीतल्या जब व्ही मेट चा रिमेक वाटायला लागला. पूर्वग्रह आणि वास्तविक अनुभव किती वेगळा असू शकतो. त्यातून बदलत गेलेले निर्णय यावर ही कथा रंगली आहे. नुसत्या घटकाभराच्या ओळखण्यात आणि समोरच्या व्यक्तीला समजण्यात आपण कधी कधी गल्लत करतो. हे या चित्रपटाच्या शेवटी जाणवते. कदाचित त्याच उत्सुकतेपोटी हा चित्रपट पूर्ण पाहिला.
मला प्रकर्षाने लक्षात राहिलेली एक गोष्ट म्हणजे त्यातल्या नायिकेच वाक्य “ प्रवासात खूप मजा मस्ती करत जाऊ “ यावर “आपण काही लहान आहोत का ? “ या प्रश्नावर उत्तर म्हणजे या संपूर्ण चित्रपटाचा गाभा, ज्यात ती बोलते “ या ट्रेन मधून आपल्या सोबत आपल्या बॅगा आणि समान ही हा प्रवास करत आहेत मग त्यात आणि आपल्यात फरक तो काय ? यालाच तर जगणं म्हणतात ना. “
खरं तर आपण सगळेच प्रवास करतोय. आपापली ओझी उचलत. काहींची लहान आहेत तर काहींची मोठी, पण त्यात ही काही नुसती ओझी वाहत प्रवास करत आहेत तर काही त्यातही आनंद आणि अनुभव घेत आहेत. आपण नक्की कोणत्या कॅटेगरी मध्ये बसतो असा प्रश्न तेव्हा प्रत्येकाला स्वतः ला विचारावासा वाटला असणार. मी ही विचारला…. तेव्हा मला ही ‘ हो ‘ किंवा ‘ नाही ‘ मध्ये एक उत्तर सांगणे अवघड वाटू लागले. आपण कुठे एवढा विचार करतो या गोष्टीचा…
आपल्या या प्रवासात आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपण कुठल्या तरी एका डब्यात “ती “ च्या सोबतचे प्रवासी असतो. प्रवास सुरु असतो पण त्या गाडीला एकच डबा नसतो ना... असे अनेक डबे आपल्याला आधी मिळालेले असतात. तेवढ्या एक डब्यातील त्याच विश्व म्हणजे तो किंवा ती नसते, मग जर डबा बदलला. पुढची स्टेशन आली की प्रवास वेगळा वाटू लागतो. आणखी रंगत जातो आणि आपले निर्णय बदलत जातात. मोठमोठी कोडी सोडवणारे आपले डोके कधी कधी साध्या साध्या गोष्टी ही समजू शकत नाही किंवा त्याचा अंदाज ही घेऊ शकत नाही, त्यासाठी तो प्रवास सोबत अनुभवावा लागतो. तेव्हा मनाची कवाडे आपोआप उघडी होतात.
“ तुला पाहिले अन सांज मंद झाली
ओशाळल्या चांदण्या हवा कुंद झाली
शुद्धीत होते आताच सारे
तू पाहिले अन वेळ धुंद झाली...”
या चित्रपटतल्या ओळी मनातून जात नाहीत. तीच जागा जिथे आपण तिला निवडायचे असते. तेव्हा कुठे गाडी योग्य वाटेवर येते. मत बदलतात, निर्णय बदलतात. आणि तेव्हा ‘ भेटली तू पुन्हा ‘ असे वाटू लागते.

Thursday, 17 September 2020

रोजगार मेळावा

        वयाच्या एका टप्प्यावर आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रिय जनांसाठी, आपल्याला काहीतरी करायचंय. ही भावना आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. कधी गरज म्हणून तर कधी स्वतः च्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणून आपण त्यासाठी हवे ते कष्ट घेतो. एकदा ही जाणीव मनात घर करून बसली की मग दुसरे सगळे विचार आपोआप दूर होतात आणि ती एकच गोष्ट समोर दिसू लागते. अनेकांच्या आवडी निवडी , स्वप्न, मौजमजा कधी कधी मागे पडत जातात. तेव्हा आपला प्रगतीचा वेग, त्यासाठी मिळणारी किंमत सारेच मोजले जाते. अशा आयुष्याच्या वळणावर असणारे सारे एकत्र एका छताखाली येतात ते रोजगार मेळाव्यात.
काही येतात छोटी – मोठी स्वप्न घेऊन. काही फक्त अनुभव घ्यायला. काही परिस्थितीला कंटाळून. काही नवी सुरवात करायला. ते ही दोन – चार तासाचा प्रवास करून. मेळाव्याची सुरवातच पुढार्यांच्या भाषणाने होते. विकासाच्या दिशेने जाताना आपण काहीच पाऊले दूर आहोत असे चित्र आपोआप डोळ्यासमोर तयार होते.
साग्रसंगीत स्वागत झालं की आलेल्या युवाना रांगेत उभे राहायच्या सूचना माईक वरून दिल्या जातात. त्या सूचना ऐकून झुंबड उडते आणि शाळेतल्या दिवसांची आठवण डोळ्यासमोरून जाते. मोठाले बॅनर्स, कंपन्यांचे स्टोल दिसतात तेव्हा एखाद्या एक्सिबिशन ला आल्याचा भास ही होतो. प्रत्येकाच्या डिग्री प्रमाणे दहावी पासून एम बी ए पर्यन्त सगळ्यांना वेगवेगळ्या वाटा दाखवल्या जातात. तुमचं करियर आणि तुमचा स्टोल तुम्ही निवडायचा असे धोरण असते. दोन मजली वास्तूत खालच्या मजल्यावर सगळ्या कंपन्या कळतात. त्यात आवड आणि निवड पक्की झाली की दुसऱ्या मजल्यावर मुलाखतीसाठी जायचे.
भाषण ऐकताना माझ्या शेजारी एक गृहिणी बसलेली होती. तिच्यासोबत चार वर्षाचा मुलगा होता. त्याला ती समजावत होती. “आत गेल्यावर मुलाखत घेताना विचारलं तर सांग मी एकटा राहीन. घाबरणार नाही.” त्याने ही मान डोलावली. संघर्ष कुठून सुरु होतो हे त्या मुलाने मूकपणे सांगितले.
काही वेळाने मी तिथून निघाले, निघताना वाटेत एक ताई याच रोजगार मेळाव्याचा कागद घेऊन शोधत शोधत समोर आली. “ ताई हे नक्की कुठल्या दिशेला आहे. मी रात्रीच्या गाडीने आले, इथले काही माहिती नाही ?”
मी म्हणाले “ हो हो, इथून सरळ जाऊन डावीकडे वळा... तिथे बोर्ड लावला आहे बाहेरच... तिथून आत जायचे. “
त्यावर त्या ताईने विचारले, “ थँक्स ताई , तिथे नोकरी मिळते ना...”
मला काय बोलावे ते सुचले नाही. स्मित हास्य करून मी तिथून निघाले.
जेव्हा “ इथे नक्की नोकरी मिळते का ?” असा विचारले, तेव्हा असे वाटले, जिथे लोकांची आयुष्य क्षणाक्षणाला बदलत असतात. तिथे नोकरीची शाश्वती!
असा हा रोजगार मेळावा नोकरीच्या शोधात अनुभव घेता घेता बरेच काही शिकवून गेला.

Wednesday, 16 September 2020

स्वप्न


     
स्वप्न कोणाला...कधी ... कुठे...पडेल सांगता येत नाही. गाढ झोपेत किंवा बसल्या बसल्या डुलक्या घेताना अलगद त्याचे येणे असते. निरनिराळी स्वप्न आपल्या समोर येतात. काही स्वप्नं क्षणिक आनंद देणारी. तर काही भीती घालणारी. काही माणसाचं आयुष्य बदलणारी...
स्वप्न पाहण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे. मग ती सत्यात अनुभवता आली नाही तरी हरकत नाही. ती पडतात – कधी लहान मोठी, भयानक, आश्चर्य कारक , उंच इमारतींची, सुटबुटाची, हिरो -सुपरस्टारची , प्रियकर -प्रियसीची किंवा उज्ज्वल भविष्याची. आकाशातल्या वेगवेगळ्या आकाराच्या ढगांप्रमाणे प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न.
आपल्याला पडलेले एखादं स्वप्न आपल्यासाठी किती महत्वाचे हे आपण ठरवत असतो. जगात असे अनेक जण आहेत, ज्यांना स्वप्नच पडत नाहीत. स्वप्न पडणं किंवा न पडणे यात वैज्ञानिक दृष्ट्या सायकॉलॉजीचा अभ्यास ही आहे.
मला कधी कधी वाटतं स्वप्न पडणं आणि त्या क्षणासाठी त्या काल्पनिक जगात रमणे. जे खऱ्या आयुष्यात कदाचित कधी पाहिले ही नसेल, जगले नसेल ते तात्पुरते जगणं यात वेगळीच मजा आहे. खूपदा आपण ऐकले असेल कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते असे भविष्याचे वेध घेणारे ही स्वप्न असतात. काही स्वप्न आपल्याकडून धाडस, संयम आणि कठोर मेहनत करून घेतात आणि सत्यात उतरत जातात. स्वप्न म्हणलं की ती कशीही असतात, त्याला कोणतीही सीमा नसते. बंधने नसतात. बहुतेक वेळा ती आपली अपूर्ण राहिलेली सुप्त इच्छा, ध्येय किंवा आपली भीती ही असू शकते. त्यामुळे स्वप्न हे आपल्या मनाचे फूट प्रिंट म्हणलं तर वावगं ठरणार नाही. शेवटी म्हणलंच आहे “ मनी वसे ते स्वप्नी दिसे “ जे लोक जागेपणी स्वप्न पाहतात त्यांची ती स्वप्न जीवनाचे ध्येय बनतात. जेव्हा ती स्वप्न त्याच्या जगण्याचे उद्दिष्ट बनत जाते तेव्हा हीच स्वप्न त्यांना झपाटून टाकतात. अशी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणारी व्यक्ती नक्कीच ते स्वप्न सत्यात जगते.
गाढ झोपेत पडलेलं स्वप्न आपल्याला वास्तवापासून कोसो दूर घेऊन जाते की तुटू नये असे वाटते आणि गाढ झोप अशीच आणखी काही क्षण चालू राहावी असे वाटायला लागते. काही वेळा याच गाढ झोपेतून काही स्वप्न खडबडून जागं करतात. हीच स्वप्नाची मजा आहे. वयानुसार, परिस्थितीनुसार , माणसागणिक स्वप्न बदलतात. शाळकरी मुलांची वेगळी. तरुणांची वेगळी. वरिष्ठांची वेगळी. पैशाची, लग्नाची, वस्तूची, गावाची, अज्ञात ठिकाणची, जंगलाची, प्राण्यांची, पक्षांची, हॉस्पिटलची, पोलिसचौकीची अजून थोडे लांब गेले तर परग्रहावरच्या न पाहिलेल्या एलियनची स्वप्न.
खरंच स्वप्नांना सीमा नसते पण धकाधकीच्या जगात स्वप्न पाहण्यासाठी ही पुरेसा वेळ नसतो. स्वप्नाची कवाडे खुली होण्याच्या वेळीच बरोबर घड्याळाचा नेमका गजर होतो आणि स्वप्नाच्या रंजक दुनियेतून आपली एक्सिट होते. त्यामुळे प्रत्येकानेच या विविध रंगी स्वप्नासाठी थोडा वेळ ठेवुन, त्यात रमून त्या क्षणांचा पुरेपूर आनंद घ्यावा. त्यासाठी पुरेशी झोप घ्यावी. स्वप्नांच्या गावी एकदा तरी जाऊन यावे.

Tuesday, 15 September 2020

श्रावण

        रोजच्या रिपरिपणाऱ्या पावसाच्या सरींनी हवेत गारवा आणला होता. हवेतील उबदारपणा सकाळच्या प्रहरी प्रकर्षाने जाणवत होता. भेगाळलेल्या जमिनीवर नव्याने अंकुर फुटत होते. डोंगर कड्यावरून कोसळणारा प्रवाह सृष्टीमध्ये सुंदरता आणत होता. झाडाझुडपांना, वेलींना बहर आला होता. कणाकणातुन या सृष्टीत नव्याने जीवन फुलत होते. ही सारी तो आल्याची चिन्ह होती. तो म्हणजे “श्रावण.”

 

आता ही धरा पुन्हा नव्याने नवं वधूप्रमाणे सजणार होती. पानाफुलांमध्ये, नदीनाल्यात, चराचरात, पशु पक्षांच्या किलबिलाटामध्ये, भोवताली वातावरणात नादमाधुर्य निर्माण झाले होते. नवी उमेद, नवा उत्साह आणि पावित्र्य घेऊन श्रावण उंबरठयावर आला होता . हा सुंदर साजीरा श्रावण  घराघरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. घराघरात उत्साह भरभरून वाहत होता. नागपंचमी, गोपाळकाला, नारळी पौर्णिमा असे सण एका मागोमाग एक सज्ज होते. प्रत्येक सणाचे वेगळं पौराणिक महत्व आणि वेगळा ढंग. स्वतः मध्ये आणि सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा रुजवली जात होती. स्त्री वर्गात श्रावणातले वेगळे महत्व असते ते “ मंगळागौरीचे.”  लग्न होऊन दूर गेलेली लेक या सणाच्या निमित्ताने पुन्हा आपल्या माहेरी आली होती. सैल झालेले ऋणानुबंध पुन्हा जोडले जात होते.   गाठीभेटीनी नात्यामधला रेशमी बंध बहरत होता. नात्याचा ओलावा एकमेकांना जोडून ठेवत होता. नवा उत्साह आणि चैतन्य प्रत्येकात भिनत गेले होते. माणसा माणसामध्ये निर्माण होणाऱ्या या दृढ विश्वासामुळे समाज एक संघ झाला होता आणि नवं निर्मितीकडे वाटचाल सुरु झालीच होती. माणसामध्ये आणि सृष्टीमध्ये होणारे बदल हा श्रावण सोबत घेऊन आला होता.

 

