Tuesday, 27 January 2026

" काव्यजुई " पुस्तक प्रकाशन

दीपावलीच्या प्रकाशमान पर्वाला सुरुवात झाली तसे " काव्यजुई " हे पुस्तक या दीप पर्वात प्रकाशित होण्याचे वेध लागले. काव्यजुई हा माझा पहिला कविता संग्रह. आठवणीतल्या कविता घेऊन " काव्यजुई " पुस्तक तयार झाले. प्रकाशन आणि कवी - कवयित्रींचे संमेलन एकत्र पनवेल येथे आयोजित केले. आपल्या पहिल्या वहिल्या कवितेच्या संग्रहाचे अनावरण करताना तो आनंद इतरांसोबत वाटून साजरा करण्याचा हा एक प्रयत्न. नवे कोरे पुस्तक हाती आले तसे या दिवसाची उत्सुकता दिवसागणिक वाढत होती. कार्यक्रमाला डोंबिवली, मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथून कवी रसिक आले होते. कवितेशी त्यांची बांधलेली नाळ हे अंतर कमी करून एक ऋणानुबंध जोडून गेली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दीपा ठाणेकर या कोकण मराठी साहित्य परिषद कार्यवाह, कु. स्नेहा वाघ - को. म. सा. प उत्तर कोकण युवा प्रमुख, पुस्तकाचे प्रयोजक श्री. आनंद दातार, श्री. निशिकांत महाकाळ - को.म. सा. प. कळवा शाखा प्रमुख, त्याच सोबत मान्यवर कवी श्री सुभाष कुडके - अध्यक्ष- कोमसाप पनवेल, श्री नागनाथ डोलारे - उपाध्यक्ष - कोमसाप पनवेल, जेष्ठ कवी श्री शिवाजी मोटे सर उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली. आलेल्या कवी - कवयित्रींनी काव्य संमेलन फुलवले. 

आपल्या वहीच्या मागच्या पानावर लिहिलेल्या ओळी एका पुस्तकात पाहिल्यावर त्या प्रत्येक कवितेमागची गोष्ट, तेव्हाच्या भावना, ती तगमग आणि सुख दुःखाचे क्षण सारे डोळ्यासमोरून गेले. या पुस्तकाविषयी सांगताना माझ्या आयुष्याचे एक पान वाचून दाखवते असे वाटले. सर्वांनी या पुस्तकाला भरभरून शुभेच्छा दिल्या. माझ्या शाळेतले शिक्षक प्रीती धोपाटे, विजया शिंदे मॅडम या कार्यक्रमासाठी आवर्जून आल्या. त्यांना ऐकताना माझे शाळेचे दिवस आणि या प्रवासात आपली कुठून कशी सुरुवात झाली होती? याचा धावता आढावा घेतला. दीपा मॅडम ज्यांची या पुस्तकाला प्रस्तावना मिळाली. त्यांच्या कडून शाबासकी म्हणजे माझ्यासाठी माझे साहित्यातले माहेरघर. अशी जागा जिथे आपण मुक्तपणे कधी चालतो, कधी धावतो, कधी पडतो पण पुन्हा धावण्यासाठी आपली ताकद बनून कोणी तरी असते. असे पाठीशी असणारे कुटुंब आणि कुटुंब प्रमुख - दीपा मॅडम. " जुई " हे अल्लड, बागडणारे जर फुलपाखरू तर त्याच्या विविध रंगाची जाणीव करून देणारे माझ्या आयुष्यातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच - दीपा मॅडम. विद्यार्थ्यामधली बलस्थान आणि कमजोरी ओळखून त्यांना घडवणे ही शिक्षकांची दृरदृष्टी मला कायम त्यांच्यात दिसली. त्यातून मी ही शिकत गेले. आज त्यांनी मला लेक म्हणल्यावर माझ्या लिहिण्याला खोलवर अर्थ प्राप्त झाला. पाय जमिनीवर ठेवून आणखी प्रगती करण्याचे बळ मिळाले. निशिकांत सरांच्या येण्याने आणि त्यांनी तिकिटावर लिहून आणलेल्या कवितेत मांडलेल्या फुलांनी कार्यक्रमाला बहार आली. लेखन, नियोजनाचे काही धडे त्यांनी ही माझ्यात रुजवले. त्यामुळे साहित्य विषयात खतपाणी मिळाले. माझी मैत्रीण स्नेहा, ती सुद्धा या सोहळ्यासाठी आली होती. तिची माझी मैत्री युवाशक्तीच्या कट्ट्या मध्ये झाली. हळूहळू तिच्यातील कलाकार, वाचक, वक्ता मला दिसत गेला. समजत गेला. संघर्ष, चिकाटी, कलात्मकता मला भावली. तिचा प्रवास प्रगतीच्या दिशेने उत्तरोत्तर वाढत जावा अशी माझी इच्छा आहे म्हणून च तिचे येणे हे माझ्यासाठी दोन मैत्रिणींची भावनिक भेट होती. या पुस्तकाचे स्वप्न जसे मी पाहिले तसेच ते आनंद दातार यांनी ही पाहिले. त्यांची मदत आणि माझी आवड याची सांगड घालत हे कार्य सिद्धिस गेले. त्यांनी केलेली मदत ही माझ्यासाठी माझी स्वप्नपूर्ती असली तरी ती माझ्यासाठी आयुष्यभराची प्रेरणा आहे. ही साहित्यिक सेवा फक्त आपली स्वतः ची नसून ती सर्वांचीच एक विचारधारा आहे. जी पुढे जाऊन इतरांना प्रेरणा देईल. आणखी एकाची कविता कोळसाच्या खाणीतून हिऱ्यासारखी लखलखत समोर येईल. त्यासाठी आपण कार्यरत असायला हवे हा मूक संदेश त्याच्यात दडला आहे. पुस्तकाची सुबक बांधणी अक्षरदाणी प्रकाशन यांच्या माध्यमातून झाली. प्रज्ञा पळसूले यांनी ते प्रत्यक्षात आणले. जुईच्या फुलानीं सजलेला काव्यजुई संग्रह मान्यवरांनी उघडला तेव्हाचा क्षण म्हणजे " ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास " असा काहीसा होता. प्रथमेशच्या सुलेखानाने रंगमंचाचे सौंदर्य अधिक वाढले. अक्षरांना वळण आले कि त्यांचे सौंदर्य अधिक वाढते आणि आपली साधी कविता ही देखणी होते हे मला कायम त्याच्या कलाविष्कारातून जाणवले. यामुळे माझ्या कवितेला त्याचे अक्षर मिळावे अशी माझी इच्छा होती. ती त्याने लिलया पेलली. या संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रबद्ध सूत्रसंचालनाची जबाबदारी अनुकूलने आपल्या खांद्यावर घेतली आणि बहारदार कवितांच्या माध्यमातून प्रत्येकाची मने जिंकली. नावाप्रमाणे काव्यमय वातावरण सर्वांसाठी अनुकूल केले. त्याच्या सूत्रसंचालनात भावनिक आंदोलने होती. आनंद होता. शब्दांची समय सूचकता, मधेच एखादे विनोदी वळण होते.

कधी मैत्रीण म्हणून, कधी कवयित्री म्हणून तर कधी आपली बहीण मानून त्याने माझ्यासाठी ज्या रचना घेतल्या. त्या ऐकताना आपसूक माझ्या डोळ्यात पाणी आले, ही च ती कवितेची ताकद असावी जी जोडण्याचा धागा होते. आपल्या लहान भावाप्रमाणे त्याचे कौतुक वाटले. कवी संमेलनाची सांगता जयेशच्या गाण्याने झाली. जयेश आणि मी अनेकदा कवितेच्या कट्ट्यासाठी एकत्र असायचो. त्याचा प्रवास ही संघर्षातून यशाकडे असंच म्हणावं लागेल. माझ्या साठीचे सरप्राईज म्हणजे त्याची "चाफा बोलू लागला " ही कविता. चाफ्याने सुंगधी सदाबहार सांगता झाली. चाफा मनाला स्पर्शून गेला. मित्र मैत्रिणीच्या सोबत शेयर केलेली आपली कविता आज ऐकण्यासाठी समोर आलेले रसिक पाहून संतुष्टी मिळाली. या संपूर्ण प्रवासात पडद्यामागची माणसे म्हणजे माझे आई बाबा, माझा भाऊ - वैभव आणि माझे यजमान - विद्याधर यांची साथ, सर्वांच्या आशीर्वादाने प्रकाशनाचा कार्यक्रम सुफळ संपूर्ण साजरा झाला. काव्यजुई पुस्तकावर आपली सही करून देताना मनात समाधानाचे फुलं फुलत होते. त्याचा दरवळ आयुष्यभर माझ्या सोबत असणार आहे. आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून अनेकांना नवी सुरुवात मिळून जाते. त्याचेच फलित म्हणजे " काव्यजुई " आणखी एक काव्यमय आठवणीतले पान.


No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...