Monday, 26 January 2026

आजीची सखी


सखी चतुर्थीच्या सुट्टीची दरवर्षी आतुरतेने वाट पाहायची. गणपती बाप्पा हे एक आकर्षण होतेच पण त्याहून मोठे आकर्षण म्हणजे गणपतीची सुट्टी सुरु झाली कि आजोळी कुडाळला धूम ठोकायची. आजी आजोबांच्या टूमदार कौलारू घराचे दरवाजे चतुर्थीला सखीची वाट पाहत असायचे. सखीचे बालपण शहारातल्या सुखवस्तू त्रिकोणी कुटुंबात गेल्याने अपार्टमेंटच्या बाहेरचे गावपण तिला आजोळी सापडायचे. आवडायचे ही.

यंदा सखी पाचवीच्या वर्गात गेली होती. हळूहळू परिसर ज्ञान तिच्या अभ्यासात वाढत होते. त्यामुळे आजूबाजूच्या जीवसृष्टीविषयी, वेगवेगळ्या परिसंस्था, ऊर्जा, नैसर्गिक चक्र या घटकांविषयी तिच्या मनात कुतूहल होते. यंदा आजोळी गेल्यावर आजीला हे सगळे सांगायचे, आता पर्यन्त जे जे नवीन शिकले त्याची उजळणी आजीकडे करायची हे तिने मनोमन ठरवले. बघता बघता सुट्टी सुरु झाली. सखीने आजोळी कुडाळला जाण्याचा हट्ट सुरु केला. सखीच्या इच्छे खातर आई बाबा सुट्टी घेऊन आजोळी आले. सखीने आल्या आल्या आजी आजोबांना साष्टांग नमस्कार केला. सखीची आजी आणि ती म्हणजे मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी त्यावर तुपाची धार. त्या जोडीशिवाय पोळीची गोडी नाही तसेच काहीसे यांचे नाते. तपकिरी सुती नववार, गळ्यात तुळशी माळ, डोळ्यांवर मोठ्या भिंगाचा चष्मा, हातात हिरव्या बांगड्यांची मूठ, नाकात मोठी नथ आणि लहानसा अंबाडा त्यावर एक सोन चाफ्याचे फुलं. आजीचे हे प्रेमळ रूप सखी डोळ्यात साठवत होती. आजीने सखीसाठी कौतुकाने बेसनाचे लाडू तयार केले होते. पितळ्याच्या डब्यातून आजीने सर्वांसाठी लाडू आणले. एक अखंड लाडू सखीला भरवला. लाडू तोंडात असताना सखीचे गाल टम्म फुगले होते. तशीच तिने आजीला मिठी मारली. मोठ्यांच्या गप्पा सुरु होत्या. सखी तिच्या नादात घरभर हिंडत होती. तशीच ती घरामागच्या अंगणात गेली. अंगणात गेल्यावर सखीचा तिथून पायच निघेना. मागच्या लाकडी दरवाज्यातून अंगणात जायचा रस्ता होता. रस्त्याच्या कडेनेच शिस्तीत काळ्या मुंग्याची रांग जात होती. ती थेट जांभळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून मुळाशी असलेल्या मातीच्या वारूळात दाखल होत होती. आजीला फुलांची, वेलींची भारीच आवड. त्यामुळे एखाद्या गृहिणीने आपले स्वयंपाक घर जसे नेटके ठेवावे तशीच ही जागा आजीने जपली होती. तशीच देखभाल या अंगणातल्या झाडांची, फुलांची आजी ठेवत असे. घराच्या कुंपणावरून धावणारी गडद जांभळ्या, फिकट पांढऱ्या रंगाची गोकर्णाची वेल एकमेकांत सुबकपणे मिसळली होती. एका कोपऱ्यात तीन चार फुट वाढलेला पिवळा, केशरी झेंडू ही तसाच भरभरून फुलला होता. दाराजवळ असलेला सुगंधी पारिजातक फुलांच्या पायघड्या घालत होता. खिडकीशी फुलणारी नाजुक पांढरी जाई, जुई खिडकीचे सौंदर्य वाढवत होती. एका बाजूला अनंत तर दुसऱ्या बाजूला रातराणी. फुलण्यासाठी उत्सुक असणाऱ्या, अंगणाच्या मधोमध असलेल्या लाल बुंद जास्वंदीच्या कळ्या. दिवस रात्र सुगंधाची आणि रंगांची उधळण करणारी ही मंडळी आजीने मनापासून जपली होती. सखी कुतूहलाने प्रत्येक झाड न्याहाळत होती. पानाचे आकार, फुलाचे रंग, त्याच्या पाकळ्या, त्यांची रचना आणि त्यात दडलेलं कुतूहल.