Saturday, 12 September 2020

मनोगत : एक होता कार्व्हर

    नुकतेच वाचण्यात आलेले पुस्तक “ एक होता कार्व्हर “ पहिल्यांदाच जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा कार्व्हरच्या कारकिर्दीने मला झपाटून टाकले. मग हे पुस्तक दुसऱ्यांदा वाचायला घेतलं ते त्यावर लिहिण्यासाठी..
 लहानपणी परिकथेच्या पुस्तकांसोबत वेगवेगळी इन्स्पिरेशनल पुस्तक वाचायची आवड होतीच. त्यात माझ्या वाट्याला आलेले एक कलामांचे “ माझी जीवन यात्रा “ आणि दुसरे म्हणजे “एक होता कार्व्हर...”
खर तर हे दोन्ही माझ्यासाठी आयडॉल झाले ते त्यांच्या सामान्य राहणी आणि असामान्य कार्यामुळे. कदाचित म्हणून मनात घर करून राहिलेली ही पुस्तके कायम लक्षात राहिली.
एक होता कार्व्हर दुसऱ्यांदा वाचून झाले. मग या पुस्तकावर मनोगत लिहिण्याचे ठरवले. वीणा गवाणकर यांच्या अनुवादीत शब्दातला कार्व्हर माझ्या मनापर्यन्त पोहोचला.
गुलामगिरीच्या हिंसक जाचातून आपला देश भरडून निघाला, हा इतिहास आपल्याला माहित आहेच. त्याचे दाखले भारतीय इतिहासात मिळतात. गुलामगिरी इतर देशात ही दहशत निर्माण करत होती. त्यातून तिथे ही धडाडीचे क्रांतिकारक जन्माला आले. त्यातलाच एक क्रांतिकारी विचार घेऊन आलेला मुलगा. त्याची ही कथा.
गुलामगिरीच्या साखळदंडात अडकलेल्या एक जिज्ञासू आणि व्यासंगी व्यक्तीचे नाव “ जॉर्ज वोशिंग्टन कार्व्हर “ त्याची ओळख “ मेरिच पोर “ अशी ही होते.
मेरी हे त्याच्या जन्मदात्री आईचे नाव. अगदीच लहान वयात म्हणजे दोन महिन्याच्या बाल्यावस्थेत असताना त्याच्या आईपासून त्याची ताटातूट होणं. श्वासावर उरलेला मरणोन्मुख जीव उमद्या घोड्याच्या बदल्यात सोडवून घरी आणून पोसणे हे साधारण नाही.
पोरकेपणाच्या या दरीत एक एक करत आपले कलागुण, आपली जिज्ञासू वृत्ती या जगाच्या कल्याणासाठी वापरणे. ते ही स्वतः ची झोळी फाटकी असताना करणे हे आजच्या जगात खर तर रोमांचकारी स्टंट पेक्षा काही कमी नाही.
कार्व्हर ... ज्याने आपल्याच आईला आपल्या डोळ्यासमोर गुलामासारखं उचलून नेताना पाहिलं. आपल्याच आजूबाजूच्या लोकांकडून “ हा निग्रो (काळा) ज्याला धड बोलताही येत नाही तो शिकून काय करणार? “ अशा प्रश्नार्थक नजरांना पाहिलं. कडाक्याच्या थंडीत जेव्हा लोक घराबाहेर पडणं ही मृत्यूची घंटा समजत अशात हा भटकंती करत परगावी जाऊन शिकण्याचे धाडस करतो. एक निग्रो जेव्हा आपल्या फक्त काळ्या रंगावरून जेव्हा गोऱ्याच्या जल्लोषात आपल्याच बांधवांना आगीच्या निखाऱ्यात पेटताना पाहतो. अशा परिस्थितीत पुढे जाऊन शिकायचे आणि या जगाला शिकवायचे धाडस करणारा हा कार्व्हर. त्याने ते करून दाखवले. चित्रकला, संगीत, विणकाम, रंगकाम, वेळ पडलीच तर स्वयंपाक आणि कपड्यांची धुलाई. मिळेल ते सगळं काम केलं. हे एवढं करून नम्रतेने ज्या घरात राहिला त्यांची सेवा केली. ह्या जगाच्या पसाऱ्यात या अनुभवासोबत भेटणाऱ्या एक एक चेहऱ्याने त्याला मेरीची आठवण करून दिली. कदाचित त्याने आईचा चेहरा ही नीट पाहिला नसेल. पण आपली आई अशीच असेल का ? तिचा आवाज... तिच्या केसांचा रंग कसा असेल ...मला इथेच कुठेतरी ती भेटेल का ? या वेड्या आशेवर त्याने सुजनबाईचे विणकाम केले. मारियाआत्यासाठी बायबल वाचले. पेन बाईसाठी ब्रेड, पुडिंग, बिस्कीट बनवायला शिकला. डायमंड ग्रुव्ह वरती त्याला शिकवलेले चित्रकलेचे बारकावे, श्रीमती बड यांच्या साकारलेल्या कलाकृती, पियानोवर फिरणाऱ्या त्याच्या बोटांना लय देणारे सौ मिलहॉलंड याचे स्वर. एक ना अनेक या सगळ्यांमध्येच तो मेरीचा अंश शोधत होतो म्हणूनच अनंतात विलीन झालेला तिचा जीव तेव्हा सुखी झाला असणार. या सर्वांच्या मध्ये राहून मनातलं पोरकेपण त्याने केव्हाच दूर लोटले होते. जगाला जवळ करण्याची किमया या काळ्या कातडीच्या आड लपलेल्या त्या माणसामध्ये नक्कीच होती. गुलामगिरी असावी तर दारिद्र्य आलं आणि अचानक ती नाहीशी व्हावी आणि स्वातंत्र्य मिळावे तर वर्षानुवर्षं गुलामासारखे झिजणारे हात योग्य मार्गांवर लागतील का? हा प्रश्न समोर होता. स्वयराचार होऊ नये म्हणून एखादी आई ज्या प्रमाणे कसे राहावे, कसे बोलावे ? शिकवते त्याप्रमाणे नुकताच गुलामगिरीतून मुक्त झालेल्या अलबेमा शहराला आपले मुल समजून आईच्या मायेने कार्व्हरने वसवले आणि घडवले.
हे हात जे कागदावर रंगानी काहीतरी निर्माण करत होते. ते खर तर वास्तवात निर्मितीक्षम आहेत. या निसर्गात काही तरी नवीन, काही तरी वेगळं निर्माण करण्यासाठी जन्माला आलेले हे लांब सडक बोटं नक्कीच त्या रचनाकर्त्याची आगळी वेगळी चमत्कृती आहे हे त्याच्या हर एक कामातून त्यांनी जनतेला दाखवून दिले.
 उदाहरण द्यायचं तर त्यानी लहानपणी परसदारी फुलवलेली बाग असो किंवा टस्कीगी मधल्या निष्क्रिय, निकृष्ठ दर्जाच्या नापीक झालेल्या जमीनीवर घेतलेली पिके, ज्यावर पुढे जाऊन त्यांच्याच निग्रो विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन दगड विटांनी उभारलेली विद्यालयाची इमारत असो किंवा त्याच्याच घामातून येऊ घातलेली शेंगदाणा, कापसाची शेती. आज जे आपण प्रोसेस केलेलं अन्न घेतो त्याची सुरुवात तिथून झाली असावी. “आपले हात “ “ काळे हात “ ही निर्मिती क्षम असू शकतात ते नवे उत्तम जग उभे करू शकतात. नव निर्मिती करू शकतात. आपलेच हात आपल्या लोकांचं पोट भरू शकतात. “ हा आत्मविश्वास आपल्या अशिक्षित बांधवांमध्ये निर्माण करणारा तो समाजोपयोगी माणूस होता. आताच्या भाषेत सांगायचं तर त्यांचा “ नेता “ म्हणून कार्व्हर कायमच लक्षात राहील.
एकच ठरलेला पोशाख आणि त्यावर विज्ञान आणि ज्ञानाची झळाळी त्याच्या व्यक्तिमत्वाला चार लोकांत नक्कीच असामान्य करते. कोणे एके काळी सांभाळकर्त्या मोझेस बाबांच्या सदऱ्याचा गणवेश करून एक पाटी आणि यायगरने दिलेलं एक पुस्तक दोन सफरचंद आणि जुनाट बूट ते ही खराब होऊ नये म्हणून खांद्यावर घेऊन एकटाच या जगात लिहायला, वाचायला, शिकण्यासाठी निघालेला कार्व्हर उद्या कित्येकासाठी प्रेरणा होऊन उभा राहिलं. असा विचार तेव्हा त्याच्या मनात आला असेल का?
“ जो निसर्गाच्या प्रेमात पडून त्याच्याशी जवळीक साधतो, निसर्ग त्याच्याशीच गुजगोष्टी करतो “ हे त्यांच वाक्य त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात शेतीविषयी निर्माण झालेली अनास्था आणि अढी दूर करण्यासाठी पुरेसे होते.
पुस्तकाच्या शेवटी लिहिलेलं एक वाक्य सुद्धा त्याचे व्यक्तिमत्व विषद करते.
“He could have added fortune to fame …
But caring for neither
He found happiness and honour
In being helpful to the world …”
आपले नाव आणि प्रसिद्धी हे जर प्रमाण मानले तर ते त्याने केव्हाच गाठले होते. पण त्याला लोकांची गरज पूर्ण करण्यातच धन्यता वाटली. कदाचित म्हणून सामान्य राहून कार्व्हर असामान्य वाटला.
भावी पिढ्यामध्ये जबाबदार नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायला हवे असे हे पुस्तक.
जेव्हा आपल्याला वाटेल, आपली या जगाला काही गरज नाही किंवा आपल्याला या जगाची गरज उरली नाही. तेव्हा हाती घेण्यासाठीचे हे पुस्तक किंवा जेव्हा आपल्याकडे आहे ते ज्ञान भरपूर आहे हा अहंकार किंवा आपल्याला काहीच येत नाही हा न्यूनगंड मनाला शिवून जाईल अशा वेळी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. जेव्हा आपल्या जवळच्या माणसांना आपण हरताना...झुरताना बघतो पण बघण्याशिवाय आणखी काही करू शकत नाही. तेव्हा हे पुस्तक त्यांना ऊर्जा देईल. कदाचित एक पाऊल पुढे जाऊन त्यांच्यातला कार्व्हर जागा होईल आणि यामुळे समाजाने तोडलेले, नाकारलेले, हरवलेले लोक, काही दगडाच्या खाणीतले हिरे आपल्या ही हाती लागतील. जे आजवर जगाने पाहिले ही नसतील. त्यातला एक हिरा तो ही होता...कार्व्हर...

Friday, 11 September 2020

संवाद

    माणूस जरी सामाजिक प्राणी असला तरी प्रत्येकाचा स्वभाव आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. माणसाचे स्वभाव तर ब्रह्मांडातल्या ताऱ्यासारखे विभिन्न असतात. त्यांची गणतीच होऊ शकत नाही. प्रत्येक एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी असते. अगदी जुळी भावंड सुद्धा स्वभावाने वेगळी वाटू शकतात. म्हणूनच प्रत्येक माणूस समाजाशी, आजूबाजूच्या लोकांशी कसा जोडला जाईल ते सांगता येत नाही.
कॉलेजात पहिल्याच दिवशी योगायोगाने मला एक मैत्रीण भेटली. त्याच दिवशी अर्धा अधिक क्लास तिला माहीत झाला होता. तिच्याशी बोलायला येणारे अगदी पहिल्याच दिवसापासून भरपूर. माझं गणित जरा वेगळं होतं. मी तशी अबोल पण तिच्या माध्यमातून मला ही वेगवेगळी माणसे कळू लागली. त्यांच्यातले वेगळेपण मी ही शोधू लागले. समोरच्यातले वेगळेपण वाचता आले पाहिजे हे मी त्यातूनच शिकले. समाजात वावरायचे आणि प्रगती करायची तर विविध रंगी, विविध प्रकारची माणसे वाचण्याचे हे शिवधनुष्य उचलावे लागतेच. मग त्यासाठी दहा दिशा आपल्याला खुल्या असतात. आपण योग्य त्या रस्त्यावर चालायचे असते.
खूपदा मला आपल्या संवादातल्या भाषेविषयी प्रश्न पडतो.
माणसा माणसाला जोडणारी ही भाषा शैली नसती तर आपण या समाजात कसे राहिलो असतो ? एकमेकांचे विचार कसे मांडले असते ? तेव्हा एकमेकांशी आपण कसे जोडले गेलो असतो?
यावरून एक प्रसंग आठवला. एक रस्त्यावरचा कुत्रा गेट पाशी नेहमी बसलेला असायचा. बाहेरची कोणतीही व्यक्ती असो तो कुत्रा भुंकायचाच. मागेच लागायचा पण नेहमीच्या चेहऱ्यावर कधीच भुंकत नसे. त्याला ओळखीचे चेहरे शोधण्याची कुठली भाषा माहित असावी?
समोरच्या घरात रोज सकाळी दाणे खायला चिमण्या, कबुतर, कावळे येतात. तेही न चुकता. भाषा माहित नसून हे कसे जुळून येते? या नात्याची ओढ कशी निर्माण झाली ?
जवळच्या व्यक्तीशी, वस्तूशी, पशु-पक्ष्यांशी जुळवून घ्यायला भाषा तर हवीच. मग ही भाषा कधी कधी आपल्या सवयीतून, वागण्यातून, कृतीतून आपोआप येत जाते. शब्द हे तर माध्यम. शब्द विचार प्रकट करण्याचे साधन असले तरी आपल्यातील आपुलकी, प्रेम, दया, नम्रता हीच त्यातील गुप्त भाषा होते.
आपला हा संवाद सुरु असतो, कधी रस्त्यात भेटलेल्या जुन्या मैत्रिणीची खुशाली विचारून. कधी कोणाला मदतीचा हात पुढे करून. कधी आपले विचार परखड पणे मांडून. तर कधी फक्त कोणाशी मनातले बोलून. संवाद हा हवाच मग तो शाब्दिक असो किंवा कृतीतून.
माझा हा संवाद शांत असताना सुरु असतो. कधी तो माझा माझ्याशी असतो तर कधी इतरांशी. माझ्या स्वाभाविक गोष्टीशी. सवयींशी. तर कधी दुसऱ्याच अनोळखी मनाशी. व्यक्त व्हायला खरच भरपूर ठिकाणे असतात ना...

