Tuesday, 20 January 2026

पुस्तक मनोगत : युद्धानंतर



युद्धभूमी, रणांगण , विजय , पराजय , लढाया, शस्त्रे, मनुष्य हानी, आपण लहानपणापासून गोष्टीत ऐकतोय. सिनेमामध्ये पाहतोय. आज ही अशी युद्ध कधी सौम्य तर कधी रुद्र रूपात सुरू आहेत.

जेव्हा ही युद्ध आजूबाजूला सुरू असतात. जेव्हा युद्ध डोळ्यांनी पाहिले जाते. कानांनी ऐकले जाते. तेव्हा प्रश्न पडतो...युद्ध का सुरू होतात? युद्ध कशी संपतात ? युद्धा नंतर काय होते? या प्रश्नांची उत्तरं आणि युद्धानंतर चे दारुण चित्र, तिथली हकीकत मला “ युद्धानंतर “ या कवी. आदित्य दवणे लिखित काव्य संग्रहात वाचायला मिळाले.

जिथे युद्धाचे वावटळ येते, तिथला परिसर कलाकाराला बोलका वाटू लागतो. भयाण शांततेत सुद्धा बोलणारी मने तो ऐकू शकतो. एखाद्या शारीरिक आजाराची जशी लक्षणे असतात तसे मला वाटते आपल्या मनातल्या अस्थिरतेचे, विकाराचे लक्षण म्हणजे ही युद्ध, बंड, मनुष्य हानी.

युद्धात बधिर झालेले कान कोणाची तरी तन्मयतेने मारलेली हाक ऐकण्यासाठी आसुसलेले असतात. युद्धात पाणावलेले डोळे मायेचा ओलावा शोधत असतात. सैरभर झालेले मन युद्ध जिंकण्याआधीच हरलेले असते.

कोरीव शिल्पे जशी इतिहास जपतात. तसेच युद्धातल्या आठवणी म्हणजे शरीरावरचे व्रण कायम माणसाच्या सोबत असतात. ती जागा, तो परिसर आणि ती माणसे सावली सारखे मनावर गारुड घालतात.

मनातल्या सुप्त भावना, नव निर्मितीचा ध्यास जिवंत असणाऱ्या प्रदेशात कलाकार जन्माला येतो आणि कलाकार नसणाऱ्या ठिकाणी युद्ध जन्माला येते. युद्धभूमीवर ते थांबवण्याची ताकद कलाकारात असू शकते. तो तिथले चित्र बदलण्यासाठी कलेचे शस्त्र हाती धरतो. तो त्याच्या कलेतून तिथले विश्व, तिथल्या जागा, तिथली माणसे सांगत असतो. मृत जमिनीत कला अमृत पेरू शकते. तिथले युद्ध तो शिल्पात साकार करतो. युद्धात बेरंगी झालेल्या चित्राला तो नव्याने रंगवू शकतो. बधिर झालेल्या कानांना सुरांचे दान देऊ शकतो. या युद्ध भूमीला नव जीवन देऊन रंगमंच करणारा जादूगार त्या मातीतला कलाकार असू शकतो. या पुस्तकातील एका कवितेत कवी आदित्य दवणे लिहितात,

“कलेच्या साध्या असण्याने ही

 लढले जाणारे युद्ध युद्ध उरले नसते

 हे जग खरेच किती सुंदर झाले असते!”

असे हे युद्धानंतरचे जग पुन्हा नव्याने उभारण्याचे आशादायी चित्र मनाच्या कोपऱ्यात जपत हे पुस्तक वाचून पूर्ण झाले.


No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...