एकट्याचा प्रवास जेव्हा सोबतीने होतो तेव्हा नक्की कुठे बदल होतो ? या प्रवासात आपण कुठे येऊन पोहोचतो ? आणि आपली परीक्षा कुठे होते ? हे सांगणारी एक सुंदर कथा माझ्या ऐकण्यात आली.
ही कथा आहे दोन मेंढ्यांची, हिमालयाच्या डोंगर रांगात मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा कळप चरायला घेऊन जात असत. वेगवेगळ्या कळपातली जनावरे कधी दुसऱ्याच कळपात नकळत येत, कधी आपला कळप सोडून मैल दर मैल दूर निघून जात पण मेंढपाळ आपल्या मेंढीला बरोबर हुडकून काढत.
एकदा अशाच वेगवेगळ्या कळपातल्या दोन मेंढ्या भलत्याच ठिकाणी एकत्र येऊन पोहोचल्या. त्यांचे कळप आणि मेंढपाळ बरेच दूर राहिले. गवताळ भागात चरत चरत त्या एका अरुंद पुलावर येऊन पोहोचल्या. तो पूल एवढा निमूळता होता की एका वेळी एकच मेंढी त्या पुलावरून जाऊ शकत होती. दोन्ही मेंढ्या वाट मिळेल तसे पुढे पुढे येत राहिल्या. पुलाच्या मध्यभागी पोहोचल्यावर एकमेकांच्या समोर आल्या. त्यांना काहीसा ओळखीचा आवाज कानावर आला. दोन्ही मेंढ्या खुश झाल्या. आपल्या मेंढ्यांचा कळप जवळपास आहे हे त्यांना त्या आवाजावरून कळले. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांना अडचण अशी आली की दोन्ही मेंढ्यांचे कळप विरुद्ध दिशेला होते. एकाच वेळी त्यांना त्या अरुंद पुलावरून विरुद्ध दिशेला जाणे अशक्य होते. पुलाच्या खाली खोल दरी होती. त्यामुळे मृत्यूचे ही संकट होतेच. आपल्याला या पुलावर मधेच थांबता येणार नाही आणि आपल्याला पुढे जायचे आहे. आपल्या कळपात जायचे, काय करावे ? या विचारात असताना त्यातल्या एका मेंढीने दुसऱ्या मेंढीला आपल्या पाठीवरून पलीकडे जाण्यास सांगितले. त्या साठी त्या मेंढीला खाली मान घालून बसावे लागणार होते. इथून बाहेर पडण्यासाठी तो एकच मार्ग त्यांना दिसत होता. ती मेंढी लगेच खाली बसली, दुसऱ्या मेंढीने त्या मेंढीच्या वरून उडी मारली आणि ती पलीकडे पोहोचली. पलीकडे गेल्यावर बसलेल्या मेंढीचे आभार मानले. पलीकडची मेंढी तिच्या वाटेने कळपात गेल्यावर बसलेल्या मेंढीला शोधत तिचा मेंढपाळ आला आणि ती मेंढी ही आपल्या कळपात सुखरूप पोहोचली.
दोन मेंढ्या च्या जागी आपण आपल्याला ठेवून विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की अशा अरुंद पुलावरून आपण ही कितीतरी वेळा जातो, जिथे कोणा एकाला पुढे जाण्याची गरज असते, एकाला थोडे थांबण्याची गरज असते. कधी कधी तो न दिसणारा पूल आपल्या आवडत्या नावडत्या गोष्टीना जोडणारा असतो. असा नाजूक पूल पार करताना दरी डोंगरांची नसते तर आपल्या सोबत असणाऱ्या माणसाच्या भावनांची असते. त्या वेळी पुढच्या प्रवासासाठी कधी झुकावे लागते, थोडे थांबावे ही लागते आणि त्यामुळे कधी कधी दुसऱ्याचा मार्ग मोकळा होतो तसेच आपल्याला ही पुढे जाण्यासाठी आणि हा प्रवास सुरु ठेवण्यासाठी मदत होते. कधी कधी आपल्या जोडीदारासोबतच्या प्रवासात दोन आवडीच्या गोष्टी विरुद्ध टोकाच्या असू शकतात तेव्हा हा प्रवास निरंतर सुरू ठेवण्यासाठी एकमेकांना वाट देत आपण ते विरुद्ध टोक जवळ आणण्याचा प्रयत्न करू शकतो.
No comments:
Post a Comment