Wednesday, 9 September 2020

पालची यात्रा

       बऱ्याच दिवसांची घरच्यांची इच्छा, आजी आजोबांचा दृढ निश्चय आणि आमचा उत्साह सगळेच योग जुळून आले आणि पालच्या खंडोबाचे जागृत देवस्थान पाहण्याची योजना आखली. तिथून पुढे कोल्हापूरला जाण्याचे बेत आखले होते. मावशीचे नवे घर पाहण्याची उत्सुकता होती. त्यामुळे पहाटेच्या प्रहरी ठरल्याप्रमाणे आम्ही सामानाची बांधाबांध केली आणि सातच्या सुमारास नेहमीच्या ठोक्याला " धावडशी " ला जाणारी बस घरासमोरून गेली. ती पुन्हा चार प्रवाशांना घेऊन दारासमोरून जाणार होती. तेवढा वेळ आमच्याकडे होता. सगळे सामान समोर असताना ही त्याची चार वेळा पडताळणी झाली. काही मागे सुटायला नको म्हणून किती तरी वेळा उजळणी केली. " चला चला निघू लवकर " म्हणत म्हणत बस आली आणि धावडशीने धावत्या वेगात सातारा बस स्टँड गाठले.
प्रवास म्हणले की काही ना काही साहसी खेळ येणारच याची अंधुक चाहूल लागलेलीच होती. मागच्या सीटवर काही लहान मुले बसली होती. नऊ दहा वर्षाची असतील. बस मध्ये चढल्यापासून त्यांचा गोंगाट काही कमी होत नव्हता. जास्त प्रवासी नसल्याने चालत्या बस मध्ये नुसता धुडगूस सुरू होता. त्यांच्या मातोश्री " सोन्या गप बस इकडे..." म्हणून थकल्या. सोन्या काही ऐकेना. शेवटच्या सीटवर बसून काहीतरी मजा मस्ती करताना अचानक सोन्या आणि त्याची भावंड एकदम घाबरली आणि मोठ्याने रडूच लागली...झालं ना ! नक्की काय झालं बघायला मातोश्री मागे आणि कंडक्टर सकट सगळ्या प्रवाशांच्या नजरा मागे, सोन्या " उंदीर ...उंदीर " ओरडतच आई जवळ येऊन गप गुमान बसला. छोटेसे उंदराचे पिल्लू आणि सगळा गोंधळ शांत अगदी सोन्या ही. वातावरण शांत झाले ना झाले धावडशी स्थानकात बस दाखल झाली.
पुढे ठरल्याप्रमाणे काशीळ गावी जाण्यासाठी आम्हाला बस पहायची होती. नियोजित वेळापत्रकानुसार त्यावेळी ती आमची वाट पाहत तिथे हजरच होती. पटापट बस मध्ये बसलो. सातारा स्टॅन्ड वर गेलं की सगळ्यात आधी आठवतं ते " सातारचे कंदी पेढे " इतके दिवस इथेच होतो तरी पुन्हा पेढे घेण्याचा मोह काही आवरता आला नाही. सगळे गाडीत बसले आणि मामानी पेढे आणायला दुकान गाठले. कंडक्टर आले, बस सुरू झाली तरी मामा काही आला नाही. तेव्हा फोन ही आमच्यासाठी नवा पाहुणा होता. त्यामुळे खिडकीतूनच मामा कुठे नजरेस पडतो का पाहिले. बस जवळ जवळ निघाली आणि स्थानकाबाहेर गेल्यावर मामाने बस थांबवुन सिंघम एन्ट्री घेतली. कंदी पेढ्याचा गोडवा तेव्हा थोड्या वेळासाठी कमी झाला होता. गाडी सातारा सोडून पुढे आली होती. माझा आवडीचा छंद म्हणा किंवा उत्सुकता म्हणून वाटेत जी छोटी छोटी गाव लागतात त्यांची नाव वाचायचे. काही अगदीच मजेशीर होती ती लक्षात राहायची. अशीच नवी गावं एक्सप्लोर करताना तिथं " अतीत गाव " ही वाचलं आणि नवल म्हणजे तिथे बस थांबली. हातात तिखट मीठ लावलेला पेरूचा तुकडा आणि आपल्या आडनावाचे गाव सापडल्याची खुशी चेहऱ्यावर घेऊन तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. काहीच नाही तर किमान या प्रवासात आपलं गाव मिळाल्याची ही एक अचिव्हमेंट होती. तुम्ही कुठले म्हणल्यावर द्यायला एक उत्तर आता माझ्याकडे होते.
गाडी सुरू झाली. बस मध्ये बसायचं म्हणलं की आपली पहिली धाव असते खिडकीसाठी. आम्ही भावंड खिडकीचा प्रत्येकाला लाभ घेता येईल यासाठी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत असू. यावेळी मात्र असे झाले नाही. खिडकीतून आत येणाऱ्या बाभूळ झाडाने चांगलीच झोप उडवली. रस्त्यात घनदाट झाडी असताना नकळत एक झाडाची फांदी खिडकीतून आत आली आणि त्याची पान लागून गेली. डुलकी मारणारे खिडकीतले मुसाफिर खडबडून जागे झाले. मागे बसलेली म्हातारी आजी " भूत आला...भूत आला " म्हणून ओरडायला लागली. थोड्या वेळासाठी क्षणिक शांतता आणि नंतर सगळ्यांनी च बाभळाच्या भुताचा आनंद घेतला. आजीसोबतच्या नातवाने " भूत पुन्हा येईल " म्हणत आजीची विंडो सीट स्वतःकडे घेतली. आजी ही हसून " घे बाबा..घे तुझी शीट " म्हणत चार हात लांब झाली. गोंधळ वेगळाच पण लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे आजी पुढचा संपूर्ण प्रवास नातवाला जवळ घेऊन कवटाळून बसली.
काशीळला उतरल्यावर तिथल्या लोकल टॅक्सीने सहज पालीच्या खंडोबाचे दर्शन झाले. सगळे होम हवन, अभिषेक झाल्यावर मंदिराची कोरीव बांधणी पाहिली. तिथे खंडोबाच्या यात्रेत रथयात्रेत फिरवला जाणारा भव्य रथ पाहिला. ज्यावर हत्ती, घोडे याचे सुबक कोरीवकाम दिसले, तिथले गगनाला भिडणारे दीपस्तंभ, मंदिराचा कळस आणि मंदिर सर्वांनी हळदीची पिवळी शाल पांघरली होती. भव्य हत्तीचा ऐरावत मी पहिल्यांदाच तिथे पाहिला होता. देव दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे आलबेल आहे म्हणे पर्यन्त कुठे तरी माशी शिंकली. आम्ही ज्या गाडीत बसलो होतो त्यात जिथे आजोबा बसले होते त्याच सीटच्या खाली मोठ्या आवाजाचा स्पीकर ठेवला होता आणि त्यावर कुठल्याशा हिंदी चित्रपटातले भडक गाणे लावले होते. बिघडलेल्या नव्या पिढीवर थोडा वेळ टिप्पणी करून आजोबांनी दुसऱ्या गाण्याची फर्माईश केली. गाणं काही बंद होईना. अचानक गाण्यासोबत गाडीच बंद पडली. मुख्य रस्ता अर्धा किलोमीटर दूर होता. आजोबांनी गाणं बंद झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला पण गाडी सुरू होईल या आशेवर गाडीत बसलेल्या सगळ्या पुरुष मंडळीना गाडी ची ढकल गाडी करावी लागली. त्यात गंमत म्हणजे आमच्या सोबतचा एक प्रवासी त्या ड्रायव्हरला ओरडण्याऐवजी गाणी म्हणत म्हणत गाडी ढकलत होता " साथी हाथ बढाना ...एक अकेला थक जयेगा मिल कर धक्का लगाना " " दे धक्का " असे काहीसे शब्द तेव्हा त्याच्या मुखातून येत होते. नाही म्हणता म्हणता काशीळ गाठले. यात्रेतील रथ ओढण्याचे सामर्थ्य तेव्हा त्या सगळ्या पुरुषांमध्ये आले असावे. काशीळला पोहोचलो. तिथून पुढचा थांबा कोल्हापूर ठरवला होता पण तिथे जी गाडी आली ती होती उम्रज गावी जाणारी . पुढची गाडी तासाभराने होती. त्यामुळे मिळाली त्यात पटकन चढलो. गाडी उम्रजला येई पर्यन्त दुपारचे रखरखीत ऊन आले होते. रसवंतीच्या थंडगार उसाच्या रसाने जीव शांत झाला. पुढे कोल्हापूर गाठण्यासाठी लागणारी ऊर्जा तिथेच मिळाली. योगायोगाने कोल्हापूर गाडी ही लगेच आली त्यासाठी ही द्रुतगती मार्ग ओलांडण्याचे दिव्य करावे लागले, पण आम्ही सुखरूप कोल्हापूर गाठले. मावशीच्या नव्या घरात गृह प्रवेश झाला. सर्वांच्याच हा प्रवास लक्षात राहिला.

