Thursday, 19 February 2026

लोक कल्याणकारी समाजसुधारक : छत्रपती राजर्षी शाहू महाराज

        छत्रपती – राजर्षी शाहू महाराज , कोल्हापूर संस्थानाचे लोक कल्याणकारी समाजसुधारक. त्यांच्या कर्मभूमीत म्हणजे कोल्हापुरात मी काही दिवस वास्तव्याला होते. त्यांच्या विषयी आणखी जाणून घेण्यासाठी नामी संधी होती. जेव्हा मी तिथला भोवताल पाहिला, तेव्हा तिथली लोकांची मातीशी जोडली गेलेली नाळ प्रकर्षाने जाणवली आणि तिथल्या मातीत भिनलेला झुंझारपणा प्रत्येक ठिकाणी दिसला. आज यावर लिहीताना ती ऊर्जा मला आणि माझ्या लेखणीला ही मिळाली. एक संपूर्ण दिवसाचे नियोजन होते. त्यात एका दैदीप्यमान व्यक्तिमत्वाचा अभ्यास सुरु होता.
राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी सांगायचे तर त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अस्पृश्यता निवारण, बहुजन शिक्षण, समान न्याय हक्क, सामाजिक समानता, आंतरजातीय विवाह, शेती आणि विकासकामे अशी असंख्य समाजपयोगी कामे केली. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना “ राजर्षी “ पदवी बहाल केली. त्यांचा जन्मदिवस २६ जून हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्याविषयी अधिक माहिती मला या पुढच्या प्रवासात मिळाली.
कोल्हापूरचे एक प्रसिद्ध ठिकाण... ऐतिहासिक दस्तऐवज जिथे संग्रही ठेवले आहेत असे एक भव्य संग्रहालय असलेले न्यू पॅलेस पाहण्याचा योग याच दरम्यान आला. तिथे पोहोचल्यावर भव्य प्रवेशद्वारातून आत जाताना मी कधी त्या काळात गेले कळले नाही. तिथे पाहिलेल्या प्रत्येक वास्तूवरचे नक्षीदार कोरीव काम असामान्य होते. सौंदर्य आणि सुबकता याचा सुरेख संगम इथे पाहायला मिळाला. त्यांनी वापरलेल्या लहानात लहान वस्तूपासून ते त्याच्या भव्य सागवानी बैठकीपर्यंत सगळे ऐतिहासिक वारसा जपत होते. एका हुबेहूब खोलीची रचना तिथे केली होती. जागच्या जागी सर्व मांडलेले होते. नक्षीदार आणि उंच असा आरसा तिथे ठेवलेला होता. त्या भव्य आरशामध्ये राजेशाही पेहरावात आपले तेजस्वी व्यक्तिमत्व न्याहाळणारा छत्रपती आजही तिथे असल्याचा भास होत होतो. नंतरच्या दालनात युद्धासाठी लागणाऱ्या सर्व शस्त्राची मांडणी केलेली होती. त्या काळच्या लहान मोठ्या बंदुका, वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी, ढाली, खंजीर, दांडपट्टा, वाघनखे, तोफा, दारुगोळा, लाठीकाठी आणि असे बरेच काही त्यांच्या लढवय्या व्यक्तिमत्वाचे दाखले देत होते. राज्याची सुरक्षितता आणि श्रीमंती या दालनात कळली. त्या काळी प्राण्यांची शिकार करणे सुद्धा योद्धाचे लक्षण मानले जात. त्यामुळे शेजारी असलेल्या दालनात टॅक्सीडर्मी पद्धतीने जतन केलेले प्राण्यांचे अवशेष मांडलेले होते. त्यात रानगेंडे, रान गवा, डुक्कर, जंगली मांजर, वाघ, हरणे असे प्राणी पहायला मिळाले. शाहू महाराजांनी खेळांना आणि कलाकारांना मानाचे स्थान दिले. त्या वेळी खेळले जाणारे खेळ जसे सारीपाट, कवड्या, लाठीकाठी, बुद्धिबळ, भालाफेक, दांडपट्टा, गोफण तिथे पाहायला मिळाले. पुढच्या दालनात छत्रपती शाहूंनी काढून घेतलेले तैल चित्र, पोट्रेट होते. तेव्हाचे चित्रातले रंग आज ही ठळक आणि उठावदार होते. त्यावेळची कलाकारांची त्यातील सूक्ष्म दृष्टी असामान्य होती आणि आश्चर्य चकित करत होती. पुढच्या भव्य महालात सागवानी फर्निचर आणि काचेच्या झुंबराखाली आखीव-रेखीव मांडलेले सभा मंडप होते. समोर नक्षीदार सिंहासन होते. ते शाहू महाराजांच्या तिथल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते.
पूर्ण संग्रहालय पाहून झाले. या प्रवासात छत्रपती शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व समजत गेले. त्यांची राजनैतिक आणि समाजाभीमुख कारकीर्द कळली आणि क्रांतीची ज्योत आणि सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन आम्ही माघारी आलो.

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...