काल एक इंग्रजी कथा वाचण्यात आली. गोष्ट वाचून मला पूर्वीच्या अकबर – बिरबल, राजा राणीच्या गोष्टीची आठवण झाली. मग या इंग्रजी कथेला मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केला.
सूर्यसेन नावाचा राजा सूर्यनगरीत राज्य करत होता. राज्यात पावसाचे दिवस होते. एकदा राजाला मासे पकडायला जायचे मनात आले. मासेमारीला जाण्याआधी हवामानाचा अंदाज त्यांनी त्याच्या हवामान शास्त्रज्ञाला विचारला.
दरबारातील त्या शास्त्रज्ञाने पुढच्या काही तासात पाऊस पडणार नाही याची खात्री राजाला दिली. राजा आणि राणी मासे पकडायला बाहेर पडले. जाताना रस्त्यात त्यांना गाढवावरून जाणारा एक माणूस भेटला. ज्याच्या हातात मासेमारीचा काटा होता. त्याला थांबवून राजाने त्या माणसाला पकडलेल्या माशाबद्दल विचारले. गाढवावर बसलेला तो माणूस राजाला म्हणला “ राजे, आता मासे पकडायला तुम्ही जाऊ नका. तुम्ही तुमच्या दरबारी परत जायला हवे, आता वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. “
त्यावर राजा म्हणला “ मी माझ्या दरबारात हवामानाचा अंदाज घेण्यासाठी खास शास्त्रज्ञ नेमला आहे. त्याला चांगला अनुभव आहे. त्याचा त्यात अभ्यास आहे. त्याने मला आजच्या हवामानाचा अचूक अंदाज दिला आहे. माझा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. “ बोलणे पूर्ण करून राजा पुढे त्याच्या रस्त्याने जाऊ लागला. थोड्याच वेळात जोरदार पाऊस कोसळू लागला आणि राजा, राणी पूर्णपणे भिजले.
परत आल्यावर संतप्त राजाने हवामानाचा चुकीचा अंदाज सांगणाऱ्या त्या शास्त्रज्ञाला शिक्षा फर्मावली. त्याला त्या पदावरून काढून टाकले. राजाने त्याच्या शिपायांना रस्त्यात भेटलेल्या त्या माणसाला दरबारात शोधून आणायला सांगितले. त्याला राज दरबारी “ प्रशिक्षित हवामान शास्त्रज्ञ “ हे पद दिले.
राज दरबारी हे सगळे कौतुक पाहून त्या माणसाने राजाला सांगितले. “ मला हवामानाची विशेष काही माहिती नाही, राजे....
मी अंदाज लावतो तो माझ्या गाढवावरून. माझ्या गाढवाचे कान खाली झुकलेले असतात तेव्हा पावसाची शक्यता असते आणि तोच अंदाज मी तुम्हाला त्या दिवशी सांगितला.” हे ऐकल्यावर राजाने त्याच क्षणी त्याला त्या पदावरून काढून त्याच्या गाढवाला त्या पदावर ठेवण्याचा निर्णय घेतला. राजाच्या निर्णयाने दरबारातील सर्व लोक आश्चर्य चकित झाले.
गोष्ट इथेच संपली, पण खरी गोष्ट इथे सुरू होते. जी सांगते बरेच काही. त्या पदावरचा आधीचा “ अनुभवी माणूस “ किंवा नंतरचा “ गाढव. आधीचा चुकलेला अंदाज आणि नंतर त्या गाढवावरच्या माणसाचा अचूक अंदाज त्यानंतर राजाची हटके सुनावणी. माणसावर ठेवा किंवा गाढवावर... विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे आपल्या हातात असते. जितके सोपे तितकेच कठीण असते. बाकी अवेळी पाऊस तेव्हा ही चर्चेचा विषय होता आज ही आहे.
2 comments:
आहाहा..खूप छान लिहिले!
Thanks😊
Post a Comment