Monday, 7 September 2020

ती स्पेशल

    शाळेत नव्याने रुजू झाल्या असताना पहिल्याच दिवशी मी सातवीच्या वर्गात तासाला गेले. पहिलाच तास चांगला गेल्यामुळे चेहऱ्यावर तो आनंद होता. जाता जाता एक दोन प्रश्न विचारले. एक एक जण उठून उत्तर देत होते. त्यात एक हात वर आला. तेव्हा सगळ्या मुलांत ती मला वेगळी भासली. पहिल्याच बेंच वर ती बसलेली. ओळख करून घेताना तिच्या चेहऱ्यावरच्या अढळ खळीच्या हास्यात बरंच काही दडलेले असणार हे मला तेव्हाच जाणवलं. ती एक स्पेशल चाईल्ड होती. पुढे रोज शाळेत जाण्याच्या वाटेवर ती मला भेटायची. एकदा माझ्या सोबत ही आली होती.
रुबेला मिझेल लसीकरणाच्या दिवशी तिच्या दुर्धर आजाराबद्दल मला माहिती मिळाली. त्या दुर्धर आजारामुळे तिला जास्त मेहनत करायची नव्हती. ठेंगणी, कुरळ्या केसांची, बोलकी " ती स्पेशल." बोलण्यातुन चौकस वृत्ती लगेच कळत होती. नवीन गोष्ट शिकण्यासाठी थोडा वेळ घ्यायची पण शिकण्याची आवड मात्र दांडगी होती. तिचे अक्षर तिच्यात दडलेले सौंदर्य नेहमी दाखवायचे. एकदा माझे काम करत असताना ती टेबलाजवळ आली आणि तिच्याबद्दल मला सांगू लागली. तिला मी तिचे अक्षर खूप छान आहे सांगितले, खूप कौतुक केले. त्यावर तिने तिच्या घरचे, गावाचे, घरातल्याबद्दल सांगायला सुरूवात केली. नेहमी माझ्याकडे पुस्तक घेऊन प्रश्नाची उत्तर शोधायला यायची. तिला प्रश्नांची उत्तरे शोधून देताना किती तरी प्रश्न तिच्या बद्दलचे माझ्याकडे निरउत्तरीत राहायचे. जे कायम मनातच राहिले. अशीच एक स्पेशल मला पूर्वी एकदा भेटलेली.
 लहानपणी मला घरी कंटाळा आला की जवळच्या बागेत जायची सवय होती. आम्ही खूपदा उन्हाळयाच्या सुट्टीत जांभळाच्या, आंब्याच्या, खजुराच्या बिया घेऊन जायचो. तिथे मातीत रुजवून ठेवायचो. कधी तिथल्या चिमण्यासाठी दाणे, तर कधी कुत्र्याच्या पिल्लांसाठी दुपारची पोळी अस बरंच काही सोबत असायचं. तिथे ही अशी एक स्पेशल मुलगी भेटली होती. तिच्या आईसोबत ती यायची. वय पंधरा सोळा असेल. ती आली की तिला झोपाळा खेळायची भारी हौस. तिथे शाळेत शिकणारी काही लहान मुले यायची. ती आली की ती मुलं सुरवातीला लांब पळायची. एक दोन दिवस हा क्रम सुरूच होता. नंतर बऱ्याच दिवसांनी एकदा आम्ही गेल्या असताना ती त्या शाळेतल्या मुलांना झोक्यावर बसवून झोके देताना मी पाहिलं. अचानक असे काय झाले असेल ? तेव्हा प्रश्न पडला होता. मग एकदा ठरवून तिची ओळख करून घेतली. तिच्या आईने तिची ओळख करून दिली. तिने एक गाणं पण ऐकवलं. थोडा वेळ बोलले, तेवढ्यात तिथली लहान मुलं आली आणि तिला घेऊन गेली. नंतर बरेच दिवस मी बोलले तिच्याशी. आमच्यासोबत खेळली ही होती. जमेल तस तिला ही तिथले खेळ शिकवले. एक चांगली मैत्रीण मिळाली होती. तिला तेव्हा सांगायचे होते " ती खूप स्पेशल झाली तिथल्या सगळ्यांसाठी." पण नंतर ती आलीच नाही. आमची सुट्टी संपली तसे माझे जाणे ही बंद झाले. नंतर जेव्हा शाळेत त्या मुलीला पाहिले तेव्हा झपकन बागेतली हरवलेली मैत्रीण डोळ्यासमोर आली.
शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती. ती त्या दिवशी वक्तृत्व स्पर्धेत बोलू शकली नाही. तेव्हा तिला पाहिले. तिचा चेहरा पडलेला. तेव्हा आधीचे राहिलेले बोलणे आता पूर्ण करावे असे वाटले. तिला सांगावे. मी तिच्या जवळ गेले तिला सांगितले, " ती स्पेशल आहे...वेगळी आहे पण खास आहे. "
एक फिजीकली चॅलेंज तर दुसरी मेंटली चॅलेंज अशा दोन वेगवेगळ्या भेटीत मला दोन सशक्त मन भेटले. ज्यांनी इतरांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केले. या समाजाला ज्याची गरज आहे अशी ऊर्जा त्यांच्यात खर तर होती. ती जपण्याचे धाडस या व्यस्त समाजात त्यांचे आई वडील करू शकतात हे ही कमी नव्हते. ती स्पेशल होती म्हणून लक्षात राहिली. ते वेगळेपण त्यांना पुढे शक्ती देईल.

Sunday, 6 September 2020

प्रेमाची तिची व्याख्या

     प्रेम आणि हट्ट या दोन भावनांमध्ये आपली कधी कधी गल्लत होत असते. या दोन परस्पर विरोधी भावना मध्ये, माणसाचं मन हे एक समुद्रासारखे लाटावर वाहत असते. ज्या वेळी ह्या परस्पर विरोधी भावनांच्या मोठमोठया लाटा येतात. त्या वेळी तो समुद्र जोरजोरात उसळू लागतो, नाहीतर एकतर शांत होतो. आपल्या समोर येणारी प्रत्येक व्यक्ती किंवा परिस्थितीनुसार या लाटा कमी जास्त अंतराने नेहमीच उसळत असतात. जर उत्कट भावनेने उसळले तर शांत करायला लागते ते प्रेम याउलट त्याचा उद्रेक व्हायला लागतो तो हट्ट.
आपलं मन एक स्क्रीन आहे ज्यावर दररोज वेगवेगळे प्रसंग दिसतात. ती नेहमी बदलत असते आणि खर तर बदलली पाहिजे कारण सगळे दिवस सारखेच नसतात. आज जे आहे ते उद्या नसेल कदाचित. किंवा आज जे नाही ते उद्या मिळेल. यात काहीच स्थिर नाही. स्थिर आहे ते मन आणि ते स्थिर ठेवण्याचे काम करते ते प्रेम.
लहानपणी एखादी वस्तू आवडली की आपल्याला ती हवी असायची मग त्यासाठी काही वाट्टेल ते करायचं हा हट्ट. पण एखादी वस्तू आवडल्यावर आपण ती आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला जर देऊ शकलो तो ही ती सांभाळून ठेवील या भरवश्यावर देणं हा विश्वास. हे झालं प्रेम.
दुपारी झाडांना पाणी देता देता थोडं पक्षांना पण शेजारी ठेवायची सवय मला आईमुळे लागली. पुढे तो दिनक्रम झाला. त्यांनी ते प्यावं ही माझी इच्छा असते. ते माझ्या नकळत येतात आणि पाणी पिऊन उडून जातात. दुसऱ्या दिवशी स्वतः हुन येतात. त्यांची काळजी आहे म्हणून त्यांना मी पिंजऱ्यात बांधून ठेऊ शकत नाही किंवा पुन्हां पुन्हा येण्यासाठी भाग पाडू शकत नाही. ते आपसूक येतात आणि सकाळ सकाळी चिवचिवाट करतात. तसेच काहीसे प्रेमाचे गणित असावे. प्रत्येकाने प्रेमात आंनदी असलं पाहिजे पण त्यात असलेला आनंद हा कोणत्यांही वस्तू किंवा माणसात नसावा. आपण इतरांना आवडू लागतो. कोणीतरी आपल्याला आवडू लागते बरेचदा हे आवडणे म्हणजे स्वभाव असू शकतो, त्याच दिसणे आणि वागणे, बोलणे असू शकते. मग जर तो स्वभाव बदलला, चेहरा बदलला तर काल आवडणारी व्यक्ती अचानक आवडेनाशी होऊ शकते, जर ते प्रेम एक गोष्टी पर्यंत सीमित ठेवलं तर ती गोष्ट नाहीशी झाली की दुरावण्याचे दुःख ही येतंच पण त्याला जर कोणत्या वस्तू किंवा व्यक्तीच्या ही पुढे नेलं तर आपोआप ही भावना वैश्विक होते, ज्या प्रमाणे एखादे घर समुद्र किनारी असेल तर लाटा येऊन ते उध्वस्त करण्याची भीती असते पण तेच घर जर लाटापासून दूर एखाद्या स्थिर ठिकाणी असेल तर कितीही लाटा आल्या तरी आपलं घर स्थिर राहील आणि आपण लाटांचा आनंद ही घेऊ शकतो. इथे आपलं घर म्हणजे मन आहे, ज्याचा आनंद हा कोणत्याही भौतिक सुखात नाही तरीही त्याला ते सगळं आनंदाने उपभोगता येते. कारण त्यात ही ते रमते. ज्याप्रमाणे लहानपणापासून आई- वडिलांचे प्रेम मिळाले तरी आपण कधीतरी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यापासून दूर जातो तसेच जर प्रेमात राहायचं तर वैश्विक राहू शकतो. प्रेम देणे हा आपण निवडलेला पर्याय असू शकतो. त्यात दुरावण्याचं भय नसतं. चुकलं तर वाट दाखवत ते प्रेम, खुपल तर काळजी करत ते प्रेम आणि वाट वेगळी असली तरी त्यावर चालण्याचं बळ देतं ते प्रेम, जग रहाटी शिकवत ते प्रेम. पण याउलट जे हवंय ते कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही थराला जाऊन मिळवणे हा हट्ट. प्रेमाला अदृश्य सीमा असतात. हट्टाला नाही. प्रेम द्यायला शिकवते तर हट्ट घ्यायला. प्रेम डोळे उघडते तर हट्टाने ते मिटतात. प्रेम माणसांना जोडते तर हट्ट ते तोडण्याचे काम करते. प्रेमात आपुलकी आणि आनंद आहे तर हट्टात अहंकार आणि असूया. त्यामुळे जर कोणाला जिंकायचं असेल अगदी स्वतः ला सुद्धा, तर प्रेमभाव ठायी ठायी रुजवावा, कारण प्रेम हे आपल्याच हृदयात असते.

