Tuesday, 20 January 2026

ठसे

एका गावात एक प्राचीन शंकराचे मंदिर होते. त्या मंदिराची सर्व देखभाल आणि पूजाअर्चा पुजारी सदानंद कर्वे करत. पिढीजात वारसाने आलेली ही सेवा ते मनोभावे करत. वयाच्या आठव्या वर्षांपासून न चुकता त्यांच्या कडून ही सेवा अखंडित सुरू होती. एवढे पुण्य गाठीशी असताना सुद्धा कमी वयात अपघाताचे कारण झाले आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या नंतर त्यांच्या मुलाने – गिरीधरने त्यांचा वारसा पुढे सुरू ठेवला. गावातील सर्व गावकरी मंडळी त्यांच्या अकस्मात जाण्याने हवालदिल झाले. परंतु संपूर्ण गावाने त्यांच्या कुटुंबाला आधार दिला आणि त्यांचे घर पुन्हा एकदा उभे राहिले. सदानंद आपल्या कुटुंबाचे कष्ट स्वर्गातून पाहत होते. त्यांना फार वाईट वाटत होते. एकदा देवाने त्यांना विचारले, “ तुझ्या घरावर माझी कृपा दृष्टी असताना, संपूर्ण गाव तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी असताना का एवढा व्याकुळ होतोस ?
त्यावर सदानंद म्हणले, “ देवा मी आणि माझ्या कुटुंबाने मनोभावे तुझी सेवा केली. कधी गावाच्या यात्रेला खर्च कमी पडतो तर माझ्या पदरचे धन त्यासाठी देऊन तुझी पालखी यात्रा काढली. आम्हाला त्यातून समाधान मिळाले पण हे समाधानाचे आयुष्य माझ्या कडून तू घेतलंस ? तुझी तर मी सेवा केली, कधी लोभ केला नाही किंवा कोणाची फसवणूक केली नाही. मग हे पोरकेपण माझ्या मुलाला का यावे ?
त्यावर देवाला त्यांची दया आली आणि सदानंद सोबत देवाने फेर फटका मारत समुद्र किनारा गाठला. किनाऱ्यावरच्या वाळूवर चालताना त्यांची दोघांची पाऊले मागे उमटत होती. थोडे अंतर चालल्यावर देवाने सदानंदना मागे वळून पाहायला सांगितले. वाटेत कुठे दोघांचे पायाचे ठसे होते तर कुठे एकाचेच ठसे होते.
सदानंदनी देवाला विचारले, “ हे असे कसे झाले देवा ? “ त्यावर देवाने त्यांना त्यामागचे कारण सांगितले.
“ सदानंद, जिथे जिथे तुला दोघांच्या पायाचे ठसे दिसतात तिथे तिथे मी तुझ्या सोबत होतो आणि मी तुला येणाऱ्या सगळ्या संकटात बळ देत होतो. पण जिथे जिथे तुझ्यावर मोठी संकटे आली. तुझी शक्ती अपुरी पडली तिथे तुझी भक्ती आणि कर्म कामी आले. त्या त्या ठिकाणी मी तुला माझ्या खांद्यावर घेतले आणि तुझा रस्ता मी चाललो. म्हणून तिथे एकाचे ठसे आहेत. आजवर तुझ्या आयुष्यात जी संकटे आलीच नाही असे तुला वाटते ती तुझ्या पर्यन्त पोहोचली नाहीत. आपण जे आता पर्यन्त चालत आलो तो तुझा जीवन प्रवास होता. आपण जन्माला येतो तेव्हाच हा प्रवास ठरलेला असतो पण त्या प्रवासात कोण कुठे कसे भेटेल ? प्रत्येक वळणावर काय वाढलेले असेल ते आपले कर्म , भक्ती आणि निष्ठा ठरवत असते. काळजी करू नकोस. तुझ्या मुलाचे कल्याण होईल. तूझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला तिथे आता असंख्य सदानंद आहेत. जे तू तुझ्या सेवेतून कमावले आहेस. ते कधीच तुला विसरणार नाहीत. माझे आशीर्वाद कायम त्यांच्या सोबत असतील.
सदानंदच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी पाहिले गावकरी लोक त्यांची गाऱ्हाणी, अडचणी, सुख वार्ता देवाला सांगत आहेत आणि देवासोबत गिरीधरला ही नमस्कार करत आहेत. यात्रेसाठी लागणाऱ्या गोष्टी गावकरी जमवत आहेत. गिरीधर कडून पवित्र देवकार्य करून घेत आहेत. त्याला सर्वांचे खुप प्रेम, आशीर्वाद मिळत आहेत. हे सगळे पाहून त्याला एका गोष्टीची जाणीव झाली. आपला हा प्रवास जरी ठरलेला असला तरी आजवर या प्रवासात मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या दुःख, दारिद्र्य, निराशेला सामोरे जावे लागले नाही. आपण हे आयुष्य खरंच आनंदात जगलो. हीच तर आपली कमाई होती. सदानंदानी समाधानाने देवाला नमस्कार केला. आपल्या मुलाला आशीर्वाद दिला आणि गोष्ट इथेच संपली.
ही कथा माझ्या सासऱ्यांकडून ऐकताना माझे मन सांगत होते. अशा किती तरी गोष्टी निव्वळ श्रद्धेने आपल्याकडून सहज होऊन जातात. कोणताही गाजावाजा न करता असे असंख्य सदानंद जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात राबत आहेत. त्यांची दखल घेणारा कदाचित त्यांना आजवर भेटला ही नसेल पण भेटेल या आशेवर, श्रद्धेने आणि विश्वासाने राबणाऱ्या हाताला “ देव “ या सकारात्मक भावनेने अजूनही जोडलेले आहे म्हणून जग सुंदर आहे.

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...