Tuesday, 20 January 2026

सफरचंद


शाळेत आपण अजाणतेपणी बऱ्याच गोष्टी अनुकरणातून, प्रयोगातून शिकतो. निरीक्षणातून शिकतो. या कथेत ही तसेच काहीसे होते. मूळ इंग्रजीत वाचण्यात आलेली ही कथा मला माझ्या संग्रही ठेवण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. म्हणून लिहायला लागले.

पाचवीचा वर्ग मुलांनी भरला होता. मुलांचा कलकलाट, भांडणे, आरडाओरडा, गोंधळ सुरू होता. व्यक्तिमत्व विकासाचा पुढचा तास होता. तासाला कोणी शिक्षक वर्गावर नव्हते. काही वेळाने त्या वर्गात नव्याने रुजू झालेल्या मीना बाई आल्या. त्या आल्या तशा दोन क्षण वर्गाबाहेरच थांबल्या. गोंधळ काही शांत होत नव्हता. त्यांना मुलांना नवीन काही शिकवायचे होते. पण अजून मुलांची तितकीशी ओळख झाली नव्हती. पहिल्यांदाच त्या वर्गात त्यांचा तास होता. मुलांना ही त्यांची ओळख नव्हती. त्यांनी हातात दोन सफरचंद आणले होते. त्या टेबलजवळ आल्या. त्यातला एक सफरचंद त्यांनी जोरजोरात टेबलवर आपटायला सुरुवात केली. असे एक दोनदा केले. समोर बसलेल्या मुलांनी ते पाहिले. त्यांना ते विचित्र वर्तन वाटले. बघता बघता सगळे शांत झाले. मुलांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. सगळे शांत झाल्यावर त्यांनी ते दोन्ही सफरचंद टेबलावर ठेवले. मुलांना त्यातला फरक ओळखायला सांगितला. कुठला चांगला आणि कुठला खराब ते ओळखायचे होते. नवीनच वर्गात आलेल्या बाई असं का विचारत आहेत? याचा मुलांना अंदाज येईना. वर्ग आता पूर्ण शांत झाला होता. सगळ्यांच्या नजरा त्या टेबलावर ठेवलेल्या दोन्ही सफरचंदावर होत्या. साहजिकच मुलांना विचारल्यावर सुरुवातीला अगदी सारखे दिसणारे सफरचंद आता वेगळे दिसत होते. त्यातला एक आपटलेला सफरचंद बाईंनी हातात घेतला. सर्वांनी तो खराब झालेला असे अनुमान काढले. याउलट दुसरा गुलाबी दिसणारा, आतून पांढरा शुभ्र गोड असा अंदाज बांधला. वर्गातील सर्वच मुलांनी तसेच उत्तर दिले. त्या नंतर मीना बाईंनी ते दोन्ही सफरचंद कापले. मुलांना दाखवले. पहिला सफरचंद हळूहळू बाजूने काळा पडलेला, खराब होऊ लागला होता. आकार उकार बदलला होता. एका मुलीने उठून त्यांना विचारले “ आपण त्याला जे बोललो ते त्याने ऐकले का ? म्हणून तो आतून खराब झाला का...? “

बाईंनी मग तिला त्याचे उत्तर दिले. सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते “ आपण त्याला आपटले, त्याला चुकीच्या पद्धतीने हाताळले, त्याला सांभाळले नाही, त्याच्या दिसण्यावरून, चवीवरून सगळ्यांनी नाकारले. एक नाही तर तीस जणांनी त्याला नाकारले म्हणून ते आपोआपच आतून खराब होत गेले. या उलट जे दुसरे सफरचंद त्याबद्दल आपण किती छान म्हणले. त्याच्या चवीला, दिसण्याला, असण्याला आपण स्वीकारले. त्याला व्यवस्थित हाताळले म्हणून ते जसे बाहेरून गुलाबी सुंदर दिसते तसेच ते आतून ही गोड राहिले.

मी येताना दोन्ही चांगलीच फळे आणलेली होती, पण कुणाच्या तरी स्वीकारण्याने, हाताळण्याने एक फळ गोड आणि ताजे राहिले तर दुसरे व्यवस्थित सांभाळले नाही, नाकारले म्हणून आतून खराब झाले. मैत्री करताना आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, चुकीच्या वर्तनाने ती व्यक्ती दुखावली जाते आणि असे मैत्री चे नाते फार काळ टिकत नाही... त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा... Be kind to universe …Be kind to yourself.

या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वर्गात थोड्याच वेळात वर्गशिक्षिका आल्या. त्यांनी सर्व मुलांना त्यांच्या नवीन बाईंची ओळख करून दिली. सर्व मुलांनी आपली नाव मीना बाईंना सांगितली. सफरचंदाचा हा खेळ आणि त्यामागची गोष्ट सर्वानाच आवडली.

गोष्ट संपली. त्यातून किती सहज मानवी भावना मांडल्या गेल्या आहेत. असंवेदनशील मने ही कधी तरी संवेदनशील मनाला ठेच लागते तेव्हा निर्माण होतात.

आपल्यातली इतरांच्या प्रति असलेली संवेदनशीलता, करूणा किती मोठा बदल करते पहा ! एखाद्या गोष्टीला नाशिवंत करू शकते किंवा कुणाला नवजीवन देऊ शकते.

आपले मन आणि जीभ यात अदृश्य असं जोडलेलं नातं आहे. त्यात प्रचंड ताकद आहे. कधी ते मोरपिस होऊन दगडासारख्या मनाला ही प्रेमाने मृदू स्पर्श करू शकते तर कधी संवेदनशील मनाला दगडासारखे कठीण करू शकते. तेव्हा इतरांना आणि स्वतःला मायेची उब देत राहा.


No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...