Tuesday, 20 January 2026

कमल मावशी


काही दिवसांपूर्वी शलाका तिच्या शाळेत गेली होती. बऱ्याच दिवसांनी शाळेतल्या वर्गांना, तिथल्या विद्यार्थ्यांना पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

काही शिक्षकांनी आल्या आल्याच तिला दुरूनच ओळखले आणि तिची खुशाली विचारली. तिचा चेहरा थोडा फार बदललेला होता, पण तिची बोलण्यातली तेव्हाची आत्मीयता अजूनही तशीच होती. तासाला जाताना त्यांनी शलाकाचा निरोप घेतला. शलाका आजूबाजूचे वर्ग, प्रयोगशाळा बघत स्टाफ रूमच्या दिशेने निघाली.
वाटेत तिला कमल मावशी दिसल्या. दुरून हाक मारल्यावर त्यांनी लगेच ओळखले. तिला जवळ बोलावले. त्या पूर्वी जशा असायच्या अगदी तशाच आता ही होत्या. वय वाढलेले पण मनाने उत्साही आणि तरुण. त्या शाळेत बऱ्याच वर्षांपासून स्वच्छतेचे काम करत. त्या वर्गात जेव्हा जात असत तेव्हा वर्ग स्वच्छ करता करता मुलांशी सुद्धा बोलत असतं. त्यामुळे मुलांची आणि त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. शाळेतला प्रत्येक कोपरा त्या घराप्रमाणे स्वच्छ करत. त्याच्या नेटक्या कामामुळे त्यांना कधीच दुय्यम वागणूक मिळाली नाही. कमल मावशी कायम लक्षात राहतील असे त्यांचे व्यक्तीमत्व होते.
त्यांच्याशी गप्पा मारता मारता शेजारच्या वर्गात भांडणाचा आवाज येऊ लागला. कमल मावशीनी शलाकाला आत जाऊन पाहायला सांगितले. डब्यातल्या खाऊवरून दोघा मुलांमध्ये भांडणे सुरू होती. सुजय आणि विनय दोघे मित्र होते पण एकमेकांशी मारामारी करण्यापर्यन्त प्रकरण पुढे गेले होते. शलाका आत गेल्यावर वर्ग शांत झाला आणि जोरात डबा पडण्याचा आवाज झाला. सुजयचा संपूर्ण डबा खाली सांडला. बेंच आणि जमिनीवर सगळे सांडलेले बघून सुजय रडवेला झाला. दोघे मान खाली घालुन उभे होते. जे झाले ते बरोबर नव्हते याची जाणीव दोघांना झाली. शलाकाने वर्गाबाहेर येऊन मावशीना हाक मारली. सांडलेले स्वच्छ करण्यासाठी त्यांना त्या वर्गात बोलावले. शलाका पुन्हा वर्गात येण्या आधीच विनय आणि सुजयने सांडलेले सगळे उचलून आपल्या रुमालाने बेंच स्वच्छ केला.
ती जागा आधी सारखी स्वच्छ झालेली पाहून शलाका ने सुजय आणि विनयचे कौतुक केले. शलकाने त्यांना विचारले, “ मावशी स्वच्छ करण्यासाठी येतच होत्या तर तुम्हाला स्वच्छ करावे असे का वाटले ?? “ त्यावर त्यातल्या विनयने उत्तर दिले, जे फार वेगळं होतं...
तो म्हणाला “ आम्ही बेंच साफ करत नव्हतो , आमची चूक झाली म्हणून मन साफ करत होतो, म्हणजे मावशीच म्हणलेल्या एकदा ते मला आठवलं “
“ काय म्हणलेल्या “ शलाकाने विचारलं
“ मी त्यांना विचारलं होतं , रोज ही स्वच्छता करताना, आम्ही केलेला कचरा गोळा करताना तुम्हाला वाईट वाटत नाही का ? तुम्ही थकत नाही का ?
त्यावर त्या म्हणलेल्या की, “ जेव्हा मी हे काम करते तेव्हा असं समजते की या कचऱ्यासोबत मी माझ्या मनातले वाईट विचार आणि चुकीच्या गोष्टी ही उचलून बाहेर टाकते. तुमचा वर्ग स्वच्छ करता करता मनातला कडवट पणा, द्वेष, निराशा, लोभ आणि ईर्षा सगळे मनातून काढून टाकते. आपल्याकडून झालेल्या चुकांचे प्रायश्चित म्हणजे माझं काम. कालच्या चुका दुरुस्त करण्याची नवी संधी म्हणजे माझं काम. कामातुन कचरा काढता काढता मी माझ्या मनातले जळमटे पण काढत असते विनय. “
“ आज आमच्याकडून पण चूक झाली म्हणून आम्ही हे केले, आम्ही जमिनीला साफ करता करता मनाला पण साफ केले मॅडम, “
हे उत्तर ऐकून शलाकाच्या डोळ्यात पाणी आले. तोपर्यंत मावशी तिकडे आल्या होत्या. त्यांनी ही सगळे ऐकले होते. त्यांच्या ही डोळ्यात पाणी आले. पण ते समाधानाचे अश्रू होते. त्या तशाच वर्गा बाहेर आल्या. त्यांच्या मागोमाग शलाका पण बाहेर आली. ती त्यांना म्हणली,” मावशी तुम्ही फक्त शाळा स्वच्छ करत नाही आहात, इथल्या मुलांची मने पण स्वच्छ करत आहात. “ तेवढ्यात मधल्या सुट्टीची बेल झाली आणि सगळी मुलं बाहेर आली. दोघी स्टाफरूमच्या दिशेने निघाल्या.

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...