Sunday, 3 December 2023

अंकुर

लहानपणी आजीकडूनच प्रवासाला निघालेल्या आजीची गोष्ट ऐकली होती. एक आजी प्रवासात लहानपणी आजीकडूनच प्रवासाला निघालेल्या आजीची गोष्ट ऐकली होती. एक आजी प्रवासात रेल्वेमध्ये खिडकीशेजारी बसून बाहेर थोड्या थोड्या अंतरावर फळाच्या बिया टाकत असते. तिला तिच्या शेजारी बसलेला नातू विचारतो “ ही बी मातीत रुजून त्याच मोठं झाडं व्हायला, त्याला फळं यायला अजून भरपूर वेळ जाईल मग तेव्हा तू नसलीस तर... “ त्यावर आजी त्याला म्हणते “ या आधी ज्यांनी कोणी झाड लावले त्याची फळे मला मिळाली कि, ही दोन्ही बाजूनी वाढलेली झाडं बघ किती सावली देतात. प्रवास किती छान होतोय...मग माझ्या मागून येणाऱ्या तुला आणि इतरांना ही फळे मिळायला हवीत ना, अशी आणखी झाडं हवीत म्हणून मी या बिया टाकते. बाजूला बसलेला नातू आता खिडकीशी येऊन तो ही फळ खाऊन बिया काढून टाकू लागला.

दया भाव, दातृत्व, प्रामाणिकपणा, निष्ठा, सत्कर्म हे शब्द आजीने न सांगता ही कृतीतून त्यांची ओळख करून दिली. मनात रुजवली. आपल्याला फळे मिळणार कि नाही याची चिंता बाजूला ठेवून सत्कर्म करत राहिली.

बरेचदा आपले मन जेव्हा स्वतःमध्ये गुंतलेले असते तेव्हा हा चिंतेचा झरा कोसळत असतो, ज्याला थांबवणे कधी कधी कठीण होऊ शकते. अशा वेळी स्वतः ला सत्कार्माच्या प्रवाहात वाहून घेणे गरजेचे असते. श्री रामदास समर्थ मनाच्या श्लोकात लिहितात,

मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।

अकस्मात होणार होऊन जाते ॥

घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।

मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥

आपले मन न घडलेल्या घटनांची चिंता करते. घडलेल्या घटनाची कारणे शोधते. गोष्टी घडत जातात. त्या आपल्या हातात नसतात. बऱ्याचदा आपल्या कृतीतून, विचारातून आपल्याला बरे वाईट फळं मिळत असते. अशा प्रसंगी दुबळे झालेले मन दुःख करत बसते.

वाहणाऱ्या पाण्याने मातीशी जोडलेले नाते किती ही घनिष्ठ असले तरी ते वाहत पुढे जाते. मैदानातल्या खेळाडूने जखमांची हळहळ करायची नसते. त्यातूनच त्याला मैदान जिंकायचे बळ मिळते. हिरव्यागार झाडावरचे पिकले पान कधी तरी गळून पडणार त्याचे झाडाने दुःख करायचे नसते. नव्या आलेल्या पानासोबत त्याला सगळे ऋतू पहायचे असतात.

आजीबाईंच्या कथेत सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा एखादे “ बी “ पेरतो ना तेव्हा आपल्याला मिळणारे फळ हे गोड की बेचव या प्रश्नावर न थांबता आपल्या हातात जे फळ असेल त्या फळाची “ बी “ संपूर्ण झाड निर्माण करू शकते या विश्वासावर ते रुजवणे म्हणजे जीवन...


No comments:

पर्यावरण संवर्धन

आपल्या भोवतालचे वातावरण, आजूबाजूचा परिसर आणि पर्यावरण यांचा आपल्या विचारांवर, प्रगतीवर आणि जगण्यावर दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात ...