Wednesday, 26 July 2023

पाऊस




पावसातली ती एक वाट आपल्या आठवणीत कायम ताजी असते. त्यावर प्रत्येक पावसात लिहिण्याचा मोह पुन्हा पुन्हा होत असतो. प्रत्येकाचा पाऊस वेगळा. प्रत्येकाची वाट वेगळी. अशा वेळी त्या वाटेवरचा आपला पाऊस कोणाला तरी सांगणे, ऐकणे, ऐकत त्यात भिजून जाणे किती भारी असू शकते ना !

पावसात छत्री घेऊन चालताना असे बरेचदा होते, बाजूने जाणारा पाण्याचा प्रवाह पायाला नकळत स्पर्श करून जातो. त्या पाण्यातुन चालणारी आपली पाऊले भिजतात. तिथेच क्षणभर थांबतात. क्षणिक आनंद घेतात. गार होतात. मागच्या कित्येक दिवसांची कोरड दूर होऊन जाते. वाहणारे पाणी चालताना आपल्या सोबत पुढे जाण्याची शर्यत करते. त्यातल्या इवल्या इवल्या लाटा आपल्याला सोबत घेऊन जातात. त्यांच्यात रमवतात. डागाळलेल्या रस्त्याला स्वच्छ करून जातात. पावसाचे पाणी टिपणारी छत्री थेंबासाठी किनारा होते. हळूच उतरून एखादा पावसाचा थेंब अलगद आपल्या गालावर येतो. हातावर येतो. ओंजळीत येतो. मोत्यासारख्या भासणाऱ्या त्या थेंबासाठी तेव्हा हाताची ओंजळ ही शिंपला होते. पावसाच्या सरी कधी आपल्या छत्रीतून हळूच डोकावतात. त्यांचे हे अडून अडून भिजवणे अल्लड प्रेमच असते.

पावसातली आपली वाट कधीच एकट्याची नसते. तो आपली सोबत करतो. तेव्हा आपल्यावर येणारे पावसाचे पाणी पुसण्याचे हट्ट आपण करू नये. ते क्षणभर तसेच राहू द्यावे. मनाच्या तळाशी असलेली तहान भागवण्याचे काम ते थेंब करत असतात. आपल्यात तो ओलावा येत जातो. हळूहळू तना मनात झिरपत जातो.

गडगडणाऱ्या ढगांच्या आड बरसणाऱ्या पावसात आपल्याला कशाची आठवण येत असेल तर तो आपला मागचा पावसाळा. तेव्हाची पावसाळी आठवण आज ही ओलावा देत असते. म्हणून पाऊस ही तितकाच जवळचा वाटतो. अशा वेळी कवी संदीप खरे यांच्या ओळी आठवतात, एखादी तरी पावसाळी आठवण असते, आपल्याला सांगत असते,

“ पाऊस सोहळा झाला, कोसळत्या आठवणींचा,
कधी उधाणता अन केव्हा, थेंबाच्या संथ लयीचा,
नभ नको नको म्हणताना, पाऊस कशाने आला,
गात्रातून स्वच्छन्दी अन, अंतरात घुसमटलेला “

प्रत्येक पावसाची वेगळी आठवण, वेगळे चेहरे असतात. वेगळे नाते असते, पण पाऊस मात्र तसाच असतो. नव्या प्रवासात आपण कुठे तरी पुढे निघून आलेलो असतो. तेव्हा ही या नव्या प्रवासात न चुकता तो आपल्याला गाठतो. पुढच्या वाटेवर त्याची भेट होणे, डोकावणे, बिलगणे आणि झिरपणे आता हवे हवेसे वाटते. या प्रवासात तो सोबतीचा प्रवासी होतो आणि त्याचे असणे सुखावते. काल ही आणि आज ही...” पाऊस “ संपूर्ण वर्षभर ढगात दाटून राहिलेला जेव्हा बरसून येतो ना तेव्हा सुचवत असतो, “ दूरच्या प्रवासानंतर आपण ही बऱ्याच अंतराने का होईना आपल्या अंगणी परतून यावं. बरसून यावं ... पावसासारखं ... “

Thursday, 6 July 2023

वारी

ही कुठली वारी मी करते ? रस्ता नवा. वळणे नवी. माणसे नवी. थोडी अनोळखी, थोडी ओळखीची. जिथून सुरुवात केलेली, ते ठिकाण ही आता दूर राहिले. इथे रस्त्यात कुठे कुठे खूप गर्दी आहे. कुठे कोणी एकटाच आपल्या शोधात आहे. कुठे आनंद सोहळे आहेत. नव्या वळणावर नवे प्रयोग आहेत. नवे अनुभव आहेत. जुन्या रूढी परंपरा आहेत. त्यांचा हात धरून चाललेली, हातात टाळ घेतलेली आजची तांत्रिक पिढी आहे. इथे मिळवल्याचे कौतुक नाही. गमवल्याचे दुःख नाही. पण चालण्याचे बळ आहे.

ही कुठली वारी आहे, जिथे “ मी “ चा प्रवास “ आम्ही “ होतो ? जिथे वाट एक असते तरी प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. या प्रवासात कोण असते, आपल्याला थांबल्यावर पुढे नेते? कोण असते जे आपली शक्ती होते ! जे चालता चालता थांबायला लावते. अर्धी भाकरी आपल्या पानात घालते. आपल्याही नकळत आपले मळलेले पाय धरते. माणसातल्या देवाला शोधते. नमस्कार करणारा एक वारकरी तेव्हा कुणाकुणात देव शोधतो.

ही कुठली वारी आहे याचे उत्तर शोधता शोधता आपण येऊन पोहोचतो, कुठल्या तरी उंच कड्यावर, जिथून खाली खोल दरी असते. तिथून कळते किती अंतर इथवर कापले आणि किती नजीक आलोय. चालता चालता न येणारा अंदाज उंचीवर लगेच कळून येतो. पण ती उंची पुन्हा जमिनीवर येणं ही सांगत असते. दऱ्या खोऱ्यातून वाहणारा हा मानवी प्रवाह सुचवत असतो, आपले निसर्गाशी असलेले नाते. आपले स्वतः शी असलेले नाते. आपले जीवनाशी असलेले नाते. वाटेत एखादा नदीचा घाट लागतो. नदीच्या पात्रात आपले प्रतिबिंब पाहताना तिरावरची आपली सगळी सुख दुःख, सगळी स्वप्नं आठवतात. त्याचे तरंग उठत असतात. तेव्हा संथ वाहणारे पाणी आपल्या पायाला लागते आणि आपल्या सत्कर्माची आठवण करून देते.

ही कुठली वारी आहे ज्याला परतीची वारी नाही. जो तो येतो एकदा भेटतो. एकदाच भेटलेले असे काही आठवणीतले पान होते. पुन्हा भेटण्याची इच्छा. भेटल्याचे समाधान. परतण्यामागे काळजी असते. पुढे जाण्यात श्रद्धा असते. त्यात रंग एक असतो. रूप एक असते . “ माऊली “ नाव एक असते. पुढे जाण्याचे, मागे पाहण्याचे एकच कारण असते. इथवर येता येता जोडलेले काही, मागे सोडलेले काही... आपलेच काही बोलवत असते.

या प्रवासात कळलेले नवे काही, आठवणीतले, मनातले सांगता सांगता वाटेत विठ्ठलच ऐकणारे कान होतो. लिहिणारे माझे पान होतो. वाचणारे मन होतो. ही वारी आता “ माझी “ नाही “ आमची “ वारी होते.

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...