मोठे होताना कौटुंबिक वर्तुळ ओलांडल्यावर अनेक प्रसंगी आपणच आपले सोबती होतो. आपल्याच मनाची समजूत घालणारे समुपदेशक होतो.
लहानपणची हट्टाची ढाल आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना पुरतेच असे नाही. तेव्हा अनुभवाची ढाल आपल्याकडे असते. खूप कसोशीने प्रयत्न करून ही हवे ते मिळत नसेल तर मनाची शक्ती कमी होणे स्वाभाविक असते. या अंधाराला दूर करणारे काही तरी वाचण्यात, ऐकण्यात आले कि ही मरगळ तात्काळ दूर होते. माझ्यासाठी ही मरगळ दूर करणारी अशी एक गोष्ट असायची... एखादी कविता, एक कथा किंवा आठवणीतल्या काही गोष्टी.
लहानपणी तुम्ही राजा आणि कोळ्याची गोष्ट ऐकली असेल आज मनाच्या शक्तीवर लिहिताना ती गोष्ट मला आठवते, ज्यात एक राजा आहे आणि तो युद्धात शत्रूशी लढताना पराभूत झाला आहे. पराभूत झालेला तो राजा स्वतःच्या जीवाला वाचवण्यासाठी एका गुहेचा आधार घेतो. तिकडे एक लहानसा कोळी जाळे विणताना गुहेच्या कोपऱ्यात त्याला दिसतो. जाळे विणत तो वर जातो आणि खाली पडतो. असे सहा सात वेळा होते. त्याचे जाळे जोवर मजबूत होत नाही तो पुन्हा पुन्हा पडत राहतो. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश येते. तो वरच्या दगडावर पोहोचतो. राजा त्या कोळ्याचे प्रयत्न बघून खजील होतो आणि स्वतःला पुन्हा युध्दा साठी तयार करतो. शत्रूवर विजय मिळवतो. त्याचे राज्य पुन्हा त्याला मिळते. आपले सर्व मातब्बर योध्ये आणि शस्त्रे गमावल्यावर पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त एक अनुभव त्याच्या कामास येतो. राजाला तो कोळी तेव्हा दिसलाच नसता तर... चित्र काही तरी वेगळे असते.
आपले आयुष्य हे नदीच्या पात्राप्रमाणे वाहत असते. ज्या प्रमाणे नदी तिच्या मार्गात प्रत्येक ठिकाणी थांबत थांबत पुढे जाते, शेवटी समुद्राला जाऊन मिळते तसेच आपली आजची वेळ, परिस्थिती, जागा ही सुद्धा नदी प्रमाणे स्थिर नसून प्रवाही आहे. आपण आज ज्या काठावर आहोत तिथे उद्या नसू. जिथून जसे नदीला पहावे तसे विराट किंवा संथ तिचे दर्शन आपल्याला होत असते. आज आपण तिथे असलो तरी नदीतल्या प्रत्येक थेंबावर आपण हक्क गाजवू शकत नाही. तेव्हा आपल्या ओंजळीत जेवढे नदीचे वास्तव्य असेल तेवढीच ती ओंजळीत येते. तिच्या सारखे वाहताना मनातल्या व्यतिगत चिंता, महत्त्वाकांक्षा त्याच काठावर सोडून पुढे जायला ती शिकवते. कारण तेव्हा ही आपल्या वाटयाला आलेले ते क्षण ही कोणाची तरी स्वप्ने असतात. कुणाची तरी स्वप्ने आपण तेव्हा जगत असतो. अशा वेळी खोल जाणाऱ्या सूर्याला बघत आपण स्वतः ला भाग्यवान म्हणले तर जगण्याची गम्मत आणि आयुष्याची किंमत दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मनातील विचार सहज वाचनात यावे, एखाद्या कवीने ते आधीच ओळखावे अशा या कवितेच्या ओळी माझ्या समोर आल्या...
“ निसटून चालले काही हातास लागण्या आधी
तरी मना नको निष्कारण लागू चिंतेच्या नादी
आयुष्य वाहते म्हणूनी बैचेन उगा का व्हावे
ओंजळीत येईल तितके आपले धरून चालावे “
“ गुरू ठाकूर “ यांनी लिहिलेल्या ओळी या गोष्टीला पूर्ण करतात. शेवटी आपल्या मनाला समजवणारे एक जवळचे मित्र “ आपणच “ हे कायम लक्षात ठेवावे, “ कोणी तरी पाहिलेले सुंदर स्वप्न, आपल्याला ते जगण्याची मिळालेली संधी म्हणजे हे आयुष्य “ हे कायम लक्षात असावे.
No comments:
Post a Comment