Monday, 26 January 2026

कालाय तस्मै नमः



वेळ हि कोणासाठी अगदी लहान सुईसारखी तर अगदी लांब हनुमानाच्या शेपटी सारखी आहे. कोणासाठी त्यांचे कामाचे नियोजन म्हणजे वेळ तर कोणासाठी आयुष्याचे रिकामपण म्हणजे वेळ. कोणी मिनिटावर ती कमावतो तर कोणी तासावर. कोणी तिच्या मागे हि धावणारा, कोणी तिच्या पुढे हि धावणारा, कोणी भूतकाळात थांबलेला तर कोणी भविष्यात रमणारा. प्रत्येकासाठी वेळ हि वेगळे रूप घेऊन येते. वेगळे अनुभव घेऊन येते, तरीही वेळ कोणासाठी थांबत नाही. मग हि वेळ कधी बंद गुहा वाटते जी भरपूर रहस्यांनी भरलेली असते. कधी ती वादळीवाऱ्यासारखी वाटते, अमर्याद वेगात येणारी आणि सर्वदूर जाणारी. क्षणात विलुप्त होणारी. आपत्तीसारखी परीक्षा घेणारी आणि शांत झाल्यावर सारे मळभ दूर करणारी.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वेळेचे महत्व सांगताना म्हणतात, वेळ हि नदी सारखी आहे, नदीचा प्रवाह सतत बदलल्याने तुम्ही त्याच पाण्याला दुसऱ्यांदा स्पर्श करू शकत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही तेव्हा आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. हे सांगताना ते पाण्याचेच उदाहरण देतात ज्याप्रमाणे पूर आल्यावर मासे कीटकांना खातात त्याउलट दुष्काळ पडल्यावर कीटक मासे खातात. वेळ हि प्रत्येकासाठी संधी घेऊन येते. आपल्याला त्या संधीची वाट पाहता आली कि बदल दिसतो. अपयशाचे रूपांतर यशस्वी जीवनात होते. निराशेच्या जागी आशावादी विचार येतात. दुर्लक्षित गोष्टी प्रकाशात येतात. आणि हि जादू फक्त आपण दिलेल्या वेळेत असते. वेळ मला हि वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहासारखी वाटते. ज्याप्रमाणे नदी सतत प्रवाही असल्याने नदीला नवं निर्मितीचे वरदान आहे. तसेच वेळ सुद्धा पुढे पुढे सरत जाते, नवनिर्मितीचे वरदान घेऊन येते. नदीचा प्रवाह लहान असो किंवा मोठा तो मधेच थांबला तर त्याचे डबके होते तसेच वेळेचे आहे. कोणी वेळेसाठी थांबले तर हळूहळू निष्क्रियतेचे डबके झाल्याशिवाय राहत नाही. असा हा वेळेचा महिमा आपल्याला अनेक उदाहरणांवरून समजत जातो. आपले आजूबाजूचे जग, आपली दैनंदिन कामे, असंख्य पुस्तके या वेळेचे गणित आपल्या समोर मांडत असतात. आपण रोज ते आव्हान स्वीकारत असतो. त्यातून शिकत असतो.

कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी वेळ लागत नाही, वेळ लागतो तो त्याचे निष्कर्ष समोर येण्यासाठी. त्यातूनच आपण संयम शिकत जातो. त्याचे महत्व निसर्ग सुद्धा पावलो पावली आपल्याला सांगत असतो. वेळेचे महत्व सांगण्यासाठी ऋतुचक्राचे जाते फिरते. दिवसाची रात्र होते. रात्रीचा दिवस होतो. रोपट्याचे झाड होते. कळीचे फुल होते. जेव्हा मातीत बी पेरली जाते तेव्हापासून ते त्याचे झाड होण्यापर्यंत, त्याला फळे , फुले येण्यापर्यंतचा प्रवास हि वेळ सांगत असते.

वेळेविषयी आणखी उलगडून सांगणारे अनेक संत महात्मे मला आठवतात, उदाहरणच द्यायचे झाले तर लहानपणासून ऐकण्यात आलेले श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक या वेळेविषयी किती सुंदर अर्थबोध सांगतात ,

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।

अकस्मात होणार होऊनि जाते॥

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।

मतीमंद तें खेद मानी वियोगें॥

आपण आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला थोपवून ठेवू शकत नाही. कधी सुखाचे क्षण तर कधी अडचणींचे प्रसंग येतच असतात. अशा वेळी चिंताग्रस्त झालेल्या मनाला दिलासा देणारे सत्य म्हणजे जे विधिलिखित ते होणारच आहे, त्यामुळे त्याचा स्वीकार करून जगणे, मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड, खेद, आकस न बाळगता त्या वेळेला शरण जाणे त्यातून तरून जाणे हेच जीवनाचे सार आध्यात्मापासून ते वैज्ञानिक विचारधारेतून सांगितले आहे.

अँपल चे सह संस्थापक स्टीव्ह जॉब वेळेचे गणित सोडवताना एके ठिकाणी म्हणतात, तुम्हाला मिळालेली वेळ हि मर्यादित आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणासारखे जगण्यात वाया घालवू नका. इतरांच्या विचार सरणीचा परिणाम तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या ध्येयावर होऊ देऊ नका. तुमच्या क्षमता इतरांच्या मतावर ठरवू नका. आणि सगळ्यात महत्वाचे तुमच्या मनाचा आवाज ऐका, कारण त्याला बरोबर माहिती असते, तुम्हाला नक्की काय हवे. यावर जेव्हा आपण विचार करू लागतो त्यानंतर हा आत्मशोध आपल्याला तिथवर नेऊन पोहोचवतो जिथे हि वेळ आपल्या सोबत असते. आपली ओळख होऊन, आपली जवळची मैत्रीण होऊन, एका आनंदी जगात ती स्थिर होते.

जसा काळ जातो, तसे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे चित्र बदलत जाते. कुणाचे जुने सल भरून निघतात, कुणी नवी नाती जोडतात. कोणासाठी तोच तो प्रवास असतो, कुणासाठी आयुष्याची नव्याने सुरुवात असते. कोणी अडचणीतून पुढे येताना दिसतो, कोणी नवा शोध लावतो. या प्रवासात कोणाचा नव्याने शोध लागतो. चित्र बदलत जातात. माणसे बदलत जातात, कारण वेळ बदललेली असते. अल्बर्ट आईनस्टाईन वेळेचे कारण सांगताना म्हणतात, " सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला होऊ शकत नाही म्हणूनच वेळ हि महत्वाची. " या काळाच्या, बदलत्या वेळेच्या शक्तीला वंदन करून येणारा प्रत्येक क्षण भरभरून जगूया.



No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...