Tuesday, 20 January 2026

लोकशास्त्र सावित्री

   “ लोकशास्त्र सावित्री “ नाटक... रंगकर्म... रंगमंच आणि ध्येयवेडे रंगकर्मी. डोंबिवली, पुणे, दादर या विविध ठिकाणी सावित्रीचा जागर झाला, माणुसकीची ज्योत उजळून निघाली. या प्रवासात पुढे जाणारी प्रेक्षकांमधली आजची सावित्री सापडत गेली. लोकशास्त्र सावित्रीच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाची आलेली प्रतिक्रिया आणि तितकाच जोश पूर्ण प्रतिसाद. त्यातून आलेले अनुभव यावर लिहीत आहे.
नुकताच “ जागतिक रंगभूमी दिन “ होऊन गेला. त्याचे निम्मित आणि लोकशास्त्र सावित्री नाटकाचा प्रयोग असा सुरेख योगायोग जुळून आला. सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक “ रंगचिंतक मंजुल भारद्वाज “ यांच्या कसदार लेखन आणि अनुभवी प्रशिक्षणाखाली “ लोकशास्त्र सावित्री “ चा प्रयोग डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात उत्साहात पार पडला.
    “ थिएटर ऑफ रेलवंस “ ची नुकतीच माझी तोंड ओळख झाली होती. बघता बघता प्रयोगानंतर त्यातलीच एक सावित्री मी ही कधी झाले कळलेच नाही.
नाटकाच्या तालमी पासून सुरू झालेला प्रवास गेल्या २७ मार्च २०२२ ला परिमाण कारक रंगमंचावर उतरत गेला. दिसत गेला. त्या रंगमंचावर उभे राहून नाटक जगण्याचा आणि तिथवर जाण्याचा अनुभव मी लिहायला घेतला.
   सर्वप्रथम कोणत्याही कलाकृतीला संगीताची, कणखर आवाजाची जोड असेल तर ती कलाकृती खणखणीत वाचते आणि गाजते ही. “ लोकशास्त्र सावित्री “ ला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. सावित्रीबाई फुले, बहिणाबाई आपल्याला रंगमंचावर दिसतात. आणि त्यामुळेच तेव्हा पासून सुरू असलेली आपली लोकसंगीताची परंपरा कायम राखत नाटक फुलत जाते. त्यात जागर, पोवाडा, झिम्मा फुगडी, गाऱ्हाणं, ओव्या अशी सगळी सांस्कृतिक मेजवानी मिळते. विषयाचे गांभीर्य धरून ठेवून तेव्हाच्या सावित्री – जोतिबा वर न थांबता आजची सावित्री कुठे आहे ? हा प्रश्न समोर येतो. प्रेक्षक तिथे गहिवरतो. उत्तर शोधण्यासाठी प्रवृत्त होतो.
    मी या प्रवासात होते ते एक लेखिका म्हणून... पण कधी त्यांच्यातली एक रंगकर्मी झाले हे कळले नाही. रंग मंचावर उभे राहून येणाऱ्या टाळ्या आणि प्रेक्षकांची दाद विंगेतून अनुभवण्याचा हा माझा पहिलाच अनुभव.
नाटकाविषयी सांगायचे असतेच पण ते अनुभवायचे असेल तर तो रंगमंचच बोलवतो. म्हणून पुन्हा तीच भेट आणि तिथेच उत्तरे. कारण शब्द हे जेव्हा कलाकृती सादर करताना चेहऱ्यावर झळकतात, आवाजातून उतरतात ते विश्व निराळेच असते. तिथे लेखक बोलतो पण तो प्रत्येकाच्या तोंडून, कृतीतून त्यामुळे ती जादूगिरी पाहण्यासाठी तिथे नक्कीच यावे.
नाटकात सावित्रीच्या विचारांना प्रकट करणारे हर एक कलाकार मुख्यतः अश्विनी नांदेडकर, त्यांनतर सायली पावसकर उर्फ काकू, कोमल खामकर उर्फ कठोर यांच्यात दडलेली ताकदीची सावित्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. प्रत्येकीत सावित्रीचे वेगळे रूप दिसून आले.
नाटक पूर्ण पाहिल्यावर नाटकाला येणारे विविध स्थरावरचे प्रेक्षक. वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक तसेच वैचारिक जडण घडणीतून येणारा प्रत्येक जण आपल्या आजूबाजूला किंवा स्वतः मध्ये हे नाटक अनुभवत होता. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे प्रतिबद्ध रंगकर्मीं यांनी आपल्या सर्वांगाने सृजनात्मक अभिनय, दृश्य बांधणी आणि रंगसौंदर्याने नटलेल्या सादरीकरणातून नेपथ्य किंवा सेट शिवाय, प्रकाश नियोजन व प्रकाश रंगांनी नाटकातली दृश्य, वेगवेगळे प्रसंग समोर आणले. प्रेक्षकांच्या दृष्टीने हे नाटक फक्त जोतिबांच्या सावित्री पर्यन्त न राहता ते आजची सावित्री कुठे आहे ? हा प्रश्न विचारते. नाटकातील गाण्यावर प्रेक्षक ठेका धरतात. त्यातील शब्द त्यांना स्वतः मध्ये डोकावण्याची संधी देतात. सुरुवातीपासूनच पडदा न ठेवता, मध्यंतर न घेता प्रभावीपणे सादर केलेले नाटक प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
      एका प्रतिसादात महिलेने “ मी सावित्री आहे “ कारण माझे जोडीदार माझ्यासाठी “ जोतिबा झाले “ असे अभिमानाने सांगते. नववार साडी आणि डोक्यावर पदर घेऊन आलेली बाई ही प्रेक्षकांतुन उठून नाटकाचे कौतुक करते. आपल्याकडे यशस्वी महिला झाल्या नाहीत का ? या प्रश्नांची उत्तरं, त्याची उदाहरणे प्रेक्षकांतुनच सांगितली जातात. पण तिथे ही या प्रतिक्रियेला छेद देत आपल्यातली ती एक का नाही ? या प्रश्नांवर प्रेक्षकांमध्ये चर्चा सत्र सुरू होते. नाटकाची मांडणी ही सुरू होते. विषयाचे गांभीर्य आणि स्त्री जीवनातील दाहक चित्र प्रेक्षक संवादात आणखी स्पष्ट होते. सामाजिक जागृतीला तिथेच सुरवात होते. रसिक प्रेक्षकांमधून कोणी येऊन सावित्रीच्या जीवनावर आधारलेले पुस्तक तर कोणी फोटो भेट देते. समोर बसलेली कधी गृहिणी असते. कधी शिक्षिका तर कधी व्यवसायिक कारकिर्दीतील महिला. तिच्यात प्रत्येकीत दडलेल्या सावित्रीच्या विचारांना ती शब्दातून व्यक्त करते.
        समाज जागृती हे ध्येय गाठण्यासाठी सुरू झालेली वैचारिक क्रांती प्रेक्षकांच्या मनावर कोरली जाते. त्यातून पुढे प्रेरणेने काही या क्रांती मध्ये जोडले जातात. तशीच एक शिक्षिका, प्रीती ताई अंबरनाथ वरून सावित्रीचा जागर पाहायला डोंबिवलीच्या प्रयोगाला आली आणि लोकशास्त्र सावित्रीशी जोडली गेली. नाटकाच्या शेवटी जागर सादर करताना प्रेक्षकांमध्ये गेल्यावर त्यांची उत्स्फूर्तपणे त्यात सामील होण्याची इच्छा पाहून ही वैचारिक क्रांती पुढे निरंतर सुरू राहणार आहे. याची खात्री पटली. नाटकाच्या शेवटी तो फक्त रंगकर्मींचा जागर न राहता प्रेक्षकांचा ही होऊन जातो.
माझ्या आठवणीत राहिलेला किस्सा असा की ठाण्याला झालेल्या साहित्य संमेलनात समन्व्यक म्हणून काम करताना मोठ्या सभागृहात एका जेष्ठ बाईंना घेऊन जाताना लिफ्ट मध्ये त्यांनी डोंबिवलीत झालेल्या प्रयोगाची आठवण करून दिली. त्यातील माझा चेहरा त्यांनी ओळखला. मी लोकशास्त्र सावित्री मध्ये येण्याचा, नाटकात प्रवेश करण्याचा पहिला प्रयत्न आणि डोंबिवलीचा प्रयोग ही माझ्यासाठी पहिलाच प्रयोग होता. त्यांच्याकडून ती गोष्ट निदर्शनास येणे. आणि प्रयोग होऊन बऱ्याच दिवसांनंतर ही त्यावर प्रतिक्रिया ऐकणे ही माझ्यासाठी अमूल्य आठवण आहे.
दर्जेदार भूमिका, प्रेक्षक, प्रसिद्धी आणि योग्य विचार ही कोणत्याही कलाकृतीला कायमस्वरूपी अढळ स्थानी नेऊन ठेवते. हेच या प्रेक्षक संवादातुन निदर्शनास आले.
“ ती आहे सृजनकार, तीच आहे पालनहार, नाही ती गुलाम कोणाची, आहे ती शक्ती जगाची, तीच सौंदर्य या जगाचे हो... जी जी जी ...” शेवटी त्याच नाटकातील या काही ओळींनी मी या सावित्रीला वंदन करते. आणि हा सवित्रीचा जागर दूरवर जिथे जिथे सावित्री वाट पाहत आहे. तिथपर्यन्त पोहोचावा या शुभेच्छा देते.

2 comments:

Unknown said...

Each word describing its meaning so beautifully...awsome writing

जुईली अतितकर said...

Thank you so much ✍️

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...