Saturday, 1 August 2020

मैत्री


    

    मैत्री दिनावर लिहायचे ठरवले. मैत्रीवर लिहिण्यापेक्षा म्हणलं आज थोडे विश्वासावर लिहावं. कदाचित त्यातच कुठेतरी मैत्रीचा अर्थ भेटून जाईल. लहानपणी आपल्या जवळच्या मैत्रिणीसोबत बसण्यासाठी कितीदा आपण हट्ट केले असतील. जवळच्या तीन मैत्रिणी असतील तर आणखी पंचाईत. कितीतरी वेळा असं व्हायचं. सगळा वर्ग भरलेला असला तरी आपली जिवाभावाची मैत्रीण आली की नाही हेच आपल्या नजरा शोधायच्या. कधी कधी चुकून धक्का लागून डबा पडला कि मधल्या सुट्टीत आग्रहाने मैत्रिणीच्या डब्यावर ताव मारणे असायचे. शाळा सुटल्यावर एकत्र घरी येणं. येताना मजा मस्ती करणे. गप्पा, कधी कट्टी बट्टीचे वाद. गणपती, दिवाळी सुट्टीत केलेली छोटीशी पार्टी. शाळेच्या दिवसातले मैत्रीचे दिवस होते. नंतर जसे कॉलेजला आले, कॉलेजची मजा शाळेपेक्षा वेगळी होती. चांगल्या वाईट गोष्टीकडे समजून उमजून पाहण्याची क्षमता तेव्हा हळूहळू येऊ लागली होती. नंतर बरेच नवे मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या. कॉलेज, क्लास सगळे विश्व निराळे होते. रंगबेरंगी होते. प्रत्येकाची वेगळी ओळख आणि आठवण तयार होत होती. शेवटच्या वर्षाला शेवटचा पेपर देऊन मी आणि मैत्रिणीने केलेली पार्टी मला अजून आठवते. रस्त्यात जे पहिले दुकान दिसेल तेथे जाऊन पेटपूजा करायची. शेवटच्या पेपर मधून सुटल्याचा आनंद तर होताच पण तासभरात गेल्या तीन वर्षाचे सगळे बोलून आम्ही मोकळे झालो होतो. एम एस सी ला तीच जागा होती. मैत्रिणी वेगळ्या. तेव्हाचे लॅब मधले करामती आणि नंतर कॉलेज सुटल्यावर शेवपुरी, पाणीपुरी आणि सोबत रंगवलेल्या गप्पा . रात्रीच्या आठ वाजेपर्यंत कॉलेजच्या लॅब मध्ये केलेले प्रयोग. नंतर शिक्षण संपले पण शिक्षण देणे सुरू झाले. शाळेत जॉब करताना सगळ्या सहकारी शिक्षकांकडून रोजचे काही ना काही शिकणे सुरु होते. वयाने आणि अनुभवाने मी लहान होते. विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबत त्याच्याकडून ही नेहमी शिकत होते. आमच्यातले वयाचे अंतर मैत्रीच्या नात्याने कमी केले. त्यात ही एकत्र घेतलेला शनिवारचा वडापाव आणि बस स्टोप वरचा बर्फाचा गोळा ही खाऊ ची सुट्टी असायची. एकत्र घेतलेला मसालेदार चहा, एकत्र मिळून पूर्ण केलेले प्रत्येक मिशन मग ते कधी पेपर तपासणे असो किंवा मुलांकडून करुन घेतलेला एखादा उपक्रम आणि बरच काही. रोजचे नवे सोहळे सुरूच असायचे. या सगळ्याच गोष्टी आणि या सारख्या असंख्य आठवणी मला आणि माझ्यातल्या व्यक्तीला अनुभवाची शिदोरी देतात. ती कायम माझ्या स्मरणात राहते. कधी कधी आपले अंदाज चुकतात. आपण मांडलेली गणिते चुकतात. अशा वेळी कोणीतरी अशी व्यक्ती सावलीसारखी मागे असते. जी आपल्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते. समोर नसले तरी त्याचे अस्तित्व आपल्याला बळ देते. अशी व्यक्ती माझ्या ही आयुष्यात आहे तीच जाणीव असावी मैत्री. याची दखल घेणारी गोष्ट म्हणजे लेखणी. माझे शब्द आणि छोटीशी ओळख. विश्वास या शब्दाचा अर्थ मला याच सगळ्या मित्र, मैत्रिणींनी दिला.
निराशेतून प्रकाशाकडे नेणारे असे मैत्रीचे नाते. विश्वासाचे, प्रेमाचे. प्रामाणिकपणाचे नाते. माझ्या लेखणीशी असलेले, कवितेशी जुळून आलेले नाते. असे मैत्रीचे नाते…

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...