आज पुन्हा एकदा थिएटर ऑफ रिलेवन्सच्या पावसाळी शिबिराला जायची तयारी सुरू होती. नवे अनुभव घेण्याचा अजेंडा समोर होता. पुन्हा एकदा टेकडीवर नवे शोधण्याचा प्रवास. तिथे पोहोचल्यावर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने निसर्गाच्या पैलुंचा अभ्यास केला जसे कि आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या रंगाची फुले शोधायची. वेगळ्या आकाराचे, रंगाचे दगड शोधायचे. सगळ्यात लहान पान शोधायचे. तिथे आजूबाजूला गवतफुले होती. पांढरी, तपकिरी अशा रंगाची काही फुले होती. अगदी लहान आणि अगदी मोठे दगड होते. वेगवेगळ्या आकाराची, रंगाची पानं होती. त्या शोध मोहिमेत सूक्ष्म दृष्टी, एकाग्रता आणि निसर्गाशी आपले असलेले नाते प्रकर्षाने जाणवले. अंधार पडू लागल्यावर आकाशातल्या ताऱ्यात काही शोधायचे, त्यात कोणाला सावित्रीची चीर दिसायची, कोणाला आणखी काही... अंधारातल्या ताऱ्यांच्या शोधात आपण आपली आवड शोधतो आणि ती सापडते. तसेच काहीसे माझे झाले.
काही वेळ आम्ही एक मोठ्या दगडावर बसून होतो. दूरच्या रस्त्यावरील गाड्यांच्या प्रकाशाला न्याहाळत होतो. वेगाने धावणाऱ्या वाहनाना पाहताना आपल्या जगण्याचा वेग लक्षात आला. तिथे टेकडीवर बसल्या असताना एक विचार मनात आला. अंधाराला आपण इतके भितो पण अंधार नसता तर त्या ताऱ्याचं विश्व कळलंच नसतं... वाटेवरच्या अंधारानेच तर प्रकाशाकडची वाट दाखवली होती.
दुसऱ्या दिवशी त्याच वाटेने जात असताना नवीन वळणे येत गेली. अनोळखी वाटेवर पळता येत नाही. वाट ओळखीची असली की वेग आपोआप येतो. त्यामुळे निमुळत्या वाटेतून अनोळखी वळणे, नदीचे पात्र पार करत परतीच्या वाटेला लागलो. येता येता एका भरगच्च पानांनी भरलेल्या चिंचेच्या झाडापाशी थांबलो. दूरवर डोंगरावर दाटलेले काळे ढग येणाऱ्या रिमझिम पावसाची चाहूल देत होते. हा निसर्गाशी झालेला संवाद आणि भरपूर आठवणी घेऊन मी माघारी आले.

6 comments:
छोटेखानी पण सुंदर लेख लिहीलास ... लेख टु दी पाॅईंट आहे . महत्वाचे दोन दुर्मिळ पाॅईंट्स क्लिक केलेस व त्या आठवणी खूप हृदयस्पर्शी होत्या
छानच
सुंदर लेखन
भारी 😍
सुंदर लेख👌👌❣️
Ty
Post a Comment