Saturday, 5 September 2020

पुस्तक आठवण " हसरे दुःख "

     विसाव्या शतकात जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर सारी जनता दु:खात होती, त्यांना हसवण्याचं कारण बनून आलेला अवलिया एका लहानशा गावात आपल्याच अडचणींतुन वाट काढत, हस्यसम्राट म्हणून उजळत होता. आपल्या विनोदी हालचालीने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या मुकाभिनय आणि विचित्र हावभावाने विनोदी रंगमंचावर आपले नाव कोरणारा एक कलंदर, अफलातून व्यक्तिमत्त्व इंग्लंड मधल्या लंडन शहरात वाढत होता. सर्वसाधारण कुटुंबातून पुढे आलेल्या चार्लीला वडिलांची व्यसनाच्या आहारी गेल्याने हवी तशी साथ मिळाली नाही. लहान वयातच वडीलांचे मद्यपानाच्या सवयीमुळे निधन झाले आणि घरची जबाबदारी दोन भावंडावर पडली. आई घरच्या घरी शिवणकाम करून गरजेपुरते पैसे मिळवत होती. दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची ही शाश्वती नसताना रोज एक वेळ मैद्याचा ब्रेड आणि उकडलेला बटाटा खाऊन महिने काढले. कधी आठवड्याचे सलग दोन दिवस उपासमार झाली. मोठ्या भावाने किस्टोन स्टुडिओ मध्ये आवाज चांगला असल्याने गाण्याचे कार्यक्रम करून पैसे मिळवायला सुरवात केली. आई आणि भावाचे कष्ट पाहून छोटा चार्ली सुद्धा रंगमंचावर आपली कलाकारी दाखवून दोन आणे कमवू लागला. त्यातून त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. बऱ्याचदा आपल्यात असलेल्या कलागुणांना वाट देणारी व्यक्ती आपल्या या प्रवासात कधी ना कधी भेटते आणि तशीच सुमधूर आवाजाची हेना त्याला भेटली. तिच्या सुमधुर आवाजाने चार्ली तिच्याकडे आकर्षित झाला. दोघेही आपापल्या कालागुणांनी रंगमंच गाजवत होते. पण त्यांच एकत्र येणे अधिक काळ टिकले नाही. काही कारणाने हेनाच्या आवाजाने तिच्या अडचणी वाढवल्या. त्यामुळे तिची साथ चार्लीला मिळाली नाही. हेना अचानक दुरावल्याच्या धक्क्यातून सावरतच ज्या आवाजाने आपला ऐन वेळी घात केला त्या आपल्या आवाजाला मागे टाकत मूक अभिनयाची जादुई दुनिया पुढे आणत लिटील ट्रम्पचा जन्म झाला. त्यातूनच या मुकाभिनयच्या नव्या पर्वाला सुरवात झाली.
काळी टोपी, ढगळदार पायघोळ पॅन्ट, पांढरा शर्ट आणि लहानशी मिशी त्यावर न ढळणारे स्मित हास्य. एकाच व्यक्तिमधले हे विरोधाभासी दोन पैलू देणारा हा विनोदवीर . शून्यातून स्वतः ची नवी जागा निर्माण करून जगाला मुक्या भाषेने हसवण्याची नवी कल्पना देणारा चार्ली " हसरे दुःख " स्वतःकडे ठेवून आनंद मात्र वाटत राहिला आणि कायमचा लक्षात राहिला.

Thursday, 3 September 2020

चलती का नाम गाडी - मुंबई लोकल

   

मुंबई लखलखाटाची, झगमगाटाची, श्रीमंताची, गरीबाची, चाकरमान्यांची, राजकारण्यांची, व्यापाराची, जेवढी मालकाची तेवढी कामगारांची, ज्याने जसे जावे तशी वळणारी, ज्याने जसे पाहावे तशी कळणारी, कोड्यात घालणारी , हळूहळू उलघडत जाणारी, थोडी मजेशीर वाटणारी, कधी डोकं उठवणारी अशी तुमची आणि आमची जीवाची मुंबई .

अनेकांनी आपापल्या शब्दात मुंबईचे वर्णन केले. प्रत्येकाच्या चष्म्यातून प्रत्येक वेळी ती वेगळीच कळली. कदाचित हीच तिची खासियत. मुंबई हे नाव जरी लहान असलं तरी त्याहून बरच काही त्यात सामावलं आहे. तिच्या या विविध रंग छटांना एकमेकांशी जोडायच जिकिरीचं काम करते ती मुंबईची लोकल. दिवस रात्र धावणारी हि लोकल आपल्याला मुंबईची तोंड ओळख करून देते. नवख्या पाहुण्याने मुंबई समजून घेण्यासाठी एकदा तरी या लाइफ लाईन मधून प्रवास करणे जरुरीचे होते. याच सफारीतून मी अनुभवलेले काही कडू गोड अनुभव सांगण्याचा प्रयत्न करते.

 खर तर या धावत्या मुंबईचे वर्णन करण्यासाठी पाने अपुरी पडतील. प्रत्येक वेळी त्यातून प्रवास करणे आणि तऱ्हेतऱ्हेचे लोक पाहणे म्हणजे नव्या विश्वाचे दार उघण्यासारखेच आहे. ज्याच्या किल्ल्या इथे घाम गाळणाऱ्या प्रत्येकाच्या हाती आहेत. टाळा मात्र एकच मुंबईचा वेग. हा वेग स्टेशनात प्रवेश करताच कळतो. पहाटेच्या प्रहरी डिजिटल कोंबडा (मोबाईल ) कानाशी आरवतो आणि आणखी एक वेगवान दिवसाची जोरदार सुरवात होते. जीवावर आल्या असताना आपल्या भविष्याची गरज म्हणून बळ येतेच. नव्या प्रवासाला सुरुवात होते. त्यासोबत या प्रवासात येणाऱ्या अनुभवाची ही जोड असते. सकाळ सकाळी जेव्हा डोळ्यांच्या पापण्या निटशा उघडल्या ही नसतात अशात आपले बाडबिस्तार आवरून, चेहरा सजवून त्याच नेहमीच्या लोकलच्या भोंग्याचा आवाज ऐकायला आसुसलेले कान आणि पाय स्टेशनात धाव घेतात. तिथे प्रवेश झाल्या झाल्या च घड्याळाच्या काट्यावर धावणारी मस्तके नजरेस पडतात अन लोकलचा जिवंत असण्याचा प्रत्यय येतो. प्रत्येकाच्या जगण्याचं साचेबद्ध नियोजन इथे प्रवासात ही पाहायला मिळत. सकाळी नेहमीप्रमाणे ७.३५ ची लोकल पकडण्यासाठी केलेले अविरत प्रयत्न, कष्ट आणि चुकली तर होणार दु:ख हे इंडिया पाकिस्तान च्या क्रिकेट मॅच मध्ये होणाऱ्या पराभवापेक्षा काही कमी नसतं. मला आठवतंय मैत्रिणींसोबत जाताना बऱ्याचदा गाडी पकडण्याच्या नादात झालेल्या धावपळीत आम्ही नेहमीच शेवटून पाहिल्या डब्यात चढायचो. कारण सुरवातीला कोणती गाडी कोणत्या फलाटवर आपली वाट पाहते हे कळेपर्यंतच तिने फलाट सोडलेलं असायचं. त्यातून ही नशीब जोरावर असेल तर ती समोरच दिसायची. गाडी मिळाली तरी हि लढाई संपत नाही. मुंबईकरांच्या मनात आणि लोकलमध्ये सीटवर आपली स्वतः ची लहानशी जागा निर्माण करणे म्हणजे तारेवरची कसरतच, त्यातही आपापसात जमून आणलेलं आरक्षण आणि त्यातून निर्माण होणारी वादळं कधी कधी मजेशीर वाटतं तर कधी प्रलयाची भीती ही दाखवत. आजू बाजूला लक्ष दिलं कि घरातल्या भांडणापासून ते या देशाच काय होणार इथवर चर्चा रंगते, गुडघेदुखीच जालीम औषध म्हणू नका तर पुढच्या वेळी कुठे फिरायला जायचे इथपर्यंत देशोदेशीच्या चर्चानी इथल्या डब्ब्याचे कान पिकत कसे नाही ? असा च एखाद्याला प्रश्न पडावा असे तरंग नेहमी वाहत असतात. कदाचित म्हणूनच देश बदलण्यासाठीचे खारीचे प्रयत्न इथूनच सुरू होत असावेत असे वाटते. काहीजण या विश्वापासून अलिप्त कानाला इयर फोन लावून बहारदार गाण्यात आणि आपल्यातच मशहुल असतात. काहीच्या हातात ताजे कोरे करकरीत वर्तमानपत्र घडी केलेले असते, खर सांगायचं तर त्या चार बाय चारच्या चौकटीत भलामोठा विश्वाचा पसारा काढून चाळून काढायचा हे ही अजब कसब आहे जे इथे लोकलच्या गर्दीत अनुभवाने शिकता येतं. मधूनच शेजारी बसलेली व्यक्ती त्यात डोकं घालून आजच्या ठळक बातम्या नजर तिरकी करून अविरत कष्टाने वाचण्याचा प्रयत्न करत असते. काहीजण स्वतः च्या विश्वात गढून गेलेले असतात तर काही माझ्या सारखे आजूबाजूला न्याहाळत या लहानशा विश्वाची गंमत घेत असतात. माणसांच्या गर्दीत, रेटारेटीत, गोंधळात, असाच येणारा प्रत्येक दिवस मुंबईकर आव्हानांनी जगत असतो. त्यात त्याच्या पिढ्यानपिढ्या जातात. आणखी एक खासियत म्हणजे या लोकल मध्ये नावारूपाला आलेला छोटा मोठा बिसनेस करणारे व्यक्तिविशेष. यांना व्यक्ती विशेषच म्हणावे लागेल, पायही ठेवायला जागा नसताना त्यात तुटपुंज्या गुंतवणुकीत उभारलेला व्यवसाय करायचा त्यात हि दोन-चार रुपयांचा फायदा करायचा म्हणजे तारेवरची कसरतच. निवडलेल्या भाजीपासून तयार पक्वनापर्यंत, पायमोज्यापासून ते पावडर टिकली पर्यंत साऱ्याच वस्तूंचा इथे व्यापार होतो. या बारा डब्याच्या बाजारात सारच छोटं मोठं सामान विकल जात. इथे मिनरल वॉटर पिणारे आणि ब्रँडेड वस्तू वापरणारे सुरकूतलेल्या हातानी बनवलेले वडी आणि लाडू त्याच आपुलकीने विकत घेतात. पक्वान्ने विकायला आलेल्या आजी कडून चार सुरळीच्या वड्या आणि आलू पराठे हक्काने घेणाऱ्या गृहिणीच्या संसाराची गाडी ही याच भरवशावर इथे वेगात धावते. शेवटी पोटासाठी काय पण हेच खरं ....विश्वासाच्या जोरावर माणसं आयुष्य काढतात. त्याचा प्रत्यय इथे पदोपदी येतो. हि सर्व विश्वासाने जोडली जाणारी यंत्रमानव आहेत आणि हाच विश्वास या शहराला जिवंत ठेवत आहे. या बारा डब्याच्या लोकल मध्ये प्रत्येक डब्यात वेगळ विश्व पाहायला मिळतं. कुठे सात आठ देव भोळ्या भजनी मंडळाचे एका सुरात ऐकू येणारे ”हे भोळ्या शंकरा " तर कुठे चौथ्या सीटसाठी चाललेली वादावादी. कोणाच्या फोनवरच्या तार सप्तकातल्या गप्पा तर काहींच्या वैचारिक गुजगोष्टी. कधी बाळ-गोपालाचे रडण्याचे सूर ...हेच सारं या विश्वाला सजीव आणि उर्जित ठेवते आणि नवीन उत्साह देते. म्हणूनच कदाचित त्याच त्या वाटेवर लोक नव्या उत्साहाने रोज प्रवास करतात. अशा या मुंबई लोकलला मुंबईच छोट मॉडेल म्हणले तर वावग ठरणार नाही. त्या स्वप्ननगरीत जाण्याचा मार्गच जर इतका विविध रंगी असेल तर तिथे जाण्याची, राहण्याची, अनुभवण्याची इच्छा कोणाला नाही होणार !

कालचाच एक प्रसंग, काम आवरून घर गाठण्यासाठी धावत पळत कशीबशी लोकल पकडली. सुटण्याची वेळ होती त्यामुळे नेहमी प्रमाणे जनसागर स्टेशनवर उतरला होता. शिस्तीचे धडे आणि आपल्यातला संयम अशा वेळी प्रत्येक मुंबईकरांच्या डिक्शनरीमधून आपसूकच दूर जातो आणि त्या डब्यात सगळ्या जनसागरातुन वाट काढत एकदाचे स्थानापन्न झाले की जीव भांड्यात पडतो. दैव कृपेने तेव्हा ही मला बसायला चांगली ऐसपैस जागा मिळाली आणि गाडी सुरू झाली. दिवसभराचा शिणवटा आणि दगदग बाजूला सारून मी समोर बसलेल्या चार वर्षाच्या मुलीकडे पाहत होते. ती गालातल्या गालात हसत होती. माझ्याशी गप्पा ही मारत होती. तिचं निरामय हसू आणि बोबडे बोलणे आपोआप जगाचे प्रश्न विसरून तिच्यामध्ये गुंतवून ठेवत होते. क्षणभरात ती माझ्याशी बोलायला लागली आणि तिच्या हातात असलेलं एक रुपयाचं चॉकलेट तिने सहज मला देऊन टाकलं. मी ही ते हातात लपवून तिला शोधायला सांगितलं, आपली आवडती गोष्ट मिळवण्यासाठी ती ही सगळा जोर एकवटून माझी मूठ खोलण्याचा प्रयत्न करत होती. किती अविरत प्रयत्न केले पण रडली नाही. जवळपास पंधरा वीस मिनिटं आमचा असाच टाईम पास सुरू होता. तिच्या शेजारी बसलेली तिची आई सुद्धा तिला खेळताना पाहून निर्धास्त होती. एवढ्या गर्दीत आपल्या लहानगीला खुश पाहून तिचा ही जीव भांडयात पडला. तेवढयात एक काळ्या बुरख्यातील धष्टपुष्ट महिला आमच्या डब्ब्यात चढली आणि माझ्या शेजारी येऊन बसली. मी आत सरकले आणि ती तिच्या समोर आली अन हसणारी ती अचानक रडायला लागली. बराच वेळ तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ही छकुली काही रडायची थांबेना. आजूबाजूचे तिला रडताना पाहत होते. शेवटी तिचे गालावरून ओघळणारे अश्रू त्या शेजारी बसलेल्या महिलेला पाहावले नाही आणि स्वतः हुन उठून तिथून ती दुसरीकडे गेली. पुढच्या सेकंदात पुन्हा ती हसायला लागली. आता याला कोणता चमत्कार म्हणायचा बुवा! गाडी शेवटच्या स्टेशनवर थांबली आणि मी तिच्या सोबत उतरले, आता पुन्हा कधी भेटणार असं म्हणत त्या छोटीने मला ते हातातलं चॉकलेट पून्हा दिले आणि तिच्या बोबड्या शब्दात म्हणली, "ते चॉकलेट आताच खाऊन टाक नाहीतर ती येऊन घेऊन जाईल." ( इथे ती म्हणजे काळ्या सदरातली बाई ) मी फक्त तिचे गोबरे गोबरे गाल खेचले आणि " होय ग राणी " म्हणत तिचा निरोप घेतला. तिची आई आणि मी हसलो. एक ना अनेक बऱ्याच लहान सहान कहाण्या इथे कळतात, जुळतात आणि रंगतात. एका यात्रेमध्ये इतके विविध रंगी , विविध ढंगी अनुभव घडवणारी ही लोकल भन्नाटच म्हणावी लागेल, जी एवढ मोठ विश्व निर्माण करते आणि अशाच आंबट गोड, कच्चा बच्चा, लहान मोठ्या अनुभवातून माणसाला जगायला शिकवते. म्हणूनच म्हणलंय "चलती का नाम गाडी..." ओर एक दिन इस गाडी कि सफर होनी ही चाहीये.


Wednesday, 2 September 2020

मातृभाषा आणि बदलत्या माता

      पाळण्यातले दिवस सरतात आणि जमिनीवर पाऊले रांगायला लागतात. आईचा आधार घेत मुले उभी राहतात आणि बघता बघता चालायला ही लागतात. मुलांची ही होणारी घोडदौड आई आपल्या डोळ्यांनी पाहते. त्याच्या सहवासात अनुभवते आणि पुन्हा नव्याने जगायला शिकते. आपल्या बाळाच्या तोंडून पहिले वहिले शब्द आणि ' आई ' अशी हाक ऐकण्यासाठी तर तिचे कान आसुसलेले असतात. वाळवंटातील मृगजळाप्रमाणे ती त्या आवाजाला घरभर शोधत असते आणि त्याच आईपणाच्या विश्वात ती स्वतः ला ही विसरून जाते.
" बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत जसे रुजावे बियाणे माळरानी परसात " या ओळी मातृत्वांचा आणि मातृभाषेमध्ये जपलेला ओलावा समोर आणतात.
खरं सांगायचं तर बाळाची आणि आईची भाषेची नाळ ही गर्भातच बांधली जात असावी नाहीतर आई मुलामधली ममतेची दरी अशी आपसूक शब्दांनी भरली नसती.
' शहाणं माझं बाळ ' वरून ' बेटा, लिस्टन केअरफुली ' पर्यंतचा बदलत्या माताचा प्रवास, याच माय लेकरामधला भावनात्मक पूल कसा असेल? त्यातला दुवा मातृभाषाच असेल नाही का?
उदाहरण द्यायचं झालं तर नव्याने उदयास आलेले जागतिककरण आणि नैतिकता, शिष्टाचार शिकल्यावर ही माणसामधील संवाद आजही अपूर्णच राहतो. तिथे असे मानवतेचे आणि मैत्रीचे पूल बांधले तरी किती तग धरतात आणि किती वाहून जातात. आई आणि मातृत्वावर भाष्य करतांना माता जिजाऊ आणि शिवराय याशिवाय अपूर्णच. खुपचं साधं आणि तरीही तितकंच घट्ट नात आहे मातेचं आणि मातृभाषेच.
जन्माला येण्याआधी मातृभाषेतून संस्कारांचे बीज घेऊन येणारे आणि सुशासन आणि स्वराज्याचे बाळकडू उराशी बाळगणारे आपले धाडसी बाळ रात्री मात्र झोपवताना ' गुणी बाळ असा जागसी का रे वाया, निज रे निज शिवराया ' म्हणत जिजाई निजवते. या शब्दांमधली भावनांची गुंफण मातृभाषाच करते नाही का ? मग याच मातृभाषेचा आदर करण्यासाठी आपण कमी पडत नाही ना? काळानुरूप जुळवून घेता घेता बदलत्या माता आणि मातृभाषेची कमी होत जाणारी ओढ हे चित्र चांगले की वाईट हा चर्चेचा विषय झाला.
उदाहरण द्यायचे तर त्यातल्याच एका माय लेकाची ही गोष्ट, बलराज उच्च्भ्रू घरातला बारा तेरा वर्षाचा मुलगा. बलराज मोठा झाला तसे त्याला शाळेचे विश्व जवळचे वाटायला लागले. घर आपोआप दूर जाऊ लागले. घरून भरून नेलेला पोळी भाजीचा डबा पुन्हा तसाच भरलेला परत येऊ लागला. मित्रांच्या डब्यातले स्नॅक्स आवडीचे झाले. आपल्या मुलामधला हा बदल तिला दिसत होता पण पहावत नव्हता. हाच निसटत चाललेला नात्याचा पूल कधीतरी अचानक मोडणार नाही ना या भीतीने तिने आपल्या सासूबाईंना ही गोष्ट सांगितली. एकदा शाळेतून दमून आलेल्या बलराजने डायनींगवर आपल्या मित्रांना वडे खाताना पाहिले, आईने केलेले गरम गरम पकोडे, वडे खाण्यात आणि गप्पा मारण्यात मित्र इतके मशहुल झाले की बलराज आल्याचे ही त्यांना जाणवले नाही. त्याचा रडवेला चेहरा पाहून आईच "ये बस" म्हणली. हिरमुसून तो तसाच आपल्या खोलीत गेला आणि आपल्या मित्राच्या हसण्याच्या आवाजाने त्याची अस्वस्थता आणखी वाढवली. बऱ्याच वेळाने सगळे शांत झाले. मित्र निघून गेले आणि तितक्यात त्याच्या खोलीत त्याचा एक मित्र आला. बॅग शेजारी जमिनीवर पडलेली होती. मित्राने त्या बॅगमधून डबा बाहेर काढला त्याच्या समोर उघडून ठेवला ' खाली मित्रांनी सगळेच वडे संपवले रे, तुझ्या मॉमने हे तुला एवढे छान डब्यात दिलेले तू खाल्ले ही नाही , कदाचित हे तिला माहीत होतं." आपल्या डोळ्यासमोरचा तो भरलेला डबा घेऊन बलराज पळतच किचन मध्ये घेऊन गेला आणि त्यातला पहिला घास आईला भरवून तिच्या मिठीत शिरून रडायला लागला “ आय अँम सॉरी, मॉम " त्याच्या तोंडून तिने ऐकले आणि त्याला जवळ घेतले. जसा तो शांत झाला तो तिच्या कानाशी बोलला " आई, उद्या पण देशील का मला डब्यात ? तिच्या डोळ्यातही आता गंगा जमुना वाहू लागल्या . काहीही न बोलता फक्त " हम्म " अस उत्तर देऊन ती त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागली. त्या स्पर्शात हरवलेली आई तिला परत मिळाली. हरवलेली माया तिला परत मिळाली. एवढच काय ते नात मातेचे आणि मातृभाषेचे, जी मोडू पाहणारा माय लेकरातला पूल पुन्हा बांधण्यासाठी ' आई ' नावाची फुंकर घालते. आता या नात्यामध्ये विणलेले रेशमी धागे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या भावनांना वाट देणारे शब्दच असतात नाही का?
मातृभाषेची ही आपल्या सोबत जोडलेली अतूट नाळ फक्त मातृत्व, वास्तल्य दाखवण्यापूर्ती नसून त्याला वेगवेगळे झरोके आहेत. एखाद्या अनोळखी ठिकाणी तुम्ही जाऊन पहा. रस्ता भटकलेल्या वाटसरूला दुसऱ्या प्रांतात आपल्या मातृभाषेचा मिळालेला एक माणूस हा एक दुवा होतो म्हणजे त्यासाठी मृगजळच नाही का ? तेव्हा आपल्या चेहऱ्यावर येणारे समाधान म्हणा किंवा संवाद साधण्याची उत्सुकता आपले गाव, माती एक असल्याची नक्कीच जाणीव करून देते . उदाहरण म्हणून एक किस्सा इथे नक्की सांगावासा वाटतो. बऱ्याच वर्षांनी परदेशी जाऊन, आपले शिक्षण पूर्ण करून मायदेशी आलेले आपले लेकरू घरी आल्या आल्या तोडक्या मोडक्या प्रयत्नाने आपल्या मातृभाषेत घरच्यांशी बोलल्यावर आई वडिलांना होणारे आंतरिक समाधान त्यांच्या डोळ्यात लगेच झळकते आणि सगळ्यांसमोर आपल्या मुलाच्या कामगिरीचे कौतुक सोहळे रंगू लागतात. अशात मातृभाषा न समजणाऱ्या एन आर आयला पहा आनंद बाजूला राहतो. कुठल्या ग्रहावर आलो असा काहीसा प्रश्नार्थक चेहरा घेऊन सगळ्यात मिसळण्याचा अतोनात प्रयत्न सुरू असतो. भाषेत आलेले अवघडलेपण कुठेतरी परकेपणाची भावना घेऊन येते. त्यामुळे देश तसा वेष आणि जसा देश तशी भाषा. भाषेवरील प्रभुत्व आपल्याला, आपल्या विचारांना नेहमी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे प्रांता प्रांता वर बदलणारी आपली भाषा आपल्या प्रांताची, देशाची आणि आपली ओळख बनलेली असताना आई प्रमाणे आपल्याला जपणारी, माणसांना जोडणारी, विचारांना मांडणारी, मने वाचणारी तुमची मातृभाषा जवळची नाही का? न्यूक्लिअर फॅमिलीमुळे गरजा जरी कमी झाल्या तरी नात्यांची गरज असलेले ऋणानुबंध टिकवायचे असतील तर किमान संवाद साधण्यासाठी आपली मातृभाषा रुजवू, टिकवू आणि अजाणतेपणी बनलेली नात्याची दरी मिटवू.

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...