बराच वेळ झाला तरी सखी घरात आली नाही म्हणून आजीच तिची नक्षीदार काठी टेकवत शोधत शोधत अंगणात आली. आजीने सखीला पाहिले आणि विचारले,
" एवढी आवडली ही फुलं सखीला..." सखीने होकारार्थी मान हलवली. आजीने त्यावर तिला सांगितले, " त्यातली बरीच झाड ही तुझ्या पणजी आजी पासुन आहेत बघ, अजून तशीच आहेत. "

सखीला आश्चर्य वाटले. तिने आजीला विचारले " ही झाड एवढे दिवस जगली कशी आजी, तू त्यांची कशी काळजी घेतलीस? "
त्यावर आजी म्हणाली, " मी काही विशेष केलं नाही ग... तीच झाडं एकमेकांना जपत मोठी झाली. इथे येणारी फुलपाखरे, भुंगे, मधमाश्या त्यांना त्यासाठी मदत करतात. आणि मी त्यांच्या वाढण्यात ज्या गोष्टी बाधा आणतात, जसे हे बघ ही जंगली झुडपे, तण, वाढलेले गवत ते मी काढून टाकते. मग ही झाड त्यांची त्यांचीच वाढत जातात. " एवढे बोलून आजीने सखीला घरात यायला सांगितले.

अंधार पडू लागला होता. बघता बघता रात्र झाली. सर्वांची जेवणं झाली. सखी आजीसोबत झोपायला आली. आजीसोबत मनसोक्त गप्पा मारून झाल्या. परिसर ज्ञान ते विज्ञान याची उजळणी ठरवल्याप्रमाणे आजीकडे झाली. गप्पाच्या ओघात आजीने सखीला तिचे अनुभव गोष्टीतून सांगायला सुरुवात केली. सखीने आजीला विचारले " आजी, तूला कधी भीती वाटली तर तेव्हा तू काय करतेस ? "
आजीने सांगितले, " सखी, एखादी नवीन गोष्ट समोर आली कि सुरुवातीला भीती वाटतेच, चुकीचे विचार मनात येतात. तेव्हा मी काय करते माहितीये, घरामागले ते अंगण आठवते. श्रावणात एवढी सुंदर फुलं येतात, अंगण वेगवेगळ्या रंगानी अक्षरशः रंगून जाते. पण त्या सोबतच पावसाळ्यात तिथे गवत सुद्धा वाढते. त्यात साप, सरडे येण्याची शक्यता असते . मग अशा वेळी आपण काय करतो. नको असलेली झुडपे, गवत काढून टाकतो. त्यामुळे इतर झाड पण वाढतात आणि साप सरड्यांची भीती पण कमी होते. तसेच आपल्या मनातली भीती, चुकीचे विचार वेळीच काढून टाकले तर फक्त चांगल्या विचारांची बाग फुलते.

मी या घरात येण्यापूर्वी शाळा शिकले नव्हते. पण लग्नानंतर आजोबांनी घरी सतत पुस्तक आणून आणून मला शिकण्यासाठी तयार केले. त्यात काय बरे असेल? त्या उत्सुकतेने मी पण शिकले. मला हे जमेल का? या प्रश्नाचे उत्तर आजोबांनी कधीच " नाही " म्हणून दिले नाही. आपण शिकत शिकत सुजाण होताना येणाऱ्या या नकारात्मक थांब्याना वेळीच छाटले तर पुढे जाण्यासाठी आपला मार्ग मोकळा होतो. जे चांगले ते उगवते आणि वाढते. आपले आपणच आपसूक शिकत जातो. अगदी गोकर्णाच्या वेलीवरच्या फुलाप्रमाणे फुलत जातो." आजीने सखीकडे पाहिले. मांडीवर डोके ठेवून सखी आजीच्या बोलण्यावर विचार करत होती. आज आजीच्या बोलण्यातून ती पुस्तकाबाहेरचे परिसर ज्ञान शिकली होती.



2 comments:

Anonymous said...

प्रेरणादायी गोष्ट 👌🏻👌🏻

जुईली अतितकर said...

धन्यवाद...

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...