Tuesday, 20 January 2026

रानभुली



“ रानभुली “ गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचे नुकतेच वाचनात आलेले हे रानातले पुस्तक. पुस्तकाबद्दल लिहिताना माझ्या डोळ्यासमोर रायगडाची तटस्थ तटबंदी येते. तिथले मातीत रोवलेले बुरुज, बाजारपेठेतली पडलेली भिंत, तिथला सूर्यास्त, गडाला शोभणाऱ्या अजस्त्र कडा आणि भोवताली पसरलेली पोकळ दरी.

हे पुस्तक लिहिणारा गडाचा वारकरी. जो गडाच्या शौर्य कथा टिपण्यासाठी ही वारी करतोय. या वारीत त्याला सोबत होते ती एका रान कन्येची. मनीची. मनीसाठी हा वारकरी म्हणजे आप्पा. या गडाचा गड पुरुष. त्यांच्या छत्र छायेत तिला या गडाला पालथे घालण्याचे अभय मिळते. मनीची सोबत हळूहळू आप्पांना ही

हवी हवीशी वाटू लागते. अशी ही धनगरांची विलक्षण धाडसी पोर. तिची कथा या पुस्तकात वाचायला मिळते.

सोनवळीची पिवळी धम्म फुले, तेरड्याचे ताटवे, दूरवर पसरलेलं हिरवं कच्चं गवत, सोनवळीच्या फुलांची कलाबुत त्यावर तेरड्याची आरास. पांढऱ्या शुभ्र ढगांनी गच्च भरलेले आकाश आणि खाली फुलांच्या रंगांची उधळण. असे सुरेख वर्णन यात वाचायला मिळते.

गडावर मनीचे अपार प्रेम, भक्ती आणि श्रद्धा. गडासारखा प्रिय हिला दुसरा कोणी नाही. दरदरत्या पावसात, दाटलेल्या थंडीत, भिजत , कुडकुडत गड हिंडत राहणारी, सूर्यास्ताच्या वेळी बाजारपेठेच्या पडक्या भिंतीवर बसून सूर्यास्त न्याहाळणारी मनी म्हणते “ नारायेन बघ कसा ग्वाड दिसतो ! “

मनी उनाड, अल्लड, रानातल्या काट्या कुट्याना, कडा कोपऱ्याना सहज स्पर्श करून येणारी गड कन्या मला वाटते. साधी सोपी असली तरी धाडसी, करारी ही भासते. “ खानदानी किल्लेदाराची लेक “ असे ही आप्पानी मनीला म्हणले आहे. इतकं आत्मीयतेने निभावलेले हे नाते लग्न बंधनात अडकल्यानंतर अचानक दुरावते.

पाचाड हुन मुंबईस आल्यावर झोपडीत सुरू झालेला तिचा संसार तिला निरस, रंगहीन वाटू लागतो. त्यात जन्माच्या वेळीच अकस्मात गेलेले पहिले मुलं. तिचे पाचाडास परतणे. आपल्या न जगलेल्या बाळाच्या समाधी ठिकाणी जाऊन अंतर्मनातून कोलमडून जाणे. मनीचे नवऱ्याशी, घरच्यांशी धरलेले अखंड मौनव्रत आणि गडावरच्या आठवणी सारेच आप्पांसाठी दुसरे टोक.

शेवटी मुंबईतला तुटपुंजा संसार नवऱ्या सोबत पुन्हा गडाच्या पायाशी आणून ठेवणारी मनी आप्पांना या कथेच्या शेवटी भेटते. गमावलेले सारे परत मिळवण्यासाठी धडपडणारी मनी त्यांना पुन्हा भेटते. गडावर असलेल्या निस्सीम प्रेमाचे आणि फार पूर्वीच जमलेल्या दृढ नात्याचे हे बळ असते.

गडाकडे परतताना आप्पांना ती गजरे घ्यायला सांगते. कुणासाठी ? तिची गडावर वाट पाहणारी शिर्काई, मानाई, सातमाय, आसरा त्या शतकापासून तिथे गडावर ठाण मांडून बसलेल्या देव्या असतात. त्यांची गाठभेट घेते. किल्लेदाराची लेक, गडाची लेक खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा गडावर परतते. इथेच कथेचा शेवट होतो.


No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...