आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक नव्याचे कौतुक, त्याचे नवे पण आपण साजरे करतो. मग ती एखादी वस्तू असो, जागा असो किंवा एखादी व्यक्ती. नव्याचे कुतूहल असताना त्याच मनात पूर्वीचे काही तरी मागे ठेवून आपण पुढे आलेलो असतो. काही गोड तर काही कटू आठवणी सोबत असतात. त्या गोष्टीचा दीर्घ सहवास, सोबत असते.
जसे कि जेव्हा अक्षर ओळख नव्हती तेव्हा पाटी आणि पेन्सिलचे कुतूहल होते. जसे पुस्तक, पेन हातात आले तेव्हा त्याचे आकर्षण वाटू लागले. नव्या कोऱ्या वहीच्या पानावर त्या पेनाने लिहिलेली अक्षरे पाहताना त्या हस्ताक्षराची भुरळ पडली.
टेबलावरच्या अशाच एका पेनाचे ही गोष्ट.
मी नवीन कथा लिहायला घेणार होते. वही पेन खालच्या रकान्यातून काढले. समोर टेबलावर ठेवले. लिहायला सुरुवात करणार तोच शीर्षक लिहिल्यावर पेनाची शाई संपली. सहजपणे ते जुनं संपलेलं पेन बाजूला ठेवलं आणि काहीच दिवसापूर्वी भेट म्हणून मिळालेलं नवं पेन हातात घेतलं. ठरवल्याप्रमाणे कथा लिहून पूर्ण झाली. पेन पुन्हा त्या जागी ठेवताना मला ते संपलेलं पेन दिसलं.
ते पेन मला काही तरी सांगत होतं. काही काळ माझा त्या संपलेल्या पेनाशी मूक संवाद झाला.
“ नवं कोर पेन आपल्याला भेट म्हणून मिळाल्यावर त्याचं आपल्याला किती कौतुक असतं! आपण त्याला किती जपतो! असे नवे पेन हातात पडल्या पडल्या त्याने स्वतःचे नाव लिहिण्याची उत्सुकता, नवीन कथा, कविता लिहिण्याची उत्सुकता, त्याने केलेला गृहपाठ, भरलेली डायरी सगळंच आवडू लागतं. ते कधी संपूच नये अशी हि सुप्त इच्छा मनात असते आणि अचानक कोरी पाने त्या पेनाने भरता भरता कधीतरी ते पेन संपलं की त्याच विश्व् संपत. असे कसे होऊ शकते? “
ते संपलेलं पेन तेव्हा मला सांगत होतं “ मी काही संपलो नाहीच मुळी... माझ्यासोबत आता भरभरून साठा आहे... तुझ्या अनुभवाचा, तुझ्या सोबतीचा, माझ्याकडे तुझ्या आठवणीतल्या गोष्टी आहेत. तुझ्या मनातली मी वाचलेली काही पाने आहेत. ती आता बदलणार नाहीत. आपली सोबत आज हि सुंदर पानावर सजलेली आहे. आज मी हातात नसलो तरी मी मागे ठेवलेली असंख्य आठवणीतली पानं आहेत. अशा वेळी नवे पेन हातात घेताना त्या मागच्या पानांची आठवण ठेवून तू नवी सुरुवात कर . “
ते पेन मला नवीन सुरुवात करायला सांगत होतं. अगदी आपल्या जवळच्या माणसासारखं...
त्या पेनासारखेच तर हे जग आहे. एखादी व्यक्ती आपल्याला विसरली असे कधी वाटू शकते. तेव्हा आपले तेव्हाचे सोबत असणे आणि आताचे नसणे त्या पेनासारखे समजावे. कोणीतरी तसे पेन होऊन आपल्याला समृद्ध केलेले असते. तर कधी आपल्याकडून एखाद्याच्या आयुष्यात आठवणीतले सुंदर पान लिहिले गेलेले असते. त्याचे समाधान सोबत ठेवून पुढच्या प्रवासाला आपण निघावे. गोष्ट लिहिताना मध्येच पेन जरी संपलं. दुसरं घ्यावं लागलं तरी मागची काही पाने त्या पेनाने लिहिल्याचे समाधान कायम सोबत ठेवून पुढे लिहीत राहावे.
No comments:
Post